भाईंदर पश्चिमेकडील जेसल पार्क येथील चौपाटीनंतर मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी नवघर येथे ३० एकर जागेत लवकरच तिसरी चौपाटी विकसित करण्यात येणार आहे.
भाईंदर- भाईंदर पश्चिमेकडील जेसल पार्क येथील चौपाटीनंतर मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी नवघर येथे ३० एकर जागेत लवकरच तिसरी चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. वॉटर स्पोर्ट्स, प्रवासी जलवाहतूक, बगीचा आदी या चौपाटीची ठळक वैशिष्टय़े आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मेरिटाइम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही चौपाटी साकार होणार आहे.
भाईंदर पूर्वेकडील नवघर येथे आरक्षण क्रमांक ‘१२२-अ’ हा भूखंड चौपाटीसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी अद्ययावत चौपाटी विकसित करावी, जेणेकरून नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणखी एक नवे साधन निर्माण होईल यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी शनिवारी या जागेची पाहणी केली. जागा पाहिल्यानंतर चौपाटी विकसित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा निर्वाळा मेरिटाइम बोर्डाच्या अधिका-यांनी दिला. या ठिकाणी सुसज्ज चौपाटीसह, वॉटर स्पोर्ट्स, प्रवासी जलवाहतूक, गणेश विसर्जनघाट, जेटी, बगीचा तसेच धार्मिक विधींसाठी निवारा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी येणारा संपूर्ण खर्च मिरा-भाईंदर महानगरपालिका करेल तर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रत्यक्ष ही योजना कार्यान्वित करेल. चौपाटीच्या कामाला वेग येण्यासाठी जेसल पार्क ते घोडबंदर या रस्त्याचे काम जलदगतीने सुरू व्हावे, या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी दिले. येत्या आठ दिवसांत या संबंधीचे कच्चे आराखडे तयार करण्याचे यावेळी नक्की करण्यात आले.
घोडबंदर येथे प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी याव्यतिरिक्त घोडबंदर येथील रेतीबंदरालाही या पर्यटन विकास महामंडळाच्या व मेरिटाइम बोर्डाच्या अधिका-यांनी भेट दिली. या ठिकाणी सुसज्ज वाहनतळ उभारून गुजरातकडून येणा-या प्रवाशांना मुंबई व ठाणे येथे जाण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने अधिका-यांनी पाहणी केली. दररोज महामार्गाने प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी उतरतील व घोडबंदर येथून बोटीने ठाणे व मुंबई येथे जातील, अशी ही संकल्पना आहे. रस्ते वाहतुकीदरम्यान मोठया प्रमाणावर वेळ वाया जात असल्याने जलवाहतुकीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असून घोडबंदर हे मध्यवर्ती ठिकाण मानून मुंबई, ठाणे व उरण हे जलमार्गाने एकमेकांशी जोडण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी यावेळी दिली.