मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामे वेळेत कामे न केल्यानेच मुंबईत खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
मुंबई – मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामे वेळेत कामे न केल्यानेच मुंबईत खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
मुंबईतील रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्डय़ांसंदर्भात आमदार चरणसिंग सप्रा यांनी लक्षवेधी मांडली होती. मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरातील रस्तेकामांची निविदा उशिराने काढल्याचा मुद्दा सप्रा यांनी उपस्थित केला होता.
मुंबईत सर्व ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र यावर राजकारण सुरू आहे. यासाठी जबाबदारी घेण्यावरून चालढकल सुरू असताना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला याप्रश्नी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचे पडसाद विधानपरिषद सभागृहात उमटले.
मुंबई महापालिकेकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या निविदेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. तर पूर्व उपनगरातील निविदा अद्याप रखडली आहे. या प्रक्रियेत जे. कुमार व महावीर या दोन कंत्राटदारांत वाद झाल्याने निविदेला १६ एप्रिल रोजी स्थगिती देण्यात आली होती.
यामुळे पूर्व उपनगरातील रस्त्यांची कामे अद्याप रखडली आहेत. पूर्व उपनगरातील १०७ रस्त्यांसाठी १६८ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. जे. कुमार कंपनीला पात्र ठरवण्यात आल्याने महावीर कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती, अशी माहिती सामंत यांनी दिली.
‘कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाका’
प्रशासन, रस्ते व न्यायालय यांच्यात सर्वसामान्य जनता भरडली जाते, यामुळे अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करावी व त्यांना काळय़ा यादीत टाका, असे स्पष्ट निर्देश उपसभापती वसंतराव डावखरे यांनी या वेळी दिले.