कोकण ही श्रद्धाळू माणसांची भूमी आहे. या भूमीचा अलौकिकपणा येथील संस्कृती आणि देखणेपणा साराच कसा भव्यदिव्य सरंजाम. इथला इतिहासही तितकाच मनोरंजक आणि शौर्यपूर्ण आहे. या निसर्गसंपन्न भूमीत श्रद्धेला अनोखं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मुळेच हजारो देवराया इथे उभ्या आहेत. या देवरायांमधले निसर्गदेव त्यांची शक्ती, त्यांची गूढ प्रचिती, त्या-त्या भागातल्या लोककथा आणि परंपरा हे सारंच काही अतक्र्य..! सिंधुदुर्गात मंदिरं किती, हा खरं तर चर्चेचा मुद्दाच ठरावा..
देवाचं अस्तित्व चराचरात आहे, असं मानणारी आपली हिंदू संस्कृती. आपण देवाला मनोभावे हाक मारावी आणि त्याची प्रचिती घ्यावी. बिनधास्त पाऊल टाकावं आणि निर्धास्तपणे यश मिळवावं, असा मालवणी मुलखातील रिवाज. पण जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९७५ मंदिरं आहेत. यातील पश्चिम देवस्थान समितीकडे १९७ मंदिरं आहेत. सर्व गावातील पाषाणे, मूर्तीची संख्या सुमारे ३५ हजार १४२ आहे. याशिवाय निसर्ग देवता, राईतली पाषाणे, देवळाबाहेरचे विरगळ ही श्रद्धेची स्थानेही आहेत. राईतील फांदीही तोडू नये, यासाठी पूर्वापार चालत आलेले काही नियमही आहेत.
या देवभूमीत पंचमहाभूतांचं दर्शन ठायी ठायी घेता येते. गावच्या प्रत्येक सीमेवर दगडफुलांचे वरंडे आहेत. इथे फुलं म्हणून दगड फेकले जातात. देवाचं नाव घेत पुढे पाऊल टाकलं जातं. दैत्यगुरू शुक्राचार्य यांची मूर्ती सहसा आपल्याकडे दिसत नाही. परंतु, कुडाळ तालुक्यातल्या नेरुरच्या मंदिरात ही मूर्ती पाहायला मिळते. देवगड तालुक्यातल्या हिंदळे गावी काशीविश्वेश्वराच्या मंदिरासमोर शंख, गदा, कमळ, चक्रधारी देवतांच्या मूर्ती आहेत. ही ‘हरितालिका’असल्याचं सांगितलं जातं. विष्णूच्या २४ मूर्तीपैकी ही कृष्ण मूर्ती मानली जाते. याच हिंदळे गावात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन पुढे व तीन मागे अशा सहा मूर्ती आहेत. या षडाननाशेजारी एक गणेशमूर्तीही आहे. या गजाननाच्या सोंडेला मात्र वेढा दिसतो. या आगळ्यावेगळ्या मूर्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळतात हे विशेष. खारेपाटण इथल्या कपिलेश्वर मंदिरात सातव्या शतकातील चालुक्यकालीन सूर्यनारायणाची मूर्ती पाहायला मिळते. तर ओटव गावी जगदंबा भवानी देवीची पितळी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.
प्रत्येक मंदिराबाहेर विरगळ आहेत. त्या-त्या विरगळांमागे त्या-त्या भागातील लोककथा आहे. परंतु, कणकवली तालुक्यातल्या साकेडी गावी चार कप्प्यांचा अतिसुबक विरगळ आहे. मांगल्याच्या मठातल्या दगडी शिल्पाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आजगावमध्ये उभ्या परशुरामाची मूर्ती, विजयदुर्ग भागातील नृसिंह मंदिर, सांगेली गावातील श्री चौदाश्री देवीची मूर्ती, येथील फणसाच्या खोडापासून तयार होणारा गिरोबा त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी दरवर्षी छतापासून वेगळं केलं जाणारं मंदिर आणि गिरोबाच्या पूजनानंतर ठेवण्यात आलेल्या खोडांची काशीयात्रा सारंच मंत्रमुग्ध करणारं. तेरवण मेढे येथील सरस्वतीदेवीची मूर्ती असो वा ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असणारी सोनुर्लीच्या माऊली देवीची छबी पाहाणं, म्हणजे देवभूमीतील एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव. उभ्या मूर्तीच्या तीन हातात तलवार, त्रिशूल आणि ढाल तर एका हाताने रेडय़ाची जीभ पकडली आहे. सावंतवाडी आजगाव येथील साडेपाचशे वर्षापूर्वीची आदित्यनाथाची मूर्तीही तेजोमय आहे. सोनवडे गावातील चतुर्भुज महिषासुरमर्दिनीची मूर्ती एका अर्वाचीन शिल्पामध्ये मोडते.
चेंदवण गावच्या माऊलीच्या दशभुजा मूर्ती, झारापची देवी भावईची मूर्ती, माणगावच्या याक्षिणी मंदिरातील कलाकुसर, आकेरीच्या रामेश्वर मंदिरात दगडी पलंग, सावंतवाडीतली ‘कलैय्या-मलैय्या’ देवस्थान, कांदळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला वड, आंगणेवाडीची भराडी माता, रेडीच्या माऊलीचं मंदिर, आरवलीचा वेतोबा सारंच अतक्र्य असं आहे.
श्रद्धेच्या गाथेमध्ये आणि कोकणचा सांस्कृतिक इतिहास न्याहाळताना डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी संप्रदायानुसार कोकणच्या देवस्थानांची रचना सांगितली आहे. रवळनाथ संप्रदाय, सातेरी, वेतोबा, दत्त, रामदासी संप्रदाय परंपरा, सूर्योपासनेची परंपरा हे सारंच प्रत्येक मंदिरात दर्शन घेताना लक्षात येते. जिल्ह्यात रवळनाथाच्या मंदिरांचा वेध घेता वेंगुर्लेत- २६, कणकवली (वैभववाडीत)- १६, देवगड- ११, कुडाळ- ३१, सावंतवाडी (दोडामार्ग)- ५३, मालवण- ३७ तर गोवा- ४९ अशी मंदिरांची संख्या आहे. सातेरी मातेचीही मंदिरं सिंधुदुर्गात सर्वाधिक आहेत. माऊलीच्या मंदिराची ख्याती सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले भागात अधिक आहे. तर वेतोबाची सिंधुदुर्गात तब्बल १४३ मंदिरं आहेत. तर सर्वाधिक सावंतवाडीत (दोडामार्ग)- ३७, वेंगुर्ले- २९, मालवण- २७, कुडाळ- २१, कणकवली (वैभववाडी)- १९, देवगड- १० मंदिरं आहेत. मालवण मुलखातील प्रत्येक गावाची परंपरा वेगळी आहे. तशीच मंदिरांची रचनाही वेगळी आहे. मात्र श्रद्धेचं सूत्र एक आहे.
प्रत्येक दैवतांचे वार्षिक जत्रोत्सव, सप्ताह, दिंडी, नित्योत्सव आणि परंपरा यातूनच गावचं गावपण जपलं गेलं आहे. यामुळेच मालवणी मुलखाची सांस्कृतिक परंपराही टिकली आहे.