नुकतीच भारतीय रेल्वेला १६० वर्षे पूर्ण झाली. या दिवसाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या एका विशेष प्रदर्शनात अनेक छायाचित्रे, मॉडेल्स, दस्तावेज वैगरे मांडले होते. पण एक उणीव होती. जी, ना रेल्वे प्रशासनाला जाणवली, ना मुंबईकरांना. ती गोष्ट म्हणजे, या भारतीय रेल्वेचे जनक आणि मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचा कुठेही उल्लेख नव्हता, की त्यांची तसबीर तिथे ठेवली होती. नानांचा विसर पडणा-या रेल्वेची कीव करावी तेवढी कमीच आहे. रेल्वेच्या अधिका-यांचा कपाळकरंटेपणा त्यामुळे उघड पडला. मात्र नानांचे योगदान हे फक्त रेल्वेपुरतीच मर्यादित नसून मुंबई घडवण्याचे काम त्यांनी केले. ३१ जुलै हा नानांचा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा..
नानांना अवघ्या ६२ वर्षाचे आयुष्य लाभले. मात्र, या काळात त्यांनी केलेले सामाजिक कार्य आभाळाएवढे आहे. सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक व व्यापारविषयक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणारे आणि आपल्या दानशूर वृत्तीने केवळ मुंबई, महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर जगभरात लौकिक मिळवणारे नाना शंकरशेट यांच्यासारखा द्रष्टा समाजपुरुष दुसरा क्वचितच असेल. मुंबईची जडणघडण ज्याने केली त्यांच्या स्मारकासाठी एखादा भूखंड या महानगरीत, महानगरीच्या सत्ताधा-यांना आणि प्रशासकांना मिळू नये, हे नक्की कोणाचे दुर्दैव आहे, याचा आज विचार व्हावा.
शहापूर तालुक्यातील मुरबाड येथे दैवज्ञ ब्राह्मण समाजात मुरकुटे कुटुंबात १० फेब्रुवारी १८०३ या दिवशी नानांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी मातृवियोगाचे दु:ख त्यांना सहन करावे लागले. मात्र त्यांना आईवडील दोघांचे प्रेम त्यांना वडील बाबुलशेट यांनी दिले. त्यांनी नानांवर उत्तम असे संस्कार केले. याच संस्कारातून नानांसारखा थोर समाजसेवक घडला. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी नानांनी ‘दी नेटिव्ह स्कूल अॅण्ड बुक कमिटी’ सुरू केली. या समितीद्वारे त्यांनी स्वदेशीयांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाला. पण त्यामुळे नाउमेद न होता, नानांनी गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या सहकार्याने ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल अॅण्ड बुक सोसायटी’ असे या संस्थेने नामकरण करून शाळेचे पुनरुज्जीवन केले. कालांतराने म्हणजे १९२४मध्ये या संस्थेचे नामांतर ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ असे झाले.
मराठी पत्रकारितेचे अध्वर्यु बाळशास्त्री जांभेकर यांना शिक्षणासाठी नानांनी स्वत:च्या घरातच राहण्याची व्यवस्था केली होती. ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेच्या उभारणीत नानांचे मोठे योगदान होते. एलफिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना करण्यात नानांचा फार मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे सामाजिक कार्याने प्रेरित झालेल्या नानांनी त्या काळात स्त्रीशिक्षणासाठी मोठे कार्य केले. गिरगावातील आपल्या वाडय़ातील एक खोली त्यांनी कन्याशाळेसाठी दिली. एकोणीसाव्या शतकात भारतातील हिंदू मुलींची पहिली शाळा हीच होय. पुढे या शाळेचे नामकरण ‘जगन्नाथ शंकरशेठ स्कूल’ असे करण्यात आले. मुंबईत नानांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. त्या काळी गोरे बॅरिस्टर व्यक्ती खटले चालवत असत. नानांनी भारतीय विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण देणारी संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आज आपले वकील न्यायदान पद्धतीचा एक आवश्यक घटक आहेत. पण, याचा पाया रचणा-या नानांनी तत्कालीन इंग्रजांच्या काळात स्वदेशवासीयांना न्यायदान प्रक्रियेत स्थान मिळवून दिले होते, हे विसरून चालणार नाही. जमशेदजी जीजीभाई यांना जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेच्या स्थापनेसाठी नानांनी मोठय़ा प्रमाणात मदत केली होती.
त्या काळी जे. पी. अर्थात ‘जस्टीस ऑफ पीस’ हे पद म्हणजे सध्याचे विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पद आपल्या देशवासीयांना मिळावे म्हणून नानांनी अथक प्रयत्न केले. ही पदे फक्त इंग्रजांनाच मिळत होती. सर्वप्रथम ९ जे. पी. निवडले गेले त्यामध्ये पहिले स्वदेशी जे. पी. म्हणून नानांना गौरवण्यात आले. न्यायदान प्रक्रिया ज्युरी पद्धतीवर अवलंबून होती. खुनासारखे गंभीर खटले ज्युरी लोक पाहत असत. नानांच्या प्रयत्नांमुळे १८३६ या वर्षापासून देशवासीयांना ग्रॅण्ड ज्युरीत बसण्याचा अधिकार मिळाला, हे आजच्या वकिलांना विसरून चालणार नाही. १८३०मध्ये मुंबईत ‘अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ ही संस्था स्थापन करण्यात नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. सतीची चाल बंद करण्याच्या संदर्भात राजा राममोहन रॉय यांच्यासह स्वाक्षरी करून इंग्रज सरकारला अर्ज पाठवून तत्कालीन मुंबई इलाक्यात सतीची अघोरी प्रथा कायमची बंद व्हावी व कायद्याला अनुकूल असे लोकमत तयार व्हावे, यासाठी नानांनी अहोरात्र कष्ट उपसले. मुंबईत त्याकाळी प्रसूतिगृहांची वानवा असल्याने गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. नानांनी स्वत: आíथक योगदान देऊन मुंबईत पहिले प्रसूतिगृह स्थापन केले. बॉम्बे असोसिएशन स्थापन करण्यात नानांचा मोठा वाटा होता.
नानांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांची सन्मानपूर्वक कायदेमंडळात निवड केली. मात्र या पदाचा उपयोग केवळ स्वकियांसाठीच करून नानांनी जनतेची बाजू घेऊन अनेक लढे लढवले. सोनापूर स्मशानमूमी विधेयक, बालगुन्हेगार कायद्यात सुधारणा विधेयक, स्वदेशी वकिलांना केस लढवण्याचे हक्क विधेयक, दत्तक मुलांच्या मालमत्तेचे संरक्षण विधेयक, जुगार प्रतिबंधक विधेयक, शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारे विधेयक, १८६५चा पालिका कायदा व आयुक्तांचे अधिकार विधेयक, पालिका आयुक्त व इंजिनीअर यांचे वेतन विधेयक, उपजिल्हाधिका-याचे पोलिस खात्यावर अधिकार विधेयक, मामलेदारांना अधिकार मिळण्याबाबतचे विधेयक, रस्त्यावरील धूळ उपाययोजना विधेयक, अजाण मुलांच्या मालमत्तेचे संरक्षण विधेयक, महाराष्ट्रात मालकांचे समान न्याय विधेयक, जमिनीच्या मालकांचे हक्क राखणे, यासंबंधीचे विधेयक, विहार तलाव पाणीपुरवठा योजना विधेयक या सर्व विधेयकांमध्ये नानांचे योगदान होते. त्यांनी सुचवलेल्या बदलांची दखल घेणे त्यावेळच्या सरकारला भाग पाडले. नानांचा सरकार दरबारी दरारा होता. कारण त्यांचे कामच चोख व समाजाभिमुख तसेच नि:स्वार्थी, निरपेक्षवृत्तीचे होते.
नानांनी संस्कृत भाषेत अव्वल येणा-या विद्यार्थ्यांसाठी नामदार जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती सुरू केली. ही शिष्यवृत्ती आजही प्रतिष्ठेची समजली जाते. मुंबई विद्यापीठाची तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालयाची स्थापना नानांमुळे झाली. देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान अमूल्य आहे. ते भारतीय रेल्वेचे आद्य संस्थापक व संचालक होते. त्यांच्या पुढाकाराने १६ एप्रिल १८५३ या दिवशी भारतीय रेल्वेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मुंबई ते ठाणे ही रेल्वेसेवा सुरू झाली. आज भारतीय रेल्वे स्थापनेची १६० वष्रे साजरी करताना प्रशासनाला मात्र नानांचा विसर पडला आहे. अवघ्या ६२ वर्षाच्या आयुष्यात नाना शंकरशेट या व्यक्तीने केलेले हे कार्य शेकडो वर्षाची दूरदृष्टी लाभलेल्या आणि शेकडो विचारवंतांच्या मुशीतले आहे. इतक्या वर्षानंतरही त्यांचे कार्य, त्यांनी उभारलेल्या संस्थांसारखेच अमर आहे.