पिंपरी-चिंचवड येथील ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपले. अभूतपूर्व झाले! सर्व अर्थाने अभूतपूर्व! देशातले बहुभाषिक ‘ज्ञानपीठ’ विजेते या संमेलनाला उपस्थित राहणे, प्रख्यात कवी, कथाकार गुलजार आणि संवाद लेखक, गीतकार जावेद अख्तर यांची उपस्थिती संमेलनाला एका उंचीवर घेऊन गेली. गुलजार ८४ वर्षाचे. त्यांच्या चेह-यावरचे सात्विक तेज, त्यांच्या चारित्र्याचे तेज आहे. आयुष्यभर लेखणीशी ईमान ठेवून लिहिणारी ही मंडळी आहेत. तडजोड करीत नाहीत आणि जीवनातला जास्तीत जास्त आनंद सर्वाना वाटता यावा, यासाठी आपले सगळे कौशल्य पणाला लावून ही माणसे लिहित असतात. त्यामुळेच ‘आँधी’, ‘परिचय’ असे आशयधन चित्रपट पाहायला मिळतात. आज अमिताभ बच्चनचा जो बोलबाला आहे, त्याचे संवाद ‘सलीम-जावेद’ याच नावाखाली दडलेले आहेत. तेव्हा संवाद आणि भाषेचे महत्त्व हे सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे. तुकारामांनीच सांगून ठेवले आहे, ‘आम्हा घरी शब्दाचे धन..’ या शब्दाच्या धनाची मुक्त उधळण ८९व्या साहित्य संमेलनात झाली. २०-२२ परिसंवाद, चार कवी संमेलने, तीन मुलाखती, बालकांचा मेळावा अशा सर्व विषयांना स्पर्श करणारे हे संमेलन ठरले.
वाद अनेक संमेलनात असतात. या संमेलनात ते पराकोटीला जाणार होते. संमेलन धोक्यात आले होते; पण शेवटी शहाणपणाचा विजय झाला आणि ते सगळे टळले. राजकारणी संमेलनात असावेत की, नसावेत हा वाद आता पार घासूनपुसून जुना झाला आहे; परंतु या संमेलनात श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भाषणाने (लिखित आणि अलिखित) काही महत्त्वाच्या मुद्यांची चर्चा केली. संमेलनाला झोडपायचे, असे ठरवून ज्यांनी झोड झोड झोडपले त्यांच्या नकारात्मक पत्रकारितेने मराठीचे काहीही नुकसान होणार नाही. या संमेलनाच्या निमित्ताने स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मराठी भाषा संचित आणि नव्या दिशा’ हा विजय कुवळेकर या प्रख्यात पत्रकाराने संपादित केलेला ग्रंथ हे संमेलनाचे संचित आहे, असे मानले पाहिजे. ‘भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य’ हा साहित्य परिषदेने प्रकाशित केलेला ग्रंथही या संमेलनाचे वैभव आहे. रसिक भाषणे विसरून जातील. राहतो तो ग्रंथ. ज्ञानपीठ विजेत्यांचा सन्मान हा या संमेलनाचा आणखी एक अत्यंत उच्च दर्जाचा कार्यक्रम तसेच माजी अध्यक्षांचा सन्मान हाही तेवढाच महत्त्वाचा. या संमेलनात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली की, केवळ चेतन भगत यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण संमेलनात १५ ते ३०-३५ वयोगटातले तरुण-तरुणी ज्या प्रचंड संख्येने सर्व कार्यक्रमांना उपस्थित होते, ते दृश्य अत्यत विलक्षण आणि फार आशादायी आहे. कवी संमेलनातील ग्रामीण कवींच्या कविता तर थक्क करणा-या होत्या. संदीप वासलेकर, ज्ञानेश्वर मुळे, श्री ठाणेदार यांच्या मुलाखतीने तरुणाईला वेडे केले. आजचे तरुण भरकटलेले आहेत, ही गोष्ट खरी नाही. त्यांना काही नवीन समजून घ्यायचे आहे. त्यांच्या भाषेत त्यांना ते सांगायला हवे. या तरुणांना समजावून घेऊन त्यांना काय द्यायचे आहे, हे आजच्या मध्यम पिढीने ठरवायला हवे. आजच्या लहान मुलांना काऊ-चिऊच्या गोष्टीत आता रस नाही. त्याचप्रमाणे मुलांना परिकथेमध्येही रस राहिलेला नाही. आजच्या परवलीच्या विज्ञान काळात ‘अ’ – अननसातला याच्या पलीकडे या पिढीला ‘अ’-अॅपमधला आणि ‘ड’- डाऊनलोडमधला अशी वेगळी विज्ञानाची परिभाषा समजू लागलेली आहे. त्यामुळे आजचा तरुण त्याच्या हातातल्या वैज्ञानिक आयुधांनी जी भाषा बोलतो आहे, ती भाषा अधिक गतिमान आहे. आधी लिहून, मग छापून, मग वाटून, वाचक वाचेपर्यंत लागणारा वेळ आजच्या तरुणाला मान्य नाही. त्यामुळे तो ‘व्हॉट्सअॅप’वर आलेला आहे. त्यामुळे त्याची सगळी परिभाषा बदललेली आहे. या परिभाषेशी मिळतेजुळते घेऊन आणि त्यातले दोष टाळून तरुणांना काही नवीन सांगण्याची गरज आहे. या संमेलनात चेतन भगत यांच्या मुलाखतीपेक्षाही संदीप वासलेकर, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारख्यांच्या मुलाखती आणि रघुनाथ माशेलकरांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा अधिक परिणामकारक ठरलेला आहे. ‘जुन्यांचा आदर आणि नव्याचा स्वीकार’ हेच आजच्या गतिमान जगाचे महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. त्या प्रवाहात तरुणांना आणण्यासाठी काही नवे मार्ग चोखाळावे लागतील. फार मोठय़ा लंब्या-चौडय़ा लेखनाचे आज आकर्षण राहिलेले नाही. कथा, कादंब-यांमध्ये रमणारा वाचक कमी झालेला आहे. आजचे जग हे गतिमान आहे तसेच ते झटपट आहे. कमीतकमी शब्दांत आकलन होईल, अशी पुस्तके त्याला हवी आहेत, अशी भाषणे त्याला हवी आहेत. या साहित्य संमेलनात हा सगळा नवा विचार अतिशय प्रभावीपणे मांडला गेला. विविध परिसंवादांना जी तुडुंब गर्दी झाली आणि त्यात प्रामुख्याने तरुण होते, त्याचेही कारण तेच आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथ दालनात जवळपास दोन-अडीच लाख लोकांनी पुस्तके हाताळणे, न्याहाळणे आणि चार कोटी रुपयांपर्यंत पुस्तकांची विक्री होणे, याचा अर्थ ज्यांना समजेल, ते या संमेलनाची चर्चा ते संमेलन खर्चिक होते की, आणखी काही होते, याचा काथ्याकूट करीत बसतील; पण मराठी सारस्वताच्या या महामेळाव्यात ज्या तरुणाईने विविध पुस्तकांना, ग्रंथांना न्याहाळून त्यांची खरेदी केली, तो मराठी वाचक हाच खरा संमेलनाचा यशस्वी घटक आहे. पाच लाख लोकांनी या संमेलनात आपली हजेरी चार दिवसांत लावली, हेही फार मोठे यश आहे. अशा या संमेलनात तरुणांचा सहभाग हा केंद्रबिंदू ठरला आणि ग्रंथ विक्रीने महाराष्ट्रातल्या माय मराठीचे काहीही बिघडणार नाही, याची ग्वाही दिली, हेच संमेलनाचे मोठे यश आहे.