केंद्रात सत्तेत येण्याआधीपासून मोदी आणि भाजपाने पोकळ आश्वासनांची पुंगी वाजवायला सुरुवात केली आहे. मोदींच्या भाषणाने तर देश-परदेशातील लोकांवर गारुड केले.
केंद्रात सत्तेत येण्याआधीपासून मोदी आणि भाजपाने पोकळ आश्वासनांची पुंगी वाजवायला सुरुवात केली आहे. मोदींच्या भाषणाने तर देश-परदेशातील लोकांवर गारुड केले. या भाषणात मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि मोहिनी घालणारी आश्वासने यांची खरात होती. आधीच्या सरकारने केलेल्या कामाची कोणतीही जाहिरातबाजी न केल्यामुळे त्याचा फटका त्यांना बसत होता. मोदींनी ही संधी साधून आपली भाषणबाजी आणि आश्वासनांची योग्य ती मार्केटिंग केली आणि त्यातून भाजपा आणि मोदीच्या हाती लोकांनी सत्ता दिली. मात्र, मोदींच्या हाती सत्ता गेल्यानंतर आजही त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत.
काळा पैसा, भ्रष्टाचार, पारदर्शी सरकार, सुशासन याच्या सगळय़ा बाताच निघाल्या. त्यावर आजही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. हे काम कमी होते की, काय मोदींनी जे मंत्रिमंडळ नेमले ते सगळेच वाचाळ आणि मोदी यांच्यासारखेच बोलबच्चन निघाले. काम कमी आणि नको त्या गोष्टींची बोंबाबोंब जास्त अशा हुशार मंत्र्यांची नेमणूक मोदी यांनी केली. मोदींचा बोलबच्चन वारसा या मंत्र्यांनी पुढे चालू ठेवला आहे. यात सर्व त्याग केलेल्या साध्वी आणि महाराज लोकांचाही समावेश आहे. साक्षी महाराज यांनी तर कमालच केली आहे. या आधी त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसे याला हुतात्मा म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता एका सभेत बोलताना ‘हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घातली पाहिजे’ असे विधान करून पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.
हे साक्षी महाराज भाजपाचे उत्तर प्रदेशमधील यूनांव येथील खासदार आहेत. या आधीही दोन वेळा ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा वाचाळपणा केला नाही. मात्र, याचवेळी असे कसे घडले? तर त्याचे कारण केंद्रात भाजपा बहुमतात आहे. त्यामुळे आपण काहीही बोललो, कसेही वागलो तर त्याचे काहीच पडसाद उमटणार नाहीत, असे त्यांना वाटत आहे. प्रसारमाध्यमांनी त्यांचा पिच्छा पुरवल्यावर त्यांनी ‘रात गयी, बात गयी’ असे म्हणत वेळ मारून नेली आहे. पण या विधानाबाबत कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नाही.
सर्व आमदार आणि खासदारांनी आता कामाला लागावे, असे आवाहन मोदी अधूनमधून करतात. पण सर्व जण मोदींच्या पावलावर पाऊल टाकून ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ म्हणत हवेतल्या हवेत काम करत आहेत. मोदींनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते आणि काम केले असते तर त्याची री भाजपाच्या आमदार आणि खासदारांनी ओढली असती. पण मोदी जितके पोकळ आहेत तितकेच त्यांचे आमदार आणि खासदार पोकळ, बिनकामाचे निघाले आहेत. मोदींनी मुक्ताफळे उधळली, आता मोदींचे खासदार आणि आमदार मुक्ताफळे उधळत आहेत.