डान्सबारच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो, त्यामुळे गुन्हेगारी वाढते, अशी विविध कारणे देत २००५ मध्ये राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर बंदी आणली.
मुंबई – डान्सबारच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो, त्यामुळे गुन्हेगारी वाढते, अशी विविध कारणे देत २००५ मध्ये राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर बंदी आणली. मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हे बार सुरूच होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत अशा १८० बार व रेस्टॉरंटवर कारवाई केली. यात १ हजार ३०३ जणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षीय याच काळात १५७ कारवाईंत १ हजार २८१ जणांना अटक करण्यात आली होती.
२०११पासून जुलै २०१३पर्यंत १६२ बारवर कारवाई झाली आहे. या कारवाईदरम्यान अनेक बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुढे आले होते. २००५पासून जून २०१३ पर्यंत मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने महिलांच्या अनैतिक व्यापारात गुंतलेल्या ४१७ जणांवर गुन्हे दाखल केले. यात अनैतिक व्यवसायात ढकलण्यात आलेल्या २ हजार ७३८ महिला व १७९ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत कुंटणखाने, मसाज पार्लरसह बारचाही समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत १ हजार ४९१ जणांना अटक केली आहे. तर एकूण २ कोटी २४ लाख ६६ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षाचा विचार करता समाजसेवा शाखेने १०६ बार व रेस्टॉरंटवर गुन्हे दाखल करून २ हजार ७७२ जणांना अटक केली. यात बारबालांसह बारचे मालक व कर्मचा-यांचा समावेश आहे. याच तीन वर्षात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा कायद्यांतर्गत) ४६ बारवर कारवाई करून ३०८ जणांना अटक करण्यात आली. यात ४७ मालक २४५ दलाल आणि इतर १५ व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तीन वर्षात एका महिला दलालालाही समाजसेवा शाखेने अटक केली आहे. यातील ४९४ महिला व १७ अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
बार व रेस्टॉरंटवर कारवाई
वर्ष गुन्हे अटक आरोपी
२०१३ ३४९ २८ २७
२०१४(मेपर्यंत) १८० १३ ०३