बुरहान वानीच्या वडिलांचा दावा
नवी दिल्ली – हिजबुलचा कमांडर बुरहान वानीचा खात्मा होऊन एक वर्ष झाले आहे. एक वर्षांनंतरही सरकार माझ्या मुलाला घाबरत असल्याचा दावा बुरहानच्या वडिलांनी केला आहे. बुरहानला मागील वर्षी ८ जुलै रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले होते.
त्राल येथे प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बुरहानचे वडील मुझफ्फर वानी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पण ते (राज्य सरकार आणि पोलीस) अजूनही बुरहानला घाबरतात. बुरहानच्या आठवणीसाठी आयोजित कार्यक्रमासाठी लोक एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांनी बंदी घातली आहे. पण लोक माझ्या घरी येतील, त्या सर्वांचे मी स्वागत करतो. मी त्यांना नाही म्हणून शकत नाही.
भारतीय काश्मीरमध्ये सुरक्षित आहेत. पण काश्मिरी भारतात सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले.ते म्हणाले, काश्मीर हिंसाचाराचा बळी ठरला आहे. यामध्ये मी माझे दोन मुले गमावली आहेत. हिंसेमुळे आमच्या मनातील स्वातंत्र्याची भावना दबणार नाही. न्यायासाठी लढाई सुरूच राहील.
हुरियत नेत्यांनी आणि दहशतवाद्यांनी बुरहानच्या मृत्यूला एक वर्ष झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांची घोषणा केली आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याने काश्मीर खो-यात ८ जुलै ते १३ जुलैपर्यंत बंदची घोषणा केली आहे.