भारताचे माजी कसोटीपटू मधूसुदन रेगे यांचे मंगळवारी निधन झाले.
नवी दिल्ली- भारताचे माजी कसोटीपटू मधूसुदन रेगे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भारताकडून त्यांनी केवळ एकच कसोटी सामना खेळला होता. मात्र प्रथम क्षेणीच्या क्रिकेटमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली होती.
रेगे यांनी १९४९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मद्रास येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी ३९ प्रथम क्षेणी क्रिकेट सामन्यातून ३७.२६च्या सरासरीने दोन हजार ३४८ धावा केल्या होत्या. यात सहा शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
तर गोलंदाजीमध्ये त्यांनी ४२.९६च्या सरासरीने ३३ गडी बाद केले होते. २३ धावांत पाच ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी मंडळाच्या वतीने रेगे यांना श्रद्धांजली वाहिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ते भारतीय संघात होते, असे पटेल यांनी सांगितले.