मुंबईत नुकताच चेसकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात मोठ्या संख्येने शालेय स्तरातील बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला असला तरी मुंबईने अजूनपर्यंत एकच ग्रँडमास्टर दिला आहे ही बाब प्रकर्षाने जाणवते. देशातील एकूण ३५ ग्रँडमास्टरमधून महाराष्ट्राने एकूण चार ग्रँडमास्टरच दिले. त्यातच मुंबईचा आकडा एकच आहे. तेदेखील १९९७मध्ये प्रवीण ठिपसे हे ग्रँडमास्टर झाले तेव्हा. मात्र तेव्हापासून मुंबई नवीन ग्रँडमास्टरच्या प्रतीक्षेत आहे.
मुंबईला १९५०-६०च्या दशकात बुद्धिबळाची मोठी परंपरा होती. त्यावेळी भारतीय संघामध्ये मुंबईच्या बुद्धिबळपटूंचे वर्चस्व असायचे. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेची (एआयसीएफ) स्थापनाही मुंबईतच १९५१ साली झाली होती. आता एआयसीएफचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला विजेता मुंबईनेच १९५५ साली रामचंद्र सप्रे (संयुक्तरित्या) यांच्या रूपाने दिला. तेव्हापासून मुंबईने मागे वळून पाहिले नव्हते. १९६० मध्ये पहिली आंतरराज्य स्पर्धा येथे झाली. रुसी मदन, फारुख अली, हुसेन अली, श्रीकृष्ण साखळकर, खाडिलकर भगिनी, रघुनंदन गोखले, रामजी मेनन या बुद्धिबळपटूंनी मुंबईचे नाव उंचावले. मात्र ही संख्या आता कमी व्हायला लागली. सध्या विक्रमादित्य कुलकर्णी, आदित्य उदेशी, प्रसन्ना रावसारखे बुद्धिबळपटू मुंबईचे नाव खेळात कमावत असले तरी ते अजून ग्रँडमास्टर नॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतील एकमेव ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनादेखील ही बाब प्रकर्षाने जाणवली.
‘‘मुंबईसारख्या मोठ्या शहरातून एकच ग्रँडमास्टर असावा ही खरोखरीच खेदजनक बाब आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवणारे बुद्धिबळपटू शहरात असले तरी ते अजून ग्रँडमास्टपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. आता त्यादृष्टीने बुद्धिबळ संघटनेने उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे चेन्नई, विजयवाडासारख्या ठिकाणी दर महिन्याला चांगल्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धामध्ये खुला गट ठेवण्यात येत असल्याने भारतातील ग्रँडमास्टरनाही सहभागाची संधी मिळते. त्याचा फायदा तेथील लहान बुद्धिबळपटूंना होतो. कारण त्या मुलांना थेट ग्रँडमास्टरशी खेळायला मिळते. या धर्तीवर ग्रँडमास्टर सहभागी होऊ शकतील अशा मोठ्या स्पर्धाचे आयोजन मुंबईत करणे गरजेचे आहे. शहरात शालेय स्तरावरील बुद्धिबळपटूंसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवल्या जातात. मात्र त्या स्पर्धा नफा मिळवून देणा-या ठेवण्यापेक्षा बुद्धिबळपटूंनाही आर्थिक फायदा होतो का हे त्यातून जाणून घेतले पाहिजे. त्या स्पर्धेतील एखाद्या गुणवान बुद्धिबळपटूला ग्रँडमास्टपर्यंत पुढे आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जोडीला पालकांचीही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांना बुद्धिबळमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. मुंबईची एकेकाळी बुद्धिबळात मोठी परंपरा होती. मात्र गेल्या २० वर्षामध्ये भारतीय संघात निवडला गेलेला मी मुंबईचा एकमेव बुद्धिबळपटू आहे. त्यातच १९७६ नंतर मुंबईने राष्ट्रीय ज्युनियर विजेता दिलेला नाही. राष्ट्रीय सब-ज्युनियर विजेता मिळायला २००८ साल उजाडावे लागले. त्यावेळी ते जेतेपद उदेशीने पटकवले. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचीही बुद्धिबळातील प्रगती म्हणावी तितकी चांगली नाही. जळगावमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत राज्याचा एकही बुद्धिबळपटू नव्हता. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सोडा, देशातील स्पर्धेतही राज्याचा बुद्धिबळपटू नसेल तर काय म्हणावे तेच कळत नाही,’’ याकडे ठिपसे यांनी लक्ष वेधले.
या सर्व विषयावर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन रवींद्र डोंगरे यांची प्रतिक्रिया लक्षवेधी आहे. ‘‘बुद्धिबळात दर्जेदार प्रशिक्षक निर्माण होणे गरजेचे आहे. फक्त मुंबईतच नाही तर राज्यातही प्रशिक्षकांचा दर्जा उंचवायला हवा. ते पाहता प्रशिक्षकांसाठी चांगली शिबिरे आयोजित करायला हवीत. त्यातच मुंबईच्योबाबतीत सांगायचे झाल्यास मुंबईमध्ये इन्डोर स्टेडियमचा अभाव प्रकर्षाने दिसतो. बुद्धिबळासारखा खेळ पुढे येण्यासाठी इन्डोर स्टेडियमची नितांत गरज आहे. मुंबईत क्रीडा हॉस्टेलचाही अभाव दिसतो. याउलट पुणे, हैदराबादसारख्या ठिकाणी सुसज्ज इन्डोर स्टेडियम पाहायला मिळतात. मुंबईसारख्या शहरात बुद्धिबळ खेळासाठी लागणा-या पायाभूत सुविधा उंचावणे गरजेचे आहे,’’ याकडे डोंगरे यांनी लक्ष वेधले.
प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, विदित गुजराथी, अक्षयराज कोरे या महाराष्ट्राच्या ग्रँडमास्टरमध्ये आणखी वाढ होण्यासाठी स्वत: बुद्धिबळपटूंनीही खेळात नाव कमावण्याच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. दक्षिण भारतात तेथील उदयोन्मुख बुद्धिबळपटू शाळेमध्ये फक्त परीक्षेसाठी जातात. उर्वरित वेळ ते बुद्धिबळाची तयारी करण्यावर देतात. तेथील पालकांचाही मुलांनी बुद्धिबळामध्ये नाव कमवावे हा दृष्टिकोन बाळगलेला असतो. दक्षिण भारतात सध्या बुद्धिबळात नाव कमावलेल्यांची संख्या त्यामुळेच जास्त आहे. बुद्धिबळ संघटना बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देत असली तरी पालकांकडून मुलांनाही सर्वतोपरीने सहकार्य गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात जास्तकरून मुलांना गणिते चांगली सोडवता यावीत म्हणून लहान वयात पालक बुद्धिबळ स्पर्धा खेळवण्यासाठी पाठवतात. मात्र मुले बुद्धिबळात प्राविण्य मिळवू लागली की पुन्हा त्यांना पालक खेळ सोडायला लावतात अशी उदाहरणेही आहेत. बुद्धिबळातील गुणवत्ता असलेली मुले त्यामुळेच मागे पडतात. मुंबईत शाळांमधूनही बुद्धिबळ खेळ दिसतो. मात्र तो पुन्हा शालेय स्तरावरच राहतो. त्यातच काही मोठ्या शाळा देशातील नामवंत ग्रँडमास्टरना बोलवून त्यांना लहान मुलांसोबत खेळायला लावतात. मात्र तो उपक्रम तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो. मुंबईसारख्या शहरात महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धाही भरवण्यात येतात. मात्र त्यातही खूप मोठा संख्येने सहभाग अपेक्षित आहे. नुकत्याच झालेल्या चेसकुंभमध्येही अपेक्षेपेक्षा सहभागी बुद्धिबळपटूंची संख्या कमी होती, याकडे बुद्धिबळ संघटनेतील एका पदाधिका-याने लक्ष वेधले. हे सर्व पाहता पालकांनी मुलांना बुद्धिबळात कारकीर्द घडवण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तरच सध्या जास्तकरून दक्षिण भारताचे वर्चस्व असलेल्या या खेळात मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे बुद्धिबळपटूही भविष्यात ग्रँडमास्टर झालेले दिसतील.