मुंबईच्या महापौरपदी विराजमान होऊन दोनच दिवस उलटत नाही तोच स्नेहल आंबेकर यांना लाल दिवा खुणावू लागला आहे.
मुंबई- मुंबईच्या महापौरपदी विराजमान होऊन दोनच दिवस उलटत नाही तोच स्नेहल आंबेकर यांना लाल दिवा खुणावू लागला आहे. महापौरपद कशासाठी असते व त्यांचे कार्य आणि अधिकार काय आहेत, याची कल्पनाही नसलेल्या स्नेहल आंबेकर यांनी महापौरांना राज्यमंत्र्यांचाच दर्जा हवाय, महापौरांना लाल दिव्याची गाडी हवी, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गटनेत्यांच्या मदतीने आपला लढा चालू राहील, असेही त्या म्हणाल्या.
मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर पहिला दिवस घाईगडबडीत आणि धावपळीत तसेच भेटीगाठीत गेल्यानंतर स्नेहल आंबेकर यांनी पत्रकारांशी गुरुवारी मनसोक्त गप्पा मारल्या. महापौरांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळायला हवा. यापूर्वीच्या महापौरांनीही तशी मागणी केली होती. त्यानुसारच आपणही पाठपुरावा करू, असे सांगितले. महापौरांना यापूर्वी लाल दिव्याची गाडी होती. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या गृहखात्याने न्यायालयाच्या आदेशानुसार परिपत्रक जारी करून महापौरांच्या गाडीवरील लाल दिवे काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसारच दिवे काढण्यात आले.
त्यामुळे नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांनी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळायलाच हवा, यावर जोर दिला. याबाबत सर्व गटनेत्यांशी चर्चा करून आपण पुढील पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहखात्याने सर्व महापौरांच्या गाडीचे लाल दिवे काढले. मात्र तरीही लाल दिव्याची मागणी करत महापौर आंबेकर यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. जर हा दर्जा पाहिजे असेल, तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. महापौरांचा असा अट्टाहास योग्य नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी लगावला आहे.