गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे. तरीदेखील मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही.
अलिबाग- गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे. तरीदेखील मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. महामार्गावर खड्डे की खड्डयांत महामार्ग आहे असा प्रश्न पडतो.
३१ जुलैअखेर कोणत्याही परिस्थितीत रायगड जिल्ह्यातून जाणा-या महामार्गावरील खड्डे भरणे, त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूस भराव टाकून समतोल ठेवणे, याखेरीज महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जागेचे योग्य मोजमाप करून खांब वगरे लावणे, पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीसाठी सुरू करणे, पळस्पे तसेच पेण आदीदरम्यान असलेल्या तयार पुलांवरून वाहतूक सुरू करणे आदींबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत महामार्गाचे काम करणा-या कंत्राटदारास दिले होते.
या कालावधीला एक महिना उलटून गेला तरी महामार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. जिल्हा प्रशासन देखील याबाबत उदासीन आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई जिल्हा प्रशासन करत नाही. हा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग प्रधिकारणाच्या अखत्यारितला असल्याचे सांगून जिल्हा प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठय़ा प्रमाणावर कोकणात जातात. कोकणात जाणारा मुंबई-गोवा हा एकमेव जवळचा महामार्ग आहे. सध्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. दररोज वाहतूक कोंडी होत असते. खड्डयांतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना दिव्य करावे लागते. महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी होत असते, परंतु पावसाचे कारण सांगून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
जिल्हा प्रशासन उदासीन
गणेशोत्सवाच्या कालावधीत करण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी किमान तीन बैठका घेतल्या जातात. यंदा अजून बैठक झालेली नाही. पहिली बैठक जिल्हाधिकारी घेतात. दुसरी बैठक पालकमंत्री घेतात.
या बैठकींना पालकमंत्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी उपस्थित असतात, तशी बैठक घेण्यात आलेली नाही.
त्यामुळे जिल्हा प्रशासन या प्रश्नावर उदासीन असल्याचे दिसून येते. या प्रश्नावर कोणत्याही अधिका-याला माहिती विचारल्यास कुणी बोलत नाही. जिल्हाधिका-यांकडून माहिती घ्या, असे सांगतात. तर जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पत्रकारांशी बोलण्याचे टाळतात. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे हे समजू शकत नाही.