महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.
मुंबई – महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुुरु आहे.
२४ तासांत दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे १५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर सांताक्रुझमध्ये ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत चांगला पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.
रेल्वेवाहतुकीवर परिणाम
पश्चिम रेल्वेवरील काही एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेवरील सायन आणि कुर्ला दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पश्चिम तसेच मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने होत आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असल्याने लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे.
पालघरमध्ये मुसळधार
मुंबईसह पालघर, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळी सात वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यात ४४५ मिमीची नोंद झाली आहे. पालघर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश पालघर जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गुजरातकडे जाणा-या गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पालघर-बोईसर मार्गही बंद करण्यात आला आहे.
विरारमधील २० गावांचा संपर्क तुटला
वसई विरारमध्येही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. विरारमधील २० गावांचा संपर्क तुटला आहे.