अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना वेगळया विदर्भाचे सूतोवाच करून वादाच्या भोव-यात सापडलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक वादग्रस्त निर्णय घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मुंबई– अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना वेगळया विदर्भाचे सूतोवाच करून वादाच्या भोव-यात सापडलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक वादग्रस्त निर्णय घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, अशी टीका सर्वस्तरातून होत आहे.
राज्यात भाजपा सरकारचा शपथविधी झाला तरी विश्वासदर्शक ठराव मंजूर होण्याच्या आताच या सरकारने वादग्रस्त निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाचे सरकार आल्यास महाराष्ट्राचे तुकडे होतील, असा इशारा विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला होता. त्यासाठी आरबीआयची कार्यालये दिल्लीला हलविणे, मुंबई बंदराची वाहतूक गुजरातकडे वळविणे, सागरी प्रशिक्षण केंद्र गुजरातला हलवणे ही त्याची सुरुवात आहे, असेही त्यावेळी राणे यांनी सांगितले होते.
सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळय़ा विदर्भाबाबत विधान केले होते. त्याचाही राणे यांनी समाचार घेतला होता. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांनी आता मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे मुंबई महापालिकेला वेगळे करण्याचा डाव असल्याची टीका होऊ लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे नियंत्रण असते. आता शहरासाठी खास सीईओ नेमून राज्य सरकारचे हे नियंत्रण कमी करण्यात येईल. त्यानंतर हळूहळू राज्य सरकारचे मुंबईवरील नियंत्रण कमी करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, अशी ही रचना आहे!