मुंबई – मुंबई महापालिकेतील १ लाख १० हजार कर्मचा-यांना किमान ४० हजार रुपये इतका बोनस देण्याची मागणी, मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली. पालिका आयुक्त कामगारविरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करत, समन्वय समितीने ५ ऑक्टोबर रोजी मुख्यालयावर धडक मोर्चाची हाकही दिली आहे.
२०११ पर्यंत आयुक्त, महापौर हे कामगार नेत्यांना विचारात घेऊन बोनसच्या रकमेबाबत निर्णय घेत होते. आता प्रशासन स्वत:च्या अधिकारातच बोनसबाबत निर्णय घेत आहे, हे कामगार नेत्यांना मान्य नाही. दरवर्षी केवळ ५०० रुपयांची तुटपुंजी वाढ बोनस रकमेत केली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेतही कर्मचा-यांना किमान १९ हजार रुपये बोनस मिळत आहे, तर मुंबई महापालिका कर्मचा-यांना १३ ते १४ हजार रुपये बोनस का देते? असा सवाल कामगार नेते बाबा कदम यांनी उपस्थित केला.
गेल्या वर्षी महापालिका कर्मचा-यांना १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर १५० ते १८० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला. या वर्षी कर्मचा-यांना ४० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली. यामुळे पालिकेवर किमान ४४० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.