ठाण्यानंतर आता मुंबई महापालिकेतही याच तडजोडीप्रमाणे आघाडी झाल्यास सेना-भाजपाला प्रभावीपणे रोखता येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
मुंबई- ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे वृत्त सगळीकडे प्रसिद्ध होताच; मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करता येईल, याबद्दल सकारात्मक निर्णय येत्या चार दिवसांत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाणे महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे स्वागत केले असून; मुंबई महापालिकेतही याच तडजोडीप्रमाणे आघाडी झाल्यास सेना-भाजपाला प्रभावीपणे रोखता येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, असे जाहीर केले असले तरी पक्ष पातळीवर याबाबतचा अधिकृत निर्णय झालेला नसल्याने आघाडीची चर्चा होऊ शकते, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी मुंबईतल्या आघाडीसाठी बैठका होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने ३१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असली तरी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहीर यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण सोमवारी मुंबईत असून; येत्या चार दिवसांत आघाडीचा निर्णय होईल. या संदर्भात चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेसची भूमिका सकारात्मक असून; केवळ मुंबईत नव्हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्हा पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. चव्हाण पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवर यापूर्वीच आघाडी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत मात्र राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केल्याने काही अडचणी येऊ शकतात. दरम्यान, ठाण्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णयामुळे मुंबईत आघाडी करण्याचा फेरविचार होऊ शकतो, असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मनोमन वाटते.
आघाडी झाली नाही तर या फाटाफुटीचा फायदा सेना-भाजपा युतीला मिळेल. ही गोष्ट दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे मुंबईतील आघाडी दृष्टिपथात आहे, असे पक्ष नेत्यांनी सांगितले. मुंबईत काँग्रेसचे ५२ नगरसेवक असून, राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आहेत. त्यामुळे या ६६ जागांवर किमान आघाडी व्हावी; अन्य जागा समानपणे वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव पुढे आला आहे.