मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या उपनगरीय लोकल मार्गावर मागील १४ वर्षात तब्बल ५० हजार प्रवाशांचे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई- मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या उपनगरीय लोकल मार्गावर मागील १४ वर्षात तब्बल ५० हजार प्रवाशांचे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काँग्रेसचे आमदार अशोक जगताप, संजय दत्त, मुजफ्फर हुसैन सय्यद यांनी मुंबईतील रेल्वे अपघात रोखण्यासंबंधी उपाययोजनांसंदर्भात एक मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता.
उपनगरीय लोकल मार्गावरून २००२ ते जानेवारी २०१६ पर्यंत ५० हजार प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती उघड आल्यानंतर हे अपघात रोखण्यासाठी व त्यांच्या सुरक्षतेबाबत केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही केली जात आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक व्यवस्थेत सुधारणेसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात ५०:५० सहभाग तत्त्वावर मुंबई नागरी परिवहन प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पातील रेल्वे घटकांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड या रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांचा संयुक्त सहभाग असलेली कंपनी स्थापण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ अंतर्गत नवीन गाडयांनी खरेदी करणे, ‘डीसी’चे ‘एसी’मध्ये परिवर्तन करणे कुर्ला-ठाणे दरम्यान अतिरिक्त मार्गिका टाकणे व बोरिवली विरार मार्गाचे चौपदरीकरण करणे व विरार येथे अत्याधुनिक कारशेड उभारणे आदी प्रमुख कामे करण्यात आली आहेत तर टप्पा-२ अंतर्गत नवीन गाडयांसोबतच रूळ पार करता येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक भिंत बांधणे, स्टेशनवर सरकते जिने, हार्बर लाईनचा विकास, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकणे, ठाणे-दिवा दरम्यान पाचवी व सहावी मार्गिका टाकणे आदी कामांचा समावेश असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले.