अंधश्रद्धेच्या आधीन गेलेल्या समाजामध्ये जागृती करून विवेकाचा दीप प्रज्वलीत करण्याचे काम वारकरी संतांनी केले.
पनवेल- अंधश्रद्धेच्या आधीन गेलेल्या समाजामध्ये जागृती करून विवेकाचा दीप प्रज्वलीत करण्याचे काम वारकरी संतांनी केले. सातशे वर्षे वारकरी संतांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात जो जागर केला त्याचा विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, असे परखड मत ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना बलिदान द्यावे लागले, ही खेदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होऊनही त्यांचे मारेकरी अद्याप पकडले गेलेले नाहीत. येत्या २० ऑगस्ट रोजी त्यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘हिंसाके खिलाफ.. मानवता की और’ हे अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू आहेत.
त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि संत विचार’ या विषयावर शामसुंदर महाराज सोन्नर यांचे कीर्तन आयोजित केले होते. पनवेल येथील गोखले हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत आरती नाईक यांनी केले. तर प्रस्ताविक महेंद्र नाईक यांनी केले. आभार मनोहर तांडेल यांनी मानले.
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी..अशी आरोळी ठोकून संत नामदेव महाराजांनी बाराव्या शतकात सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला. तर ‘मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी। ते योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥’ असे सांगत संत ज्ञानेश्वर महाराजांनी विवेकी समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. मंत्रतंत्रांने कधीही शत्रू मरत नाही.
कोणत्याही बाबाचा दिलेला गोड प्रसाद खाऊन रोग जात नाही. तर त्यासाठी निंबासारखे कडू औषधच घ्यावे लागेल, असे सांगत ज्ञानेश्वर महाराजांनी अंधश्रद्धेविरोधात कोरडे ओढले. ‘नवसे कन्या-पुत्र होती। तरी का करणे लागे पती॥’ असे सांगत संत तुकाराम महाराजांनी या परंपरेवर कळस चढविला. पापाची भीती, पुण्याची लालूच, देवाचा धाक दाखवून जे समाजाचे शोषण होत होते त्याबाबत वारकरी संतांनी जनजागरण केले.
इतकेच नव्हे तर इतर रूढी, परंपरा, वर्णव्यवस्था, उचनीच भेद भाव, स्त्री सक्षमीकरणाची पायाभरणी वारकरी संतांनी केली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन मनाची विवेकी विचाराने मशागत करण्याचे काम वारकरी संतांनी केली. त्या केलेल्या मशागतीमुळेच महाराष्ट्राच्या भूमीत पुरोगामी विचाराचा वृक्ष बहरला.
म्हणूनच शिक्षणाची दारे स्त्रियांना खुली करणारे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, अस्पृश्यतेविरोधात लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलितांच्या आरक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढा उभारणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर या महाराष्ट्रात जन्मले, असेही शामसुंदर महाराजांनी सांगितले. विविध समस्यांनी ग्रस्त, भाबडय़ा समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करून विवेक समाज निर्माण करण्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी केलेले कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वारकरी चळवळीचे ध्येय एकच आहे. मात्र दोघांनी एकमेकांना समजून घेऊन ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे, असेही मत सोन्नर महाराजांनी व्यक्त केले. या कीर्तनाचे संगीत संयोजन ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज क्षीरसागर यांनी केले.