मुंबई विद्यापीठात मंगळवारी सुरू झालेल्या टी.वाय.बी.कॉम.च्या पाचव्या सेमिस्टर परीक्षेच्या गोंधळाला एमकेसीएल आणि महाविद्यालयांची अनास्था कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठात मंगळवारी सुरू झालेल्या टी.वाय.बी.कॉम.च्या पाचव्या सेमिस्टर परीक्षेच्या गोंधळाला एमकेसीएल आणि महाविद्यालयांची अनास्था कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पदवीच्या प्रत्येक वर्गात झालेल्या प्रवेशासाठीची नोंद आणि त्याची माहिती एमकेसीएलकडे जमा केली जाते, त्यासाठी विद्यापीठाकडून एमकेसीएलला ठरावीक रक्कम प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दिली जाते, याच माहितीच्या आधारे परीक्षांचे हॉल तिकीट तयार करून देण्याचे काम एमकेसीएलकडून केले जाते, मात्र या कामात अनेक वेळा त्रुटी ठेवण्यात आल्याने विद्यापीठाची बदनामी होत असून या वेळीही तोच प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
टी.वाय.च्या एक-दोन नव्हे तर आठ हजारांहून अधिक मुलांचे एमकेसीएलने कायम नोंदणी क्रमांकांची (पीआरएन) नोंदणीच केली नसल्याने सोमवारी मध्यरात्रीपर्यंत या विद्यार्थ्यांना परीक्षांचे हॉल तिकीट मिळाले नव्हते. यात अकबर पिरभॉय, महाराष्ट्र आणि केसी आदी महाविद्यालयांच्या प्राचार्यानी मध्यरात्री विद्यार्थ्यांना एसएमएस करून परीक्षा केंद्र कुठे आले याची माहिती दिली.
तर यात अनेक महाविद्यालयांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आले होते, त्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिलेली नावे आणि एमकेसीएलने दिलेल्या नावाचा कुठेही ताळमेळच जुळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची मंगळवारी परीक्षा केंद्र शोधताना तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन जय हिंद महाविद्यालयाने आपल्याकडे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपल्याच महाविद्यालयात घेतल्याचेही दिसून आले.
पीएनआरची नोंदणी न केल्यामुळे अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तयार करण्यात आले नव्हते. याविषयी परीक्षा विभागाकडे ३ ऑक्टोबर रोजी काही महाविद्यालयांनी तक्रारीही नोंदवल्या होत्या. त्यातच एमकेसीएलने दोन दिवसांपूर्वी हॉल तिकिटांसाठीची लिंकही काढून घेतल्याने नेमके हॉल तिकीट कुठे शोधायचे, हा प्रश्नही विद्यार्थ्यांच्या समोर होता.
एचआर आणि सिद्धार्थ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात विद्यापीठाच्या परीक्षा केंद्राने दिलेली विद्यार्थ्यांची यादी आणि एमकेसीएलने दिलेल्या हॉल तिकिटावरची यादीच चुकीची निघाली.
एचआर महाविद्यालयातील परीक्षा
केंद्रावर विद्यापीठाने ६५० विद्यार्थ्यांची नावे दिली होती, तर एमकेसीएलने या परीक्षा केंद्रावर ८५० विद्यार्थ्यांची नावे दिली होती, यामुळे दोनशेहून अधिक मुलांना या गोंधळाचा त्रास सोसावा लागला तर अशीच परिस्थिती बहुतांश परीक्षा केंद्रांवर झाल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागला आणि याला एमकेसीएल हेच जबाबदार असल्याचा आरोप मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी केला.