महिलांचे सक्षमीकरण हेच काँग्रेसचे ध्येय आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये शनिवारी झालेल्या जिल्हा महिला मेळाव्यात दिली
चिपळूण – महिलांची आर्थिक प्रगती म्हणजेच कुटुंबाची प्रगती. त्यातूनच समाजाची, राज्याची तसेच देशाची प्रगती होऊन, देश महासत्ता बनतो. यासाठीच महिलांचे सक्षमीकरण हेच काँग्रेसचे ध्येय आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये शनिवारी झालेल्या जिल्हा महिला मेळाव्यात दिली. आपल्या भाषणामध्ये राणे यांनी महिला विकास, कोकणचा कायापालट, पर्यटन, उद्योग अशा अनेकविध विषयांना स्पर्श करून उपस्थित महिलांना विचारप्रवृत्त केले. पाच हजारांहून अधिक महिलांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला.
चिपळूण शहरातील भोगाळे मैदानावर कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आलेला हा महिला मेळावा यशस्वी झाला. खासदार डॉ. निलेश राणे, जिजाई महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे, महिला कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कीर, महिला जिल्हाध्यक्षा मंजिरी साळवी, माजी आमदार सुभाष बने आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगामी काळात ५० हजार ते एक लाख महिलांसाठी आम्ही रोजगार निर्माण करणार आहोत. आता आपण रत्नागिरीत आलो आहोत. नुसती भाषणे करून कोणाचेही पोट भरत नाही. तर नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन विकास करायला हवा. त्यासाठी महिला सक्षम व्हायला हव्यात. कुटुंबाची चणचण भरून काढण्याची जाणीव महिलांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. उत्पन्नवाढीसाठी मार्ग स्वीकारले पाहिजेत. येथील महिला बचतगटांनी साथ दिल्यास ‘जिजाई’ची शाखा आपण काढू. मात्र समस्या सांगू नका. अंधश्रद्धा आड आणू नका. महिला सक्षमीकरणासाठी निर्धार करा. कोकणी माणसाच्या डोक्यात विकासाचा सुविचार आला पाहिजे, तरच विकास होईल. अन्यथा कितीही राणे जन्मले तरी उपयोग होणार नाही.’ आज कोकणातील महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सशक्त पिढी जन्माला येत नाही. आर्थिक दुर्बलतेमुळे शारीरिक दुर्बलतादेखील येत आहे. आर्थिक स्तर उंचावला तरच कोकणची प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिपळुणातील भव्य अशा महिला मेळाव्याने आपण भारावून गेलो आहोत. एवढय़ा महिला एकत्र येण्याचा जिल्ह्यातील हा प्रथमच योग आहे. कोकणातील महिला एका विचाराने एकत्र झाल्याचे समाधान राणे यांनी व्यक्त केले. ‘आज कॉँग्रेसमुळेच महिलांचा सन्मान होत आहे. महिलाविषयक अनेक योजना काँग्रेसच्या माध्यमातूनच पुढे आल्या. शिवसेनेचे नेते येथे आले. मात्र, जनतेसाठी त्यांनी कोणते काम केले का? मराठी माणसासाठी सेनेने काय केले? दादर, परळ अशा भागांतून मराठी माणूस बदलापूपर्यंत आला. त्यावेळी सेनेवाले झोपले होते काय? कोहिनूर मिल विकू देणार नाही, असे सांगताना ती मनोहर जोशींनीच विकत घेतली ना? त्यामुळे दगडधोंडे मारा हाच सेनेचा धंदा आहे. कोकणी माणसाने या भावनिकतेवर विश्वास ठेवू नये,’ असे त्यांनी सांगितले. येथील कुणबी समाजामध्ये अनेक खासदार, आमदार मंत्री झाले. मात्र, त्यांनी समाजाकडे लक्ष दिले नाही. कुणबी समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवू, असा विश्वास या समाजाला आहे. त्यामुळे येथील जनता आपल्या पाठिशी राहील. खासदार डॉ. निलेश राणे यांना खंबीरपणे साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. गावागावामध्ये बचतगट चळवळ रुजवावी. कोकण ब्रँडच्या माध्यमातून उत्पादने घ्यावीत, आम्ही त्याचे मार्केटिंग करू, असा भरवसा उद्योगमंत्र्यांनी दिला.