पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायत आणि पर्यटन समितीच्या वतीने २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘सागरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी – पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायत आणि पर्यटन समितीच्या वतीने २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘सागरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी सिनेकलावंत दिगंबर नाईक, राहुल मेहेंदळे, शुभदा पाटणकर आणि ऋषिकेश दळी यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. साधना साळवी, पंचायत समिती सदस्य प्रकाश साळवी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रसाद पाटील, सदस्य सनी मयेकर, डॉ. निशिगंधा पोंक्षे आदी उपस्थित होते. राजेंद्र शिंदे म्हणाले की, गणपतीपुळे आणि मालगुंड या भागांत मोठय़ा संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. परंतु, येणारा पर्यटक जास्त दिवस थांबत नाही. त्यामुळे मालगुंड, गणपतीपुळेसारख्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांनी अधिकाधिक दिवस राहावे, इथला परिसर पाहावा, विविध स्थळांना भेटी द्याव्यात यासाठी सागरी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२५ ते २८ डिसेंबर या कालावधीत मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी संतोष भिसे, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी बबन जाधव, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या दिवशी २५ तारखेला सायंकाळी जाकडी व नमन आदी कार्यक्रम होणार आहेत. श्री चंडिका जाखडी कलापथक, बाबा आग्रे व सहकारी यांचे पथक हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
२६ रोजी सायंकाळी सात ते १० या वेळेत कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ-पिंगुळीतील कलाकार हा कार्यक्रम करणार आहेत. शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ‘दिसता तसा नसता’ हे विनोदी मालवणी नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे सादरकर्ते दिगंबर नाईक हे असून, याप्रसंगी सिनेकलावंत दिगंबर नाईक यांच्यासह राहुल मेहेंदळे, शुभदा पाटणकर, ऋषिकेष दळी यांची उपस्थिती राहणार आहे. शनिवारी समारोपाच्या दिवशी ‘मराठमोळी परंपरा’ हा कार्यक्रम होणार आहे. गणपतीपुळेच्या सरपंच रीमा बापट आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या सांगता समारंभासाठी राजापूरचे आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सागरी महोत्सवासाठी मोठय़ा संख्येने पर्यटकांनी हजेरी लावावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.