रणजी करंडकाच्या यंदाच्या हंगामात पहिलावहिला विजय मिळवण्यापासून मुंबई पुन्हा एकदा मुकण्याची चिन्हे आहेत.
इंदूर- रणजी करंडकाच्या यंदाच्या हंगामात पहिलावहिला विजय मिळवण्यापासून मुंबई पुन्हा एकदा मुकण्याची चिन्हे आहेत. मध्यप्रदेशला सोमवारी तिस-या दिवशी २४४ धावांत रोखून मुंबईने ६० धावांच्या आघाडीसह तीन गुण निश्चित केले. मात्र दिवसअखेर पाच बाद १९२ धावांची मजल गाठणा-या मुंबईकडे आता २५२ धावांचीच आघाडी आहे. यास्थितीत यजमानांना फलंदाजीचे आमंत्रण मुंबई देणार नाही हे निश्चित आहे. ते पाहता मुंबईच्या फलंदाजांनी जरी सकाळच्या सत्रात थोडी फलंदाजी केली तर ही लढत अनिर्णितावस्थेत संपण्याची शक्यता जास्त दिसते. खेळ थांबला तेव्हा अभिषेक नायर (खेळत आहे २६) आणि अंकित चव्हाण (खेळत आहे २) हे फलंदाज मैदानावर होते.
तत्पूर्वी, मुंबईच्या दुस-या डावात वासिम जाफरचे दमदार अर्धशतक (६७) मोलाचे ठरले. कौस्तुभ पवार (२७) आणि आदित्य तारे (४२) यांनीदेखील ६९ धावांची दणदणीत सलामी दिली. मात्र झटपट धावा करण्यात मुंबईला अपयश आले.
तत्पूर्वी, मुंबईच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे पहिल्या डावात आघाडी घेण्यात मध्यप्रदेशला अपयश आले. पाच बाद १९१ धावांवरून त्यांनी खेळ सुरू केल्यावर सत्यम चौधरी धावसंख्येत तीन धावांचीच (७६) भर घालून तंबूत परतला. त्याला अजित आगरकरने बाद केले. त्यापाठोपाठ मात्र हरप्रीत सिंगचे अर्धशतक (५०) वगळता मध्यप्रदेशचे फलंदाज एक बाजू धरून खेळू शकले नाहीत. आगरकर आणि नायर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर जावेद खानने शेवटच्या दोन विकेट्स एकाच षटकात घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई – ३०४ आणि ५ बाद १९२ (जाफर ६७, तारे ४२, अमरजीत ५१-२) वि. मध्यप्रदेश – २४४ (चौधरी ७६, हरप्रीत ५०, नायर ४६-३, आगरकर ५४-३)
विदर्भाचा विजय
कटक- विदर्भाने ‘बी ग्रूप’मधील लढतीत ओदिशावर सोमवारी तिस-याच दिवशी १०६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी २२६ धावांचे सोपे आव्हान गाठताना ओदिशा अवघ्या ११९ धावांत गारद झाला. अमोल जुंगडेच्या पाच विकेट्स हे विदर्भाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. तत्पूर्वी, दोन बाद ६४ धावांवरून दिवसाचा खेळ सुरू केलेल्या विदर्भाचा डावही १४० धावांत आटोपला. मध्यम तेज गोलंदाज आलोक मांगराजने पाच विकेट्स घेत विदर्भाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. विदर्भाचे आता सात लढतींतून १९ गुण झाले असून त्यांनी तिसरे स्थान पटकवले आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा अजूनही बाकी आहेत.
महाराष्ट्राला तीन गुण
पुणे- हर्षद खाडिवलेच्या दमदार शतकामुळे (१६८) महाराष्ट्राचे ‘बी ग्रूप’मध्ये बडोद्याविरुद्धच्या लढतीत तिस-या दिवसअखेर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण निश्चित झालेत. बडोद्याच्या पहिल्या डावातील ३६२ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने दिवसअखेर सात बाद ३७६ अशी मजल गाठली. कर्णधार रोहित मोटवानीच्या ९१ धावाही महत्वपूर्ण ठरल्या. ग्रूपमध्ये महाराष्ट्र शेवटच्या स्थानावर असल्याने आता ‘सी ग्रूप’मध्ये घसरण्यापासून वाचणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान आहे.
केरळचा मोठा विजय
मलाप्पुरम– केरळने ‘सी ग्रूप’मधील लढतीत झारखंडवर एक डाव आणि ३५ धावांनी मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात २०५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या झारखंडचा दुसरा डाव १७० धावांमध्ये आटोपला. मध्यम तेज गोलंदाज संदीप वारियरच्या सहा विकेट्स हे केरळच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
सौराष्ट्र-राजस्थान रंगतदार स्थितीत
जयपूर– गतविजेता राजस्थानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सौराष्ट्राला मंगळवारी (२५ डिसेंबर) २९५ धावा करण्याचे आव्हान आहे. राजस्थानने सोमवारी त्यांचा दुसरा डाव नऊ बाद २३४ धावांवर घोषित करत सौराष्ट्रासमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले.
हैदराबादचे तीन गुण निश्चित
हैदराबाद – रेल्वेविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दिवसअखेर दुस-या डावात हैदराबादची सहा बाद १३० अशी स्थिती झाली आहे. मात्र त्यांच्याकडे आता २५४ धावांची आघाडी असल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर यजमानांचे तीन गुण निश्चित आहे.
पंजाबला विजयाची संधी
वलसाड- ‘ए ग्रूप’मध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या पंजाबला हंगामात पाचवा विजय नोंदवण्याची संधी आहे. गुजरातविरुद्ध मंगळवारी पंजाबला विजयासाठी २३० धावांचे सोपे आव्हान आहे. तत्पूर्वी गुजरातचा दुसरा डाव २३२ धावांत गुंडाळण्यात पंजाबला यश आले. गुजरातविरुद्ध विजय मिळवल्यास पंजाबचे ३७ गुणांसह अव्वल स्थान आणखी भक्कम होणार आहे.