घाटमार्गात मिनीबस बंद पडत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कर्जत-माथेरान मिनीबस सेवा कोलमडली आहे.
कर्जत – घाटमार्गात मिनीबस बंद पडत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कर्जत-माथेरान मिनीबस सेवा कोलमडली आहे. घाटात मिनीबस बिघडणे, कधी फेरी रद्द होणे, हे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांपासून येथे फक्त एकच मिनीबस सुरू असून अन्य फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
बससेवा बंद झाल्याने सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. या विरोधात माथेरानकर व विद्यार्थ्यांनी कर्जत आगारावर धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना जाब विचारला. दरम्यान, चोवीस तासांत मिनीबस सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन महामंडळातील अधिका-यांनी दिले आहे.
माथेरान मिनीबस सेवा ही एसटी महामंडळाची प्रतिष्ठेची सेवा आहे. ‘गाव तेथे एसटी’ या तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. याला टॅक्सी चालक-मालक संघटनेने प्रचंड विरोध केला. सुरुवातीला एक बस जाळल्याची घटनाही घडली होती. मात्र, त्यानंतरही महामंडळाने ही सेवा जिद्दीने सुरूच ठेवली. या सेवेसाठी नवीन मिनीबस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु, काही महिन्यांनी अवघड घाटमार्गावर या मिनीबस नादुरुस्त होऊ लागल्या. वारंवारच्या या समस्येने प्रवासी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
माथेरानकर वरिष्ठ अधिका-यांना भेटल्यानंतर काही काळासाठी ही समस्या सुटते. पण, पुन्हा ही सेवा कोलमडते. मनोज खेडकर नगराध्यक्ष असताना त्यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन दोन नवीन मिनीबस पदरात पाडून घेतल्या होत्या. परंतु, टाटा कंपनीच्या या मिनीबस घाटात टिकाव धरू शकल्या नाहीत.
त्यामुळे या सेवेसाठी खास आयशर कंपनीच्या मिनीबस द्याव्यात, अशी माथेरानकरांची मागणी आहे. सात महिन्यांपूर्वी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे माथेरानला आले असता त्यांनी दोन नवीन मिनीबस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप त्या उपलब्ध झाल्या नाहीत.दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून एक मिनीबस नादुरुस्त झाल्याने एकाच बसवर ही सेवा सुरू आहे.
यामुळे विद्यार्थी व रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणे शक्य होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कर्जत आगारावर धडक दिली. या वेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेविका सुहासिनी शिंदे उपस्थित होते.
“घाटातील प्रवास वाहतुकीसाठी चांगल्या गाडया देणे आवश्यक आहे. परंतु, मिनीबस वारंवार नादुरुस्त असल्याने नाइलाजाने बसफे-या रद्द कराव्या लागत आहेत.”– दीपक घोडे, आगार व्यवस्थापक