मालवणीतील तीन तरुणांपैकी मोहम्मद अजिज वाजिद खान याला मंगळवारी पुण्यातून अतिरेकीविरोधी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याची आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
मुंबई- इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेल्या मालवणीतील तीन तरुणांपैकी मोहम्मद अजिज वाजिद खान याला मंगळवारी पुण्यातून अतिरेकीविरोधी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याची आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
त्याच्यासोबतचे अन्य दोन तरुण नूर मोहम्मद शेख आणि मोहसीन शेख मात्र त्याला चेन्नईला सोडून निघून गेले असून त्यांचा अद्याप शोध लागला नाही. मात्र ते दोघे अद्याप भारतात असून त्यांचा शोध घेण्यासाठी एटीएसने विशेष मोहीम सुरू केली आहे.
मोहम्मद वाजिदकडून पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र याबाबत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. ३० ऑक्टोबरला मालवणीत राहणारा मोहम्मद अय्याज सुलतान हा घरातून निघून गेला होता. अय्याज हा पदवीधर असून एका कॉलसेंटरमध्ये कामाला आहे.
पदवीचे शिक्षण घेत असताना त्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर संगणकाचा कोर्स पूर्ण करून तो कॉलसेंटरमध्ये कामाला होता. त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र पैशांमुळे त्याला त्याचा व्यवहार सुरूकरता आला नाही.
घरातील एकमेव कमावता तरुण असलेला अय्याज सध्या आई, बहीण आणि भावासोबत राहत होता. कुवेतमधून एका खासगी कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आहे, त्यामुळे पुण्याला जावे लागत असल्याचे सांगून तो ३० ऑक्टोबरला घरातून निघून गेला होता.
त्याच्यानंतर मोहम्मद अब्दुल अजिज वाहिद खान आणि मोहसीन हे घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. वाजिद हा आधारकार्ड बनविण्यासाठी जातो असे सांगून निघाला, तर मोहसीन हा रिक्षाचालक असून त्याने मित्राच्या लग्नासाठी जात असल्याचे सांगितले होते. घरातून गेलेले ते तिघेही परत आले नाहीत म्हणून त्यांच्या पालकांनी मालवणी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.
ते तिघेही इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी घरातून निघून गेल्याची चर्चा मालवणी परिसरात सुरू झाल्यानंतर त्याची मालवणी पोलिसांनी गंभीर दखल घेत ती माहिती अतिरेकीविरोधी पथकाला दिली होती.
या माहितीनंतर मुंबई एटीएसच्या अधिका-यांनी घरातून निघून गेलेल्या या तिघांची माहिती काढून त्यांचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच मंगळवारी मोहम्मद अजिज वाहिद खान याला पुण्यातून स्थानिक एटीएसच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो बेळगावहून मुंबईला जात होता.
याच दरम्यान त्याला एका खासगी बसमधून या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईतील एटीएस मुख्यालयात आणण्यात आले होते. तिथेही त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली होती.
या चौकशीनंतर त्याला मालवणीतील त्याच्या घरी नेण्यात आले होते. रात्रभर तो त्याच्या पालक, नातेवाईक आणि मित्रांसोबत होता. मात्र सकाळी त्याला पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिवसभर त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती.
घरातून निघून गेल्यानंतर वाजिद, मोहसीन आणि नूर मोहम्मद हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी फिरले, त्यानंतर ते चेन्नईला गेले होते. चेन्नईहून वाजिद हा मुंबईला जाण्यासाठी निघाला तर अन्य दोघे तिथेच राहिले होते. त्याने इसिस संघटनेत दाखल होण्यासाठी घर सोडल्याचे बोलले जाते. मात्र त्याच्या चौकशीतून पोलिसांना याबाबतचे ठोस पुरावे सापडले नाहीत. त्याच्या कुटुंबीयांनी वाजिद हा पत्नीला कंटाळून घर सोडून गेला होता असे सांगितले.
दहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. मात्र इस्लामसाठी काहीतरी करायचे आहे असे त्याला नेहमीच वाटत होते. त्यामुळे त्याचे पत्नीशी सतत खटके उडत होते असे बोलले जाते. याच रागातून तो घरातून निघून गेला होता, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. वाजिद हा इसिस संघटनेत सामील झाला नसला तरी त्याला या संघटनेत सामील होण्याची
इच्छा होती असेही आता बोलले जाते. दुसरीकडे मालवणीतून अय्याज सुल्तान, मोहसीन शेख आणि वाजिद खान हे तीन तरुण वेगवेगळे कारण सांगून घरातून निघून गेल्यानंतर अन्य एक तरुण अशाच प्रकारे निघून गेला होता. नूर मोहम्मद शेख असे या तरुणाचे नाव आहे.