श्री गणरायांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून सार्वजनिक मंडळांचे गणपतीही मंडपात दाखल होऊ लागले आहेत.
मुंबई- श्री गणरायांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून सार्वजनिक मंडळांचे गणपतीही मंडपात दाखल होऊ लागले आहेत. येत्या गुरुवारी गणरायांचे आगमन सर्व घराघरांमध्ये होणार आहे. मात्र, त्यांच्या आगमनातील रस्त्यांवर अद्यापि खड्डयांचे विघ्न आहे.
शहरातील प्रत्येक विभागातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. आतापर्यंत मुंबईतील विविध रस्त्यांवर शेकडो खड्डयांचे साम्राज्य असून ते योग्यप्रकारे बुजवले जात नसल्यामुळे बाप्पांचे आगमन यंदा खड्डयांतूनच होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डयांची पाहणी महापौर अधिका-यांसह करतात; परंतु यंदा महापौरांनाही या खड्डयांचा विसर पडलेला आहे.
गणेशोत्सव असल्यामुळे २८ सप्टेंबपर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असा दावा महापालिका अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केला होता. आपण सर्व खड्डे बुजवल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, गणपती येण्यास दोन दिवसांवर आले असतानाही अनेक रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस नसल्यामुळे खड्डयांचा फारसा परिणाम दिसून येत नव्हता. मात्र, पावसाने उघडीप घेऊनही महापालिकेने हे खड्डे वेळीच न बुजवल्यामुळे दोन दिवसांपासून पडणा-या किरकोळ पावसामुळे अनेक भागांमध्ये खड्डे पडलेले आहेत.
भायखळा, फोर्ट, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, गोवंडी, मानखुर्द, गोरेगाव, चेंबूर, भांडुप, वांद्रे-खार पूर्व आदी भागांमध्ये खड्डयांचे प्रमाण अधिक दिसून येत आहेत. साधारणत: मुंबईतील अनेक भागांमधील रस्त्यांवर सुमारे चारशेहून अधिक खड्डे असल्याचे दिसून येते.
मुंबईत आतापर्यंत ४९७८ खड्डयांची नोंद पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे पालिकेच्या संकेतस्थळावर झाली. यात केवळ ४५१८ खड्डे बुजवले तसेच बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. मुंबईतील रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे खड्डयांच्या कामांबाबत आपण पूर्ण समाधानी नाही.
त्यामुळे आम्ही पुन्हा आयुक्तांना याची कल्पना देवून सर्व विभागांमधील गणरायांच्या आगमनाच्या मार्गावरील खड्डे भरले जावेत,असे निदर्शनास आणून दिले,असे बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केले.
पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमची आयुक्तांना भिती
महापालिकेने पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा वापर प्रथम केल्यानंतर पहिल्या वर्षी ३५ हजार खड्डयांची नोंद झाली होती. परंतु पुढे हे प्रमाणे १५ हजार आणि आता साडेचार पाच हजारांवर आले. खड्डयांचे प्रमाण उघड होत असल्यामुळे आपल्या अभियंत्यांना मोबाईलद्वारे छायाचित्र पाठवून तक्रार करण्यास पालिका अधिका-यांनी मज्जाव केला. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारींवरून खड्डयांची नोंद घेतली जात आहे.
मात्र, खड्डयांची तक्रार करण्याची जबाबदारी ही सर्व विभागांमधील अभियंत्यांची असून श्रीनिवास यांच्या निर्देशानुसार हे अधिकारी खड्डयांची ऑनलाईन तक्रार करतच नसल्याचे बोलले जाते. मात्र, आयुक्त अजोय मेहता यांनी या यंत्रणेलाच बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार केल्याचे बोलले जात आहे.
या प्रणालीमुळे मुंबईतील खड्डयांचे प्रमाण लक्षात येते. त्यामुळे माध्यमांना ही आकडेवारी सहज उपलब्ध होत असल्यामुळे मेहता यांनी ही प्रणालीच बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही महापालिकेच्या रस्ते विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडून समजते.