आधी विदर्भ आणि आता मराठवाडा अशा मागण्या बघता मराठी भाषकांची ताकद कमी करण्याचे हे मोठे षड्यंत्र असावे, अशी मला शंका वाटते आहे.
आधी विदर्भ आणि आता मराठवाडा अशा मागण्या बघता मराठी भाषकांची ताकद कमी करण्याचे हे मोठे षड्यंत्र असावे, अशी मला शंका वाटते आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हा डाव संघ, भाजपाचाच आहे. भाजपाचे लहान राज्यांच्या निर्मितीचे धोरणच आहे. त्यांच्या विद्यमान नेतृत्वाने विधानसभेत महाराष्ट्रापेक्षा फक्त विदर्भाचे राज्य असले पाहिजे आणि ते महाराष्ट्रापासून वेगळे असले पाहिजे, अशी अनेक वेळा भाषणे केली आहेत.
त्यातच महाराष्ट्राचे चार वेगवेगळे भाग झाले पाहिजेत, ही मा. गो. वैद्य यांची भूमिका. संघाने आपल्या कामासाठी महाराष्ट्राची विभागणी चार विभागांत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे चार तुकडे पडले पाहिजेत, ही वैद्य यांची भूमिका संघाच्या भूमिकेशी सुसंगत आहे. हे वादग्रस्त मुद्दे मांडून महाराष्ट्रातल्या जनतेचे लक्ष प्रमुख प्रश्नांपासून विचलित करण्याचे काम राज्यातले सरकार करत आहे, हा प्रश्न येथे लक्षात घ्यायला हवा.
दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. मात्र, सरकारची मदत अत्यंत तोकडी आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशमधल्या काही तालुक्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सर्व प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा मोठा घाट सत्ताधारी घालत आहेत. त्यामुळे विधानसभेत अर्थसंकल्पाची चर्चा सुरू आहे, मंत्र्यांनी त्यावर उत्तर देणे बाकी असताना वेगळा मुद्दा मांडून त्या चर्चापासून लक्ष विचलित करण्याचे काम भाजपा करते आहे, असा माझा आरोप आहे. विधानसभेत व्यवस्थित चाललेल्या चर्चा भाजपाला कधी कधी अडचणीच्या ठरायला लागल्या आहेत, हेच त्यामागील कारण आहे.