रणजी करंडकाच्या ‘बी ग्रूप’मध्ये तामिळनाडूविरुद्ध महाराष्ट्र पराभवाच्या छायेत आहे.
चेन्नई – रणजी करंडकाच्या ‘बी ग्रूप’मध्ये तामिळनाडूविरुद्ध महाराष्ट्र पराभवाच्या छायेत आहे. विजयासाठी माफक १९३ धावांचे आव्हान गाठताना सोमवारी तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राची अवस्था ८ बाद ७५ अशी झाली.
महाराष्ट्राला विजयासाठी आणखी ४३ धावांची आवश्यकता आहे. अंकित बावने (खेळत आहे १८) आणि अक्षय दरेकर (खेळत आहे १) या तळातील फलंदाजांवर त्यांची मदार आहे. तामिळनाडूकडून लक्ष्मीपथी बालाजी, औशिक श्रीनिवास, रंगराजन आणि यो महेशने प्रत्येकी दोन विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली. बावनेच्या १८ धावा हीच महाराष्ट्राच्या दुस-या डावातील सर्वाधिक धावसंख्या ठरली.
तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या अक्षय दरेकर आणि चिराग खुराना या फिरकीपटूंनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्याने तामिळनाडूचा दुसरा डाव १४९ धावांत आटोपला. यजमानांतर्फे दिनेश कार्तिकने सर्वाधिक ३५ धावा केल्या. आव्हान माफक असल्याने यंदाच्या हंगामातील पहिला विजय महाराष्ट्र सहज नोंदवेल, असे वाटत होते. मात्र फलंदाजांनी सपशेल निराशा केली. तामिळनाडूला सलग दुसरा विजय नोंदवण्याची संधी आहे.
संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू – २७६ आणि १४९ (दिनेश कार्तिक ३५, खुराना २७-४, अक्षय दरेकर ६१-४) वि. महाराष्ट्र – २३३ आणि ८ बाद ७५ (बावने खेळत आहे १८, महेश १०-२)
बंगालला डावाने जिंकण्याची संधी
कोलकाता – ‘ए ग्रूप’मधील अन्य लढतीत बंगालला घरच्या मैदानावर गुजरातविरुद्ध डावाने विजयाची संधी आहे. बंगालने पहिला डाव ७ बाद ५२६ धावांवर घोषित करत २६६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर सोमवारी तिसऱ्या दिवसअखेर गुजरातची अवस्था ४ बाद १८ अशी झाली आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी २४८ धावांची गरज आहे. तत्पूर्वी, बंगालने ४ बाद २२० धावांवरून खेळताना कर्णधार मनोज तिवारी (१९१) आणि लक्ष्मीरतन शुक्लाच्या (११३) शतकांमुळे पाचशेचा टप्पा ओलांडला.
उदय कौलचे शतक
भुवनेश्वर – पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर पंजाबकडून कर्णधार उदय कौलने (१००) सोमवारी शतक साजरे केले. कौलच्या खेळीमुळे पंजाबने रेल्वेच्या २०५ धावांना प्रत्युत्तर देताना ३१४ धावा फटकवल्या. बदल्यात रेल्वेने २ बाद १८३ अशी मजल मारली. ही लढत अनिर्णित राहणार, हे जवळपास निश्चित आहे.
मध्यप्रदेश-राजस्थान लढतही अनिर्णितावस्थेकडे
जयपूर – राजस्थान आणि मध्यप्रदेश यांच्यातील लढतही अनिर्णित राहण्याची चिन्हे आहेत. सोमवारी राजस्थानचा डाव ३७९ धावांत संपला. त्यांनी पहिल्या डावात १२३ धावांची आघाडी घेतली. मध्य प्रदेशने नमन ओझाच्या (खेळत आहे १०२) शतकाच्या जोरावर दुस-या डावात दिवसअखेर १ बाद २०० अशी मजल मारली.
सौराष्ट्र मजबूत स्थितीत
हैदराबाद – हैदराबादविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर सोमवारी दुस-या डावात ६ बाद २७० धावा केल्याने सौराष्ट्राची स्थिती मजबूत आहे. पाहुण्यांकडे आता एकूण ३४४ धावांची आघाडी आहे. सागर जोगियानी (६९) आणि जयदेव शहाची (५५) अर्धशतके हे सौराष्ट्राच्या दुस-या डावाचे वैशिष्टय़ ठरले.