मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुस-या दिवशीही कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई- मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुस-या दिवशीही कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उपनगरीय रेल्वे उशीराने धावत आहेत. अतिवृष्टीने अनेक गाव जलमय झाली आहेत. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. बुधवारी सकाळी हिंदमाता, एलफिन्स्टन, परळ, दादर, सांताक्रूझ, मालाड या भागात पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकल्स सुमारे अर्धा ते पाऊण तास उशीराने धावत आहेत.
रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने पूर्व आणि पश्चिम द्रृतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची दैना उडाली आहे. समुद्राला बुधवारी वर्षभरातली सर्वात मोठी भरती आहे. समुद्रात दुपारी एक वाजून २७ मिनिटांनी ४.९४ मीटर उंच लाट उसळणार आहे. यामुळे समुद्राजवळ न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहनही केले आहे.
मुंबईत सकाळी आठ वाजेपर्यंत कुलाबा येथे १५८.६ मिमी तर सांताक्रूज येथे १६८ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंब्रा बायपासवर खचला, ठाण्यातही पाणीच पाणी
मुंब्रा बायपासवर रस्ता खचला आहे. यामुळे जड वाहनांची वाहतूक ऐरोलीमार्गे अहमदाबाद महामार्गाकडे वळवण्यात आली आहे. ठाण्यात तीन हात नाका परिसरात वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. ठाण्यात आनंदनगर जकात नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घोडबंदर रोड वाहतूक कोंडी झाली असून चार ते पाच तासापासून वाहने खोळंबळी आहेत. वंदना टॉकीज, तलावपाळी, राम मारुती रोड व अन्य सखल भागात पाणी साचले आहे.
रायगड-जिल्ह्यातील गेल्या २४ तासाची आकडेवारी
कर्जत १११. ३ मि. मी., माथेरान १४० मि. मी., खालापूर १५४ मि. मी., पनवेल २१५ मि. मी., उरण २५७ मि. मी., रोहा १५८. ५ मि. मी., माणगाव ९७मि. मी., तळा १७४ मि. मी., सुधागड१११मि. मी., पोलादपूर १२६ मि. मी., म्हसळा १०२. २ मि. मी., श्रीवर्धन १२८ मि. मी., अलिबाग १२४ मि. मी. पावसाची नोंद झाली.
[EPSB]
ठाण्यात पावसाने घेतला मोटरसायकलस्वाराचा बळी »
मुसळधार पावसात वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मोटरसायकलस्वाराचा तोल सुटला आणि मागून आलेल्या ट्रकची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
मुंबई, ठाणे बेहाल (फोटो फिचर)
मुंबई आणि ठाण्याला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या दोन्ही शहरांतील सखल भागात पाणीच पाणी झाले. पावसामुळे शीव ते कुर्ल्या दरम्यान रेल्वे रुळांवर एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ा अडकून पडल्याने प्रवाशांनी गाडीतून उतरून रेल्वे रुळावरून चालत जवळचे स्थानक गाठणे पसंत केले.
[/EPSB]