मध्य प्रदेशवर तीन विकेटनी मात करत माजी विजेत्या मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
इंदूर- मध्य प्रदेशवर तीन विकेटनी मात करत माजी विजेत्या मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सलामीवीर जय बिश्त (७४) आणि कर्णधार आदित्य तरेसह तळातील इक्बाल अब्दुल्ला (नाबाद ३९) आणि शार्दुल ठाकूरमुळे (नाबाद ३८) पाहुण्यांनी विक्रमी २८० धावांचा यशस्वी पाठलाग केला. यंदाच्या मोसमात बाद फेरी गाठणारा मुंबई पहिला संघ आहे.
तिस-या दिवशी बुधवारी २८० धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांनी सलामीवीर अखिल हेरवाडकरला दुस-याच षटकांत गमावले. मात्र अन्य सलामीवीर जय बिश्त (७४) आणि श्रेयस अय्यरने (३६) दुस-या विकेटसाठी ९९ धावा जोडताना मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. सूर्यकुमार यादव (१८) आणि बिश्तला बाद करताना ऑफस्पिनर जलाज सक्सेनाने प्रतिस्पध्र्याना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
कर्णधार आदित्य तरेने (४५) मैदानावर तग धरला तरी सातव्या क्रमांकावरील इक्बाल अब्दुल्ला (३९) आणि नवव्या क्रमांकावरील शार्दुल ठाकूरने (३८) आठव्या विकेटसाठी ६८ धावांची नाबाद भागीदारी रचताना मुंबईला आणखी एक सवरेत्कृष्ट विजय मिळवून दिला. सात सामन्यांतून चौथ्या विजयासह (३२ गुण) मुंबईने बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला. यंदाच्या मोसमात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला संघ आहे.
संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश – २४० आणि २०१
मुंबई – १६२ आणि ७ बाद २८३(बिश्त ७४, तरे ४५, अब्दुल्ला नाबाद ३९, ठाकूर नाबाद ३८, सक्सेना ८९-४).
निकाल – मुंबई तीन विकेटनी विजयी.
गुण : मुंबई ६, मध्य प्रदेश ०.
रेल्वे, केरळ, झारखंड ‘ब’ गटातील अन्य लढतीत रेल्वेने आंध्र प्रदेशवर १४८ धावांनी विजय मिळवला. ‘क’ गटात केरळने सौराष्ट्रावर ४५ धावांनी मात केली. झारखंडने हिमाचल प्रदेशला डावाने हरवले.
कर्नाटकचा दिल्लीवर ‘फॉलोऑन’
‘अ’ गटात हुबळीत सुरू असलेल्या लढतीत गतविजेता कर्नाटकने दिल्लीवर ‘फॉलोऑन’ लादला. दिल्लीचा पहिला डाव ३०१ धावांत संपला. ‘फॉलोऑन’नंतर तिस-या दिवसअखेर त्यांनी बिनबाद २२ धावा केल्यात.