‘एका भंग्याची पोरगी जेव्हा माझ्या भारताची पंतप्रधान बनेन तेव्हा भारत खरोखर स्वतंत्र झाला असेल.’ असे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आदर्श भारताची संकल्पना मांडताना म्हटले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज इतक्या वर्षानी महिला दिनाला मी गांधीजींच्या स्वप्नाबाबत विचार करताना वाटले की- बापुजींचे स्वप्न आजही स्वप्नचं आहे.
शाश्वत, विश्वास, दृढपरिचय, वात्सल्य, सन्मान, महत्त्वाकांक्षा आणि आत्मसमर्पण या सप्तगुणांची मूर्तिमंत प्रतिक म्हणजे स्त्री. मात्र आज २१ व्या शतकात स्वत:च्या प्रगतीचा डंका मिरवणा-या आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीत आजही स्त्रियांना दुय्यम स्थान आहे.
चार ठसठशीत दागिने अंगावर चढविले आणि भरजरी वस्त्र नेसायला दिली म्हणजे झाले असे आम्हाला वाटते. नुसती शोभेची बाहुली करून ठेवलीय आम्ही तिला. कुटुंबातील एक घटक म्हणून तिचे स्वत:चेही काही मत आहे, तिलाही मन आहे, याची जाणीवच कुणाला राहत नाही.
उलट ‘पायातील वहाण, पायतच बरी’ अशी स्त्रियांना गुलामगिरीच्या बेडय़ात अडकवणारी विचारसरणी मोठया गर्वाने जोपासली जाते. अशिक्षित, श्रमिक कुटुंबात तर स्त्रीची अवस्था गोठय़ातल्या गुरापेक्षाही वाईट असते.
मात्र स्त्रियांना माझं सांगणं आहे की, लक्षात ठेवा, पायातील वहाणच बनून राहिलात तर आयुष्यभर चपलाच खाण्याची पाळी तुमच्या माथी येईल.
मानवाचे राहणीमान उंचावणा-या या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांनी मानवाचे समृद्धीच्या नभात गरुडझेप घेतली आहे. मात्र हातात पाळण्याची दोरी घेऊन जगाला उद्धारणारी स्त्री मात्र आजही अबला म्हणूनच आपल्या कर्माला दोष देत आपलं जीवन कंठीत आहे.
इंग्लंडसारख्या विकसित देशातसुद्धा मतदानाच्या हक्कासाठी महिलांना आंदोलन करावे लागते. अरब राष्ट्रांमध्ये तर स्त्रियांना घराबाहेर पडण्यासही बंदी आहे. बुरख्यासारखी अनिष्ट प्रथा आजही सगळीकडे आहे. ‘तलाक’ या एका शब्दाने मुस्लीम महिलांचे आयुष्य बरबाद होऊन जाते.
हुंडा, सती, केशवपन, मुरळी, बालविवाह, देवदासी अशा कितीतरी दुष्ट प्रथा भारतात आजही मूळ धरून आहेत. किती विरोधाभास आहे, बघा आम्ही शक्ती आणि देवी म्हणून दुर्गा, काली, चंडी, अंबा, लक्ष्मी, सरस्वती अशा स्त्री रूपांची पूजा करतो आणि सुखदु:खात सावलीसारखी सोबत असणा-या गृहिणीला मात्र छळत असतो.
‘समान मानव माना स्त्रिला,
अबला कुणी तिला समजू नका।
देवी म्हणूनी पुजू नका
वा दासी म्हणूनी छळू नका।।’
हे आपण समजून घेतले पाहिजे.
फुले, कर्वे, रानडे आणि आगरकरसारख्या कर्त्यांसुधारकांच्या प्रयत्नांमुळे व शिक्षण संजीवनीच्या बळावर आज स्त्रिया हिमालयाच्या उन्नत शिखरांना नमवत आहेत, अवकाशात जात आहेत.
वैद्यकीय व्यवसायापासून तर संरक्षण क्षेत्रासारख्या पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेतली आहे. या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन करताना सर्व महिलांना पाहून माझे मन अभिमानाने फुलून आले.
ज्या गावात साधी एस.टी.ही जात नाही, अशा विदर्भातल्या एका छोटय़ाशा खेडय़ात माझा जन्म झाला. एका झाडाखाली भरणा-या चौथीपर्यंतच्या एकशिक्षकी शाळेत मी शिकले. मात्र वडील आणि मोठे बंधू यांच्या मार्गदर्शनामुळे त्या काळातही एम.एस. सीबी.एड. करून आत्मनिर्भर झाले.
आमच्या दोन मुली यांनाच आमच्या वंशाचा दिवा मानले. असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. परंतु मला वाटते दोघे बरोबर चालले तर आयुष्य खूप समाधानाने जगता येते. मुंबईतील ख्यातनाम शाळा व इगतपुरी येथील आश्रमशाळा आम्ही दोघे एकमेकांच्या सहकार्याने सांभाळून सावित्रीचे व्रत चालवत आहोत.
चुनाभट्टीसारख्या कामगार वस्तीत गेल्या ४० वर्षापासून मी शिक्षणक्षेत्रात काम करते आहे आणि होत असलेल्या सकारात्मक स्थित्यंतराची मी साक्षीदार आहे.
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईचा एक भाग जरी असला तरीही प्रारंभी शाळेत मुलींची संख्या अत्यल्प होती. मात्र आज मुलींचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास हा लक्षणीय आहे. किंबहुना मुलांच्याही पुढे त्या असतात, ही समाधानाची बाब आहे.
कदाचित माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक करण्यासाठी प्रहार वृत्तपत्र समूहाने दिलेल्या ‘प्रहार स्त्री प्रेरणा’ पुरस्काराने मला अधिक बळ प्राप्त झाले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी व सबलीकरणासाठी महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनले पाहिजे.
स्वसंरक्षणाचे धडेही आपण गिरविले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे योग्य संस्कार आपल्या बाळांवर केले पाहिजेत, अगदी मुलांनाही मुलींप्रमाणेच जबाबदा-या व कामे घरात लावली पाहिजेत. मुलींचा व इतर महिलांचा आदर करण्याची शिकवण आपण मातांनीच त्यांना दिली पाहिजे. तरच ‘निर्भया’ सुरक्षित राहतील.
चला तर मग सर्व महिला कटिबद्ध होऊ या. साक्षर, सुसंस्कारीत, स्वावलंबी, निडर, सबल व सक्षम होऊया आणि जगाला दाखवूया की,
‘संस्कृती जणू मी समूर्त
स्त्री माझे नाव असे!’
समस्त मानिनींना व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!