पेन्सिल चोरली म्हणून मुख्याध्यापकांनी केलेल्या मारहाणीत दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील एका शाळेत घडली.
उत्तर प्रदेश – विद्यार्थ्यांना चांगले वळण, चांगली शिस्त लागावी म्हणून शिक्षक छडीचा वापर करतात. मात्र अनेकदा ही छडीच विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतते.
पेन्सिल चोरली म्हणून मुख्याध्यापकांनी केलेल्या मारहाणीत दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील एका शाळेत घडली. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिलह्यातील द्वारिका मेमोरियल शाळेत हा प्रकार घडला.
मंगळवारी द्वारिका मेमोरियल शाळेत दोन नवीन मुलांनी दुसरीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपली पेन्सिल आणि रबर चोरीला गेल्याची तक्रार शिक्षकांकडे केली. यावेळी तपासणी केली असता या दोन नवीन मुलांकडे पेन्सिल आणि रबर आढळले.
याप्रकारावरुन संतप्त झालेले मुख्याध्यापक ललित कुमार यांनी त्या दोन मुलांना खूप मारहाण केली. यामध्ये ती दोनही मुले जबर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मंगळवारी रात्री त्यातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुस-या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.