‘भारत माता की जय जे बोलणार नाहीत, त्यांना देशात राहाण्याचा अधिकार नाही’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे सोमवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले.
मुंबई- ‘भारत माता की जय जे बोलणार नाहीत, त्यांना देशात राहाण्याचा अधिकार नाही’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे सोमवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत हे राज्य मुख्यमंत्री चालवत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी पृच्छा केली. या वेळी चव्हाण आणि फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
नाशिक येथे झालेल्या भाजपा कार्यकारिणी बैठकीत फडणवीस यांनी आवेशात येऊन, भारत माता की जय. घोषणा देण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून सोमवारी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना घेरले.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. मुख्यमंत्र्यांनी संघाचे स्वयंसेवक म्हणून भाषण केले काय? हा पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल फडणवीस यांना चांगलाच झोंबल्याचे या वेळी दिसून आले. मुख्यमंत्री पद हे संविधानिक पद आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे बोलताना जे विधान केले आहे ते संघाचे स्वयंसेवक म्हणून केले की मुख्यमंत्री म्हणून केले असा जाब चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यामुळे काही काळ चव्हाण यांची सभागृहात सत्तारुढ सदस्यांबरोबर चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.
मुळ मुद्दयाला बगल देत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनावर पुन्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांना बोलायचे होते. मात्र त्यांना बोलू दिले नाही. तेव्हा विरोधकांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.
प्रारंभी विखेपाटील यांच्या स्थगन प्रस्तावानंतर, सर्व स्थगन प्रस्ताव दालनातच नाकारले कारण अनुदान मागण्यांवर चर्चा सुरु आहे, असे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी स्पष्ट केले होते. तरीही विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे अशी जोरदार मागणी लावून धरली. पृथ्वीराज चव्हाण यांनीही फडणवीस यांना कोंडीत पकडले. यामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.