अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाची परंपरा मोडीत कामकाज रेटण्याची घाई सत्ताधा-यांकडून झाली आहे.
मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाची परंपरा मोडीत कामकाज रेटण्याची घाई सत्ताधा-यांकडून झाली आहे. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतल्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थती करत दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढवली. सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणे सुरू असताना मध्येच मंत्र्यांचे निवेदन केल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
बुधवारी विधानसभेत विधिमंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. सत्ताधारी पक्षातील सदस्यांबरोबरच विरोधी पक्षातील सदस्यांची भाषणे सुरू होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचेही भाषण झाले नव्हते. शिवाय सभागृहाने उभे राहून दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजलीही अर्पण केली नव्हती. अशातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निवेदन करण्यास अनुमती दिली. कांबळे यांनी नवीन १ हजार ५६ दुष्काळी गावांत उपाययोजनांबाबत निवेदन वाचून दाखवत होते. तेवढय़ात सभागृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधानसभा गटनेते जयंत पाटील आले. त्यांच्या ही बाब लक्षात येता त्यांनी तात्काळ आक्षेप घेत शोकप्रस्ताव सुरू असताना मध्येच निवेदन कसे काय सादर करता येते, याबाबत अध्यक्ष बागडे यांना विचारना केली. तेव्हा विरोधी बाकावरील इतर सदस्यही उभे राहिले होते.
दरम्यान, विरोधकांकडून हा मुद्दा उचला जाणार हे लक्षात येताच सभागृहात उपस्थित मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मध्यस्थी करत हे निवेदन विधान परिषदेत करण्यात आल्यामुळे येथे करावे लागत आहे. शिवाय आज विधानसभेची सुरुवातच शोकप्रस्तावाने झाल्याचे सांगत विधिमंडळाची कोणतीही परंपरा मोडीत काढण्यात येणार नाही, याबाबत ग्वाही देऊन दिलगिरी व्यक्त केली.