ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा-कळवा सर्वसामान्यांना राहण्यासाठी असुरक्षित ठरत आहे. मागील दहा महिन्यांत या परिसरात तब्बल ८५३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा-कळवा सर्वसामान्यांना राहण्यासाठी असुरक्षित ठरत आहे. मागील दहा महिन्यांत या परिसरात तब्बल ८५३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याच्या विरुद्ध कोपरी भागातील रहिवासी मात्र सुरक्षित असून तेथे फक्त ८४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंब्रा-कळवा परिसरातून ठाणे, भिवंडी, उल्हासनगर व बदलापूर परिसरात गुन्ह्याचे जाळे वाढत चालले आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांदरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ३३ पोलीस ठाण्यात दाखल १२ हजार ८८५ गुन्ह्यांचे वर्गीकरण केले असता ही माहिती उघड झाली आहे. या माहितीनुसार मुंब्रा येथे ८५३, कळवा येथे ५९७ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंब्रा व कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात मालमत्तेचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
यात हाणामारी, घरफोडी, खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, चोरी, फसवणूक, मालमत्तेचा वाद आदींचा तर, सर्वात कमी ८४ गुन्हे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मालमत्तेच्या वादातून हाणामारी, चोरी असे गुन्हे नौपाडा, वर्तकनगर, कापूरबावडी आदी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
यातील ७० टक्के गुन्ह्यांचा उलगडा अद्याप झालेला नाही. ठाणे शहरात घरफोडी, महिलांवरील अत्याचार व सोनसाखळीचोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातील घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या ८३ टक्के गुन्ह्यांचा तपास लागला आहे. तर महिला अत्याचाराच्या ९० टक्के गुन्ह्यांचा तपास लागल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
मनुष्यबळाची कमतरता
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात तपासाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत सात टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षी दहा महिन्यांत हा दर ५८.३१ टक्के तर यंदा ५१.१९ टक्के आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १२ हजार ८८५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. त्यातील ६ हजार ५९६ गुन्हांचा तपास करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी १२ हजार १६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ७ हजार ७ गुन्ह्यांचा तपास लागला होता. सण, व्हीआयपींचा बंदोबस्त, राजकीय कार्यक्रम यात अर्धाअधिक पोलीस बळाचा वापर होत असतो. त्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे गुन्ह्यांचा तपास लागण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.