पावसाळयाला सुरुवात झाली आहे. खरं तर हा ट्रेकिंगचा मौसम. एकदम निष्णांत ट्रेकर असतात ते दूरच्या ट्रेक्सना जाणं पसंत करतात; तर नवखे असतात ते जवळच्या. नव्यानेच ट्रेकची सुरुवात करणाऱ्यांसाठी काही जवळच्या ट्रेकिंग टापूंविषयी..
एका दिवसात ट्रेकिंग आणि क्लाइंबिंगचा थरारक अनुभव देणारी काही ठिकाणं मुंबई-ठाण्याच्या आसपास आहेत. वेळेअभावी दूरवर जाणं नेहमीच शक्य होत नाही. अशा वेळी मुंबई-ठाण्याच्या अगदी परिघावरील ट्रेकिंगचा थ्रील देणा-या ठिकाणांकडे पावलं नेहमीच वळतात. ट्रेकिंगचे धडे गिरवण्यासारखी सोपी आणि परीक्षा घेण्याइतपत कठीण अशी ही ठिकाणं आहेत.
त्यामध्ये पनवेलजवळचा ‘कर्नाळा’, कल्याणचा ‘मलंगगड’, सफाळ्याचा ‘तांदूळवाडी’, पालघरजवळचा ‘अशेरी’, आसनगाव इथला ‘माहुली’ हे ट्रेकिंग करण्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे किल्ले. नसर्गिकरीत्या पावसाळ्यात निसर्गरम्य, हिवाळ्यात आल्हाददायक आणि उन्हाळ्यात खडतर अनुभव देणारे किल्ले अशी त्यांची ओळख आहे. ऋतू जसा बदलतो तशीच ट्रेकिंग करतानाची आव्हानंही बदलतात. ही आव्हानं पेलताना दरवेळी वेगळा रोमांच अनुभवायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक ट्रेक हा नवा ट्रेक असल्यासारखा वाटतो. असाच वेगळ्या प्रकारचा ‘हट के’ अनुभव देणारी ही प्रमुख ठिकाणं.
कर्नाळा
ट्रेक, किल्ला, पक्षी अभयारण्य आणि रोमांचं या चारही गोष्टी कर्नाळ्याला अनुभवता येतात. हेच तर या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्टय म्हणावं लागेल. कल्याणहून कल्याण-अलिबाग एस.टी पकडून अलिबागच्या दिशेने जाताना ‘जैत रे जैत’ या चित्रपटामधला िलगोबाचा काळाकुट्ट सुळका बसच्या खिडकीतून अनेकांना खुणावतो. तोच हा कर्नाळा किल्ला. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गर्द राईतून सुळक्याकडे पाहता पाहता झाडांच्या किर्र्रऽऽऽ शांततेतून ट्रेकिंग करण्याचा अनुभव मनाला शांतता देतो. कर्नाळ्याची वाट ही अभयारण्यातूनच जाते. त्यामुळे ड्रोंगो, रॉबिन, भारद्वाज यांसारख्या पक्ष्यांचे किलबिलाट सतत लक्ष वेधून घेतात. सोबतीला िनब, साग, आंबा, जांभूळ, करवंद असे वृक्ष आणि त्यांवर रेलणारी माकडंही आपलं लक्ष वेधून घेतात. हिरवाईच्या अनेक छटा आणि रंगरूप कॅमे-यात साठवण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न इथे आल्यावर नेहमी अपुराच पडतो.
गडावर जाण्यासाठी निसर्गवाट आणि नेहमीचा धोपटमार्ग अशा दोन वाटा आहेत. वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. कसरतीसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिरढोण या गावातून दिवसातून तीन वेळा गड चढत असत.गडावर पोहोचण्यासाठी दोन टप्पे पार करावे लागतात. ते पार करून कर्नाळा डोंगरावरचे दाट जंगल आणि वाटेतले मोठाले दगड-धोंडे पार करून पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर पठार लागतं. या पठारावरूनच किल्ल्याचा काळाकुट्ट सुळका कुणाच्याही नजरेत भरावा. चढण चढून पाय हलकेसे दमलेले असले तरी पठारावरचा थंडगार वारा आणि त्यावर डुलणारं हिरवं गवत पाहून थकवा सहज नाहीसा होतो.
मोकळं पठार मागे सोडून पुढच्या वाटेत किल्ल्याचा भाग असलेला मोठ्ठा खडक लागतो. खडकाची चढण चढल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. पाय-या चढून गेल्यावर किल्ल्याच्या आतल्या भागात प्रवेश करता येतो. किल्ला अवशेषरूपी असून किल्ल्यातील पडक्या भिंती आणि चौथरे पूर्वीच्या इमारती, वाडे आणि धान्याच्या कोठारांची साक्ष पटवून देतात. पाणी साठवण्यासाठी सुळक्याच्या बाजूने खोदलेल्या टाकातील गार पाणी पिऊन ट्रेकिंगचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
तांदूळवाडी
डोंगराच्या हिरव्यागर्द कुशीत वसलेल्या तांदूळवाडी गावात पोहोचण्यासाठी सफाळ्यावरून बस पकडून तांदूळवाडी स्टॉपला उतरावं लागतं. तांदूळवाडी गावात पोहोचल्यावर डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने गडावर जाता येतं. या पायवाटेने चालत राहिल्यास गडाखालची सपाटी येते. पुढे एका घळीतून वर चढत गड गाठता येतो. रोडखड नावाच्या आदिवासी पाडय़ातूनही जाण्यासाठी दुसरी वाट आहे. रोडखड पाडयातून आम्ही जायचं ठरवलं. पाडय़ातील चिंचेच्या झाडाखाली पडलेल्या चिंचा पाहून मैत्रिणींनी तिकडे धाव घेतली. हे पाहून झोपडीवजा खोपटातील एका म्हातारीने त्यांच्या हातावर चिंचेचे आकडे ठेवले. अचानक मिळालेली ही बिदागी पाहून मैत्रिणींच्या चेह-यावरचा थकवा कुठल्या कुठे विरला.
तसं पाहायला गेलं तर तांदूळवाडी हे ठाणे जिल्हय़ातील सर्वाधिक उंचीचं ठिकाण आहे. कठीण!!! असा शब्द पहिल्यांदा तांदूळवाडी ट्रेक करताना माझ्या तोंडून आपसूकच निघाला होता. ख-या अर्थाने हे ठिकाण रॉक क्लाइंिबगचं. पावसाळ्यात शेवाळ आलेले वाटेतील भलेमोठे दगड चढताना सांभाळून पावलं टाकावी लागतात. उन्हाळ्यात ट्रेकिंग करताना नदी ओढय़ाचा मार्ग सोपा वाटला; तरी पावसाळ्यात मात्र परिस्थितीबरोबर विरुद्ध होते.
गडाच्या अंतिम टप्प्याचा चढ तीव्र उताराचा आहे. पावसाळ्यात निसरडय़ा आणि उन्हाळ्यात भुरभु-या मातीमुळे चढायला कष्ट पडतात. नवख्या मित्रांची अवस्था या वेळी ‘दे माय धरणी ठाय’ अशीच झाली. शेवटी गडावर चढून गेल्यावर दगडांनी रचलेली ढासळलेली अशी तटबंदी आहे. तिथून पुढे गेल्यावर गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद दिसतो. गडावरील भिंतीच्या दिशेने पुढे गेल्यास कडय़ावर पाण्याची एकूण पंचवीस कुंडं आढळतात. गडावरून आजूबाजूच्या घनदाट जंगलातून वाहणा-या वैतरणा नदीचं आणि तिच्या काठाशी वसलेल्या ललठाणे गावाचं मनोहारी दर्शन घडतं. सह्याद्रीच्या अखंड रांगांचं विहंगम दृश्य या ठिकाणाहून पाहताना भलताच आनंद होतो. त्यामुळे कॅमेरा सतत बिझी राहतो. भौगोलिकदृष्टय़ा गडाला जे महत्त्व आहे ते या वैशिष्टय़ामुळेच.
माहुली
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात माहुली किल्ल्याचं भौगोलिक स्थान आहे. मध्य रेल्वेवरील आसनगाव स्थानकावर उतरून आम्ही या किल्ल्याकडे वाटचाल सुरू केली. माहुली-भंडारगड-पळसगड या अभेद्य त्रिकुटाने निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांना मदत केली होती. डोंगरावर दिसणारे अनेक सुळके ही माहुली गडाची ओळख. इतर कोणताही गिरिदुर्ग याप्रमाणे दिसत नाही.
माहुलीच्या दिशेने वाटचाल करताना उजव्या हाताला प्रसिद्ध मानसमंदिर लागतं. गडावरून येणारा पाण्याचा प्रवाह छोटया नदीरूपाने वाटेत उजव्या बाजूला वाहत जातो. त्यामुळे वाटेत अनेक लहान ओढे लागतात. डोंगररांगांतून आलेले असे अनेक ओढे एकत्र होऊन नदीरूपाने प्रसिद्ध अशा मानसमंदिराला वळसा घालून पुढे जातात. गडाखालच्या माहुली गावापर्यंत जाण्यासाठी बस उपलब्ध असली तरी आम्ही मित्रांनी मात्र पायीच जायचं ठरवलं होतं.
भातशेती, हिरवी खाचरं आणि दाट होत जाणा-या जंगल वाटेवरून जातानाचा अनुभव हा प्रत्यक्ष घ्यावा असाच. वाटेत लागलेल्या पुरातन शिवमंदिराचे दर्शनही आम्ही घेतलं. मंदिराच्या बाजूला असलेल्या तीन माणसांच्या उंची इतक्या विहिरीचा आरस्पानी तळ बघून आमच्या सर्वाचे डोळे विस्फारले. ते नॅचरल मिनरल वॉटर आम्ही पोट तट्ट होईपर्यंत प्यायलो. गड चढायला सुरुवात केली.
गड चढताना जंगलाच्या वाटेत एक खळाळता ओढा पार करावा लागतो. ओढय़ाच्या थंड पाण्याच्या स्पर्शाने आम्हा सर्वाचा थकवा जणू काही पळूनच गेला. पुढे खडी चढाई लागली. दरम्यान एक लोखंडी शिडीही लागते. शिडी पार केल्यावर पाण्याचे दोन टाक दिसतात. त्यापुढे देवडय़ा, महादरवाजा, तुटलेल्या पाय-या आणि अवशेष दिसतात. वर पोहोचल्यावर मात्र डोळ्यांचं पारणं फिटलं. भातसा नदीच्या उपवाहिन्या, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई पर्वतरांग आणि दुस-या बाजूला हरिश्चंद्रगड, आजोबा, माथेरानच्या डोंगररांगा, तानसा नदीचं खोरं, तुंगारेश्वराची डोंगररांग असा प्रचंड विस्तीर्ण असा दूरवर पसरलेला प्रदेश पाहून भान हरपून जातं.