बेपत्ता ८२ घरमालकांचा शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने त्यांची घरे म्हाडाने ताब्यात घेतली असून, या घरांचा आता मास्टर लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई – बेपत्ता ८२ घरमालकांचा शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने त्यांची घरे म्हाडाने ताब्यात घेतली असून, या घरांचा आता मास्टर लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही घरे मास्टर लिस्टमध्ये पात्र ठरणा-या रहिवाशांना देण्यात येणार असल्याचे दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी डॉ. रमेश सुरवाडे यांनी सांगितले.
म्हाडाने दक्षिण मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना हक्काची घरे दिली होती. यातील काही रहिवाशांनी घराचा ताबा घेतला. मात्र ११० रहिवासी घराचा ताबा घेण्यासाठी आलेच नाही. घरे लागल्याचे कळवूनही ते ताबा घेण्यास येत नसल्याने म्हाडाने जाहिरात देऊन त्यांना त्याबाबत सूचना केल्या. तसेच त्यांना मिळालेल्या घरांवर नोटिसाही चिकटवल्या त्यानंतर यातील २८ जणांनी म्हाडाशी संपर्क साधला. मात्र अजूनही ८२ मालकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. म्हाडाने सातत्याने जाहिराती व अन्य माध्यमातून त्यांचा शोध घेतला, पण हे ८२ मालक पुढे आलेच नाहीत. अखेर मागील महिन्यात शेवटची जाहिरात देऊन त्यांना सात जून ही अखेरची मुदत देण्यात आली. या जाहिरातीनंतरही या घरांच्या मालकांनी प्रतिसाद दिलेला नाही.