‘मासिक पाळी व्यवस्थापन’ च्या मार्गदर्शिका डॉ. तरुलता धानके यांचा राज्य सरकारकडून गौरव करण्यात आला आहे.
भिवंडी- ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ च्या मार्गदर्शिका डॉ. तरुलता धानके यांचा राज्य सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. शासनस्तरावर विविध योजना राबवताना अधिकारी व कर्मचारी कौशल्यपणाला लावून उपक्रम यशस्वी करतात. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत गौरव करण्यात येतो.
राज्य शासनाने घेतल्याने गुणवंत अधिकारी पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भिवंडी तालुका पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांना राज्य शासनाने ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ उपक्रमाबाबत प्रशस्ती पत्रक व स्मृती चिन्ह असा पुरस्कार देवून गौरव केला आहे.
२१ व्या शतकात वाटचाल करणा-या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे अज्ञान आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक मुली ‘त्या’ दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत. अथवा आपल्या कामकाजापासून दूर राहतात. या विषयी त्यांचे पालकही आग्रह धरून मुलींना शाळेपासून वंचित ठेवतात असे भिवंडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्या निदर्शनास आले. या विषयी त्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचे ठरवून तत्कालीन ठाणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
त्यांनी तत्काळ मान्यता दिल्याने डॉ. तरुलता धानके यांनी संपूर्ण ठाणे जिल्हा (तत्कालीन पालघर जिल्ह्यासह) पादाक्रांत करून आदिवासी दुर्गम भागातील शाळांना भेटी देवून मुलींशी संवाद सुरू केला. या वेळी अज्ञानपणामुळे मुलींना गुप्तांगाचे आजारही जडल्याचे निदर्शनास आले. तर अशा आजारावर उपचारासाठी काही मुलींनी ‘बाम’ वापरल्याचे आढळले. ठाणे जिल्ह्यात ८ टक्के मुलींना अद्यापही मासिक पाळीविषयी अज्ञान असल्याचे आढळले. किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींमध्ये या विषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आरोग्य विभागाच्यावतीने विशेष कार्यशाळांचे आयोजन करून या मुलींमधील अज्ञान व भीती दूर करण्याचे प्रयत्न डॉ. धानके यांनी केले आहे.
मासिक पाळी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून आदिवासी पाडे आणि ग्रामीण भागात जनजागृती करून आजपावेतो जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील शाळेत जाणा-या तसेच शाळाबाह्य किशोरवयीन ४५ हजार मुलींचे प्रबोधन करून मुलींना मासिक पाळीविषयी असणा-या अज्ञानातून उदभवणा-या आरोग्याच्या समस्यांचे निरसन करून आत्मविश्वास निर्माण केला आहे. हा सामाजिक उपक्रम राबवताना शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी व आशा कार्यकर्ती आदींचीही मदत घेण्यात आली आहे.
डॉ.तरुलता धानके निव्वळ आशा कार्यकर्त्याकडून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून थांबल्या नाहीत तर त्यांनी मुलींना व पालकांना विश्वासात घेवून जनजागृती केली व त्यांच्या वर्तनात बदल घडवून चुकीच्या रूढी, परंपरा, अंधविश्वास मनातून दूर केल्या आहेत. या यशस्वी उपक्रमाची केंद्र सरकारनेही दखल घेतली असून उत्तर प्रदेश सरकारचे आरोग्य विभागाचे पथक माहिती घेण्यासाठी नुकतेच मुंबईला येवून गेले. त्यामुळे डॉ. धानके यांचा मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.