मिझोराम म्हणजे देशातील दुर्गम राज्यांपैकी एक. या राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र..
मिझोराम म्हणजे देशातील दुर्गम राज्यांपैकी एक. या राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या अतिउंचावर असलेल्या राज्यात अतिशय दुर्गम भागात असलेल्या नागरिकांना मतदानाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी निवडणूक अधिका-यांची तारेवरची कसरत सुरू आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रापर्यंत निवडणूक अधिका-यांना पोहोचवण्यासाठी अवजड वाहनांपासून ते लहान नावांपर्यंत सर्व पर्यायांचा वापर केला जात आहे.
काही वेळा तर अधिका-यांना उंचावरील मतदान केंद्रात पायी चालून आणि गिर्यारोहण करून पोहोचावे लागत आहे. वाहतुकीसाठी आम्ही अवजड वाहने, मध्यम आकाराची वाहने, हलकी वाहने , दुचाकी आणि लहान नावांचा वापर करत आहोत. तर जिथे ही वाहनेही पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी अधिका-यांना पायी चालत जावे लागत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिली. या निवडणुकीसाठी १८००हून जास्त वाहनांची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये २२९ बस, १२ नावांचा समावेश आहे. तर २७ ठिकाणी दुचाकी आणि गिर्यारोहणाच्या साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या राज्यात काही ठिकाणे तर अशी आहेत की तेथे जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते आणि या नद्यांवर पूलही नाहीत. त्यामुळे या भागात जाण्यासाठी छोट्या नावांचा वापर करावा लागणार आहे. लवांगतलाई आणि सैहा हे राज्यातील अतिशय दुर्गम भाग आहेत. तेथे जाण्यासाठी नावांचा वापर केला जाणार आहे.
सुमारे २१००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेल्या या राज्यात ठिकठिकाणी द-या, तलाव, नद्या आणि टेकड्या आहेत. त्यामध्ये २१ मोठ्या टेकड्या असून त्या संपूर्ण राज्यभर पसरलेल्या आहेत. या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये निवडणूक आयोग सुरक्षा दलाचे ५८०६ जवान तैनात करणार आहे.
१० लाख लोकसंख्येच्या या राज्यात ६.८६लाख मतदार आहेत. विधानसभेच्या ४० जागांसाठी १४२ उमेदवार रिंगणात आहेत.