राज्यात गेल्या दोन दशकांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि शिवसेना-भाजपची महायुती फिस्कटल्याने घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, मानखुर्द आदी विधानसभा क्षेत्रांत प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मुंबई – राज्यात गेल्या दोन दशकांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि शिवसेना-भाजपची महायुती फिस्कटल्याने घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, मानखुर्द आदी विधानसभा क्षेत्रांत प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातही काँग्रेस व मनसेचा अपवाद सोडल्यास अनेक पक्षांनी उमेवारच निश्चित केलेले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
राज्यात गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडीच्या निर्णयाप्रमाणेच जागावाटपाचा पायंडा पडला होता. यात काही बदल होणार असला, तरी त्याची आगाऊ माहिती कार्यकर्त्यांना वेळेत मिळत होती. यामुळेच विधासभा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडी, महायुतीतील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी त्याच धर्तीवर मानसिकता तयार केली होती. परंतु उमेवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर महायुती आणि आघाडीही तुटल्याने असंख्य कार्यकर्त्यांची अडचण झाली असल्याचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत या मतदारसंघांत काँग्रेसने पहिल्या यादीत दोन उमेदवार जाहीर केले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप, शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळेल, याची माहिती आणि यादीही जाहीर झाली नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. त्यातही इच्छुकांची भाऊगर्दी प्रत्येक पक्षात वाढली असल्याने ऐनवेळी अनेक पक्षांमध्ये बंडखोरांची संख्याही वाढणार असल्याचे स्थानिक मतदारांना वाटते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत ही शनिवारी आहे.
यामुळे शनिवापर्यंत सर्वच पक्षातील उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीनुसार घाटकोपर पश्चिम येथून प्रवीण छेडा यांना तर मुलुंड येथून चरणसिंग सप्रा यांना उमेवारी मिळाली आहे. तर मनसेने मात्र घाटकोपर पश्चिमेतून दिलीप लांडे, घाटकोपर पूर्वेतून सतीश नारकर, भांडुपमधून विद्यमान आमदार शिशिर शिंदे, विक्रोळीतून मंगेश सांगळे तर मुलुंडमधून सत्यवान दळवी यांना उमेदवारी दिली आहे.