सीमा एका भव्य आणि सोयींनी युक्त अशा रुग्णालयात अतिदक्षता विभागात म्लान होऊन पडली होती, कालच तिचं एक मोठं ऑपरेशन झालं होतं. आज मी असे उपचार माझ्यावर का करून घेतले? असं एक मन तिला प्रश्न विचारत होतं. यामध्ये मी करण्यासारखं काय होतं?
आजपर्यंत तरी मी काय ठरवू शकले? आलेल्या कोणत्याही परिस्थितीत खचून जायचं नाही, एवढंच मी माझ्यासाठी ठरवत आले. प्रत्येक वेळेला वाटत होतं, ही परीक्षा आपली शेवटची असेल, पण असं घडलंच नाही आणि परीक्षा संपल्या नाहीत.
मी सीमा आम्ही तीन भावंडे. आम्ही दोघी मुली, एक भाऊ. आम्ही सगळे साधारण बुद्धिमत्तेचे. आमचे वडील सरकारी कार्यालयात लिपिक पदावर होते. आई गृहिणी होती. कामाचे हात एकटय़ा बाबांचे आणि आम्ही खाणारी चार तोंडे. मोठी बहीण दहावी शिकली. शिवणाचा कोर्स केला आणि शिवणकाम करायला लागली. थोडा-फार घरखर्चाला हातभार लावू लागली. दोन वर्षातच तिला मागणी आली. विसाव्या वर्षी तिचं लग्न झालं. दादाने त्याचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तो नोकरीला लागला आणि कोकणातून मुंबईत गेला. मी बारावीची परीक्षा दिली आणि दादाने मला मुंबईला काही कोर्स करता येईल का, यासाठी नेलं. मी मुंबईला गेले. एक शॉर्टटर्म कोर्स करत असताना, माझे वडील निधन पावले. भावावर घराची जबाबदारी आली. माझं लग्न ठरवण्यात आलं. माझा काही विचार होऊन माझी दुस-या कुटुंबात जाऊन राहण्याची मनाची तयारी होण्यापूर्वी मी एका घरची सून झाले. माझं आणि दादाचं लग्न एकाच मांडवात झालं असल्याने वाहिनीशी पूर्ण ओळखही झालेली नव्हती.
मी माझ्या संसारात रमण्यापूर्वी दहा महिन्यांतच माझे पती निधन पावले आणि तेव्हा मी तीन महिन्यांची गर्भवती होते. मला मुलगी झाली. कदाचित त्यावेळी मला मुलगा होता, तर त्याला त्याचं घर मिळ्ण्यापायी मला हक्काचं सासर राहील असतं, पण माझ्या पदरी मुलगी आल्याने माझं सासर संपल. मी माहेरी माघारी आले. मी मला जमेल ते ते काम करायला सुरुवात केली. माझ्या नशिबी कोणत्याच गोष्टीची स्थिरता नव्हती. तशी नोकरीसाठीसुद्धा माझ्या नशिबात भ्रमंती आणि अस्थिरता होती. माझ्या लेकीकडे बघून मी हिंमत आणायची आणि मी हिमतीने पुढे जाते असं पाऊल दिसलं की, माझ्या काळजीने थकलेल्या आईला हुरूप यायचा. मला माझं माहेर हेच सर्वस्व बनून राहावं लागलं. मला माझ्या सासरच्यांनी समजून घेतलं असतं तर, मी त्या घरी हक्काने राहिले असते. कितीही विचारप्रवाह बदलले आणि चौकटी रूढींच्या बदलल्या तरी, त्या पूर्ण पुसल्या जात नाहीत. नव्या चौकटीच्या मागे माजी या बिरुदाप्रमाणे त्या अस्पष्ट उभ्या असतात. त्यात आपलं आयुष्य व्यतीत करणा-याला त्या जाणवतात, कधी टोचतात देखील. मी माझ्या मुली आणि आईसकट माझं म्हणजेच तीन पिढीतल्या स्त्रियांचा त्रिकोण सुखी होण्याइतकं मिळवत राहिले. आमचं गावातलं घर हे आमच्या तिघींचं घर आश्रमाप्रमाणे झालं होतं.
या घराची सून झालेली माझी आई, या घराची माहेरवाशीण, पण आता आश्रित झालेली मी आणि आजोळच्या प्रेमाने न्हाऊन निघाली असती अशी नात आता कायमची याच अंगणात. एकेकदा कामावरून घरी येऊन पडवीतल्या झोपाळ्यावर चहा घेत बसले की, वाटायचं काय चाललंय आपल्या आयुष्याचं? आपण पुन्हा या अंगणात पायधूळ झाडतो आहोत, हे काय घडतंय? तेवढय़ात शेजारच्या मुलांबरोबर खेळणारी माझी लेक दृष्टीस पडायची आणि त्या मुलांच्यातला निरागस भाव मनाला शिडकावा द्यायचा. आपली सोनू एकटी आणि उपरी नाही इथे असं जाणवायचं. तिला सर्व किती सामाऊन घ्यायचे. खरंतर मुलांमध्ये असं काही नसतं. आपल्यालाच असं शोधायची खोड असते.
माझी सोनू आता दहावीची परीक्षा देत होती. तिला काहीवेळा प्रश्न पडायचे. त्या शंकांच निरसन करताना आईला जड जायचं. मी मोकळेपणाने सोनूशी बोलायचे. आता तिलाही मतं यायला लागली होती. आजीला ती समजून मदत करायची. आजी दमलेली दिसली की, मुद्दाम विश्रांती घ्यायला लावायची. आता सोनूचं कॉलेज सुरू झालं. आई पार थकली होती, मला वाटायचं माझ्या जागी तिचा एखादा मुलगा तिच्यासोबत इथे राहत असता, तर आईला घरात हाताशी सून असती. आई विश्रांती घेऊ शकली असती. मी दिवसभर कामात असल्याने तिला घराकडे पाहावं लागत होतं. सोनू शिकत होती आता माझ्या कष्टकरी हाताना थोडी विश्रांती आणि आईच्या घरकामात मदत करण्याची धडपड तिच्या डोळ्यात दिसू लागली आणि इतक्यात माझे कष्टाने थकलेले शरीर कुरकुरू लागले. मला मनातूनही आजारी पडण्याचं झेपणार नव्हतं. माझी खासगी तत्त्वावरची नोकरी होती.
मला माझा दिनक्रम अजून काही वर्ष कमी करूनही चालणार नव्हता; परंतु माझ्या शरीराने बंद पुकारलंच, मला मनोमन आता भीती वाटू लागली. मला काही दिवसाचं रजा घेऊन घरात राहायला लावणारं आजारपण परवडणारं नव्हतं. माझ्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. आता तपासण्यांमधून माझा आजार दुर्धर असल्याचं कळलं. वेळ येताना आपल्याला जे नको तेच दान नियती देते. आत्तापर्यंत नशीब की कमनशीब माहीत नाही, काय म्हणावं पण जे जगत आले त्याची न लक्ष्यात आलेली किंमत या आजाराने मला कळवून दिली. माझ्या या जगातलं फोल वाटणारं आयुष्य काय, किती आणि कोणाला मौल्यवान वाटत आहे, याचा आलेख काढण्यापेक्षा तो मी जगले. माझे आई आणि कुटुंबीय, ज्या नातेवाइकांकडे कधी श्वासभर पाहायला जमलं नाही ते आप्तेष्ट, ज्या लोकांबरोबर भाकरतुकडय़ाची मोट बांधत राहिले ते सहकारी, सगळ्यांनी आज मला माझ्या श्वासाची किंमत दाखवून दिली. अतिदक्षता विभागात नाकाला ऑक्सिजनची नळी होती आणि माझ्या हृदयात सुहृदांचा प्राणवायू भरला जात होता. माझी सोनू दिसली आणि परमेश्वराची करणी खूप उपकारार्थ वाटू लागली. आज मी डोळे उघडले ते मला माझ्या माणसांनी मी हवी आहे म्हणून केलेल्या माझ्यासाठीच्या दुवा मागणा-यांचं यश, माझ्या सोनूच्या मायेचं कोंदण, आईची परमेश्वरावरची अढळ श्रद्धा, मी ही मनोमन त्या नियंत्याला हात जोडले. मला आता जगायचंय माझ्या सोनूचा संसार मांडून द्यायचाय, मला आपली म्हणणा-या माणसांच्या आपुलकीच्या उबेत आपलं जीवन व्यतीत करायचंय, आता मला माझ्या जन्माचं कोडं न वाटता, मला मिळालेलं जन्माचं वरदान सार्थकी लावायचय.