खासदार राजू शेट्टींची ढाल पुढे करून महायुतीचे महासेनानी पश्चिम महाराष्ट्र काबीज करायला सरसावले असले तरी राजकीयदृष्टय़ा सर्वात सजग लोक पश्चिम महाराष्ट्रातच आहेत. राणा भीमदेवी थाटाची भाषणे करून इथल्या लोकांना सहजपणे खिशात घालणे अशक्यच आहे. कुणीही यावे आणि कसून जावे, इतकी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय भूमी सुपीक नक्कीच नाही. त्यातच महायुतीत सहभागी झालेले नेते वरवरचा एकोपा दाखवत असले तरी त्यांना परस्परांबद्दल अजिबात विश्वास वाटत नाही आणि दिसतच नाही. लहान मुले जशी ‘मला खाऊ दिले तर मी अभ्यास करीन,’ म्हणतात. त्याच धर्तीवर ‘मला जागा मिळाली तर मी तुमचा नाही तर नाही,’ अशा ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू आहे. मग अशा पोकळ महायुतीचा डोलारा निवडणुकीपर्यंत तरी टिकेल का, असा प्रश्न पडतो.
लोकसभा आणि विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने युतीवर मात केली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना आपल्यासोबत घेऊन महायुती तयार केली. राजू शेट्टी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे सर्वस्व आहेत आणि ते आपल्या बरोबर आहेत म्हणजे लोकसभा आणि त्यानंतर होणा-या विधानसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा महायुतीच जिंकेल, अशा भ्रमात उद्धव ठाकरे आणि मुंडे आहेत. म्हणूनच इचलकरंजी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला महायुतीचा ‘महामेळावा’, महायुतीचा ‘महाएल्गार’ अशी नावे स्वत:च देऊन महायुतीच्या वक्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शिव्यांचा पाऊस पाडला. राज्यातील राजकीयदृष्टय़ा सर्वाधिक सजग लोक पश्चिम महाराष्ट्रात आहेत. इचलकरंजीत झालेल्या मेळाव्यात जी काही गर्दी होती त्याच्या पाच-दहा पट अधिक गर्दी १९७७च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाच्या वक्त्यांच्या सभांना होत असे. तरीही त्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र अभेद्यपणे काँग्रेसच्या मागेच उभा राहिला होता. सातारमधून यशवंतराव चव्हाण, कऱ्हाडमधून विमलाकाकी चव्हाण आणि सांगलीतून अण्णासाहेब गोडखिंडे यांनी त्या निवडणुकीत विजय मिळवला होता. गर्दीचे आणि निवडणुकीतील विजयाचे गणित किती व्यस्त असते हे शिवसेनाप्रमुख त्यांच्या मिश्किल शैलीत हसत हसत सांगायचे. ‘लाखोंची गर्दी आमच्या सभांना आणि विजय मात्र काँग्रेसच्या उमेदवारांचा हा प्रकार मोठा अजब असतो,’ असे बाळासाहेब सांगायचे आणि पत्रकारही खळखळून हसायचे.
राज्यात युतीचे सरकार आले, तर आम्ही टोल रद्द करू, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. बाजूच्या गुजरातमध्ये त्यांचे बॉस असलेले नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आहेत आणि तेथे टोलही सुरू आहे. पण, तिथल्या टोलबद्दल शेट्टी बोलायला तयार नाहीत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने धर्मनिरपेक्षता सोडल्यास आपण एक मिनिटही त्या आघाडीत राहणार नाही, असेही शेट्टी म्हणाले. पण, इचलकरंजीच्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे स्वत: हिंदुत्व हेच कसे राष्ट्रीयत्व आहे, याचे गोडवे गात होते. त्याबद्दल शेट्टी यांना विचारले असता एका वाहिनीवर उत्तर देताना त्यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत होती. वीतभर पोटाची खळगी भरणे आणि त्यासाठी आपल्या जमिनीच्या तुकडय़ावर मरेस्तोवर राबणे, हाच ज्या शेतक-यांचा धर्म आहे. त्यांना उद्धवजी हिंदुत्वासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याचे आवाहन करीत होते. त्यावेळी ज्या काही टाळ्या पडल्या असतील त्या कष्टकरी सामान्य माणसाच्या नव्हे तर जमवलेल्या आणि पढवून आणलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांच्याच असू शकतात. स्वत: रामदास आठवले हेही मूळचे पश्चिम महाराष्ट्रातीलच. त्यामुळे राजकारण कसे खेळायचे, हे त्यांना वेगळे सांगायला नको. ‘माझा विचार करता की, मी वेगळा विचार करू’, अशी भूमिका आठवले यांनी घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांचा राज्यसभेसाठी विचार सुरू झाला. गोपीनाथ मुंडे यांनी या मेळाव्यात विजेबाबत अनेक आश्वासने दिली. १९९५ च्या निवडणुकीत प्रचार करताना याच मुंडे यांनी शरद पवारांना महाराष्ट्रात आणलेला एन्रॉन वीज प्रकल्प अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली होती; पण त्याच वर्षी युतीचे सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आले आणि वीज मंत्रीपद मुंडे यांनाच मिळाले. त्यामुळे मुंडे कधी एकदा एन्रॉन प्रकल्प रद्द करतात, याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले. पण, लोकांना विपरीतच पाहायला मिळाले. एन्रॉनच्या व्यवस्थापकीय संचालिका रिबेका मार्क यांचे स्वागत करण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात जणू स्पर्धा लागल्याच्याच बातम्या वृत्तपत्रात छापून येऊ लागल्या आणि एन्रॉनला समुद्रात बुडवायला निघालेले मुंडे या प्रकल्पाला जीवदान देण्याच्या तयारीत असल्याचेही चित्र समोर आले. अखेर एन्रॉन प्रकल्प अधिक सन्मानाने महाराष्ट्रातच राहिला. एकूण या मेळाव्याचा थाट ‘शब्द बापुडे केवळ वारा’ असाच होता. जो तो आपल्या परीने बोलत होता आणि लोक ऐकत होते. व्यासपीठावरील नेत्यांची देहबोली जिंकण्याच्याच उर्मीपेक्षा खडा टाकून तरी बघू अशा प्रकारचीच होती. व्यासपीठावरील नेते वरवरचा एकोपा दाखवत होते; पण परस्परांचा एकमेकांवर असलेला अविश्वास स्पष्ट दिसत होता. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राजू शेट्टी यांना आपले सहकारी सदाभाऊ खोत यांच्यासाठी हवा आहे. त्यासाठी त्यांचा मुंडे आणि ठाकरे यांच्याकडे आग्रह आहे. पण, तोच मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वयंघोषित अध्यक्ष महादेव जानकर यांनाही हवा आहे. सहज मिळाले तर घेऊ नाही तर वाकडय़ात शिरून काढून घेऊ, अशी प्रत्येकाची एकमेकांप्रती भूमिका पाहायला मिळाली.
पुरोगामी महाराष्ट्रात इथल्या राजकारणालाही स्वत:ची अशी सभ्यतेची संस्कृती आहे. परस्परविरोधी असणा-या पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करणारच त्यात चुकीचेही काही नाही; पण तर्काच्या पलीकडे जाणारी आणि एखाद्याचे बलस्थान माहीत असूनही त्याला कमी लेखणारी टीका सहसा केली जात नाही; पण महायुतीमधील उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांना बहुधा हे मान्य नसावे. त्यामुळेच मुंडे अधूनमधून अजित पवार यांनी बीडमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देताना दिसतात. मुंडेंची बारामतीमधून लढण्याची तयारी आहे का, या प्रती आव्हानावर मात्र त्यांनी आजवर उत्तर दिलेले नाही. उद्धव ठाकरेही मध्यंतरी एका लोसभा मतदारसंघात जाऊन शरद पवारांनी हिंमत असेल तर इथून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी. इथली शिवप्रेमी लोक त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहाणार नाही, असे आव्हान देऊन मोकळे झाले. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहापैकी विधानसभेच्या पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि ठाकरेंना अभिप्रेत असलेल्या शिवप्रेमी लोकांनीच त्यांना निवडून दिलेले आहे. मग तिथे पवारांचे डिपॉझिट जप्त होईल की, शिवसेना उमेदवारांचे? याचा उद्धव ठाकरे यांनी शांतपणे विचार करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी आजवर कसलीही निवडणूक लढवलेली नाही. शरद पवारांना लोकसभेवर यावेळी निवडून येण्याची खात्री नव्हती. म्हणूनच त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला, असा आणखी एक सिक्सर मुंडेनी मारला. पवारांनी आजवर विधानसभा आणि लोकसभा मिळून १४ निवडणुका लढवून प्रत्येक वेळी चांगल्या मताधिक्याने जिंकले आहेत. एवढी आकडेवारीही मुंडेसाठी पुरेशी ठरावी. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी मुंबईतील जाहीर सभेत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. कदाचित सेनेच्या विद्यमान नेतृत्वाकडून त्यांना फारशा अपेक्षा नसाव्यात, एका मर्यादेपर्यंत ते खरेही आहे; पण मोदींनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला. ते मात्र अनेकांना खटकले. बाळासाहेब हयात असते तर आजवर किमान २५ वेळा मोदींनी मुंबईत येऊन त्यांचे पाय धरले असते. मुंबईत येऊन मोदींनी इथल्या गुजराती समाजाचे कौतुक केले; पण ते करताना आपण आपोआपच मराठी माणसाला कमी लेखतोय, हे त्यांनी अनवधानाने केले की, जाणूनबुजून हे कळायला मार्ग नाही.
[EPSB]
जात पंचायतींची दहशत संपायला हवी
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्हय़ात जात-पंचायतीचा आदेश डावलणा-या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना नुकतीच घडली. संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. भारतीय समाजाच्या मनावर जात पंचायतींचे भूत किती घट्टपणे बसले आहे, हे या क्रूर घटनेतून दिसून येते. जात पंचायतींसारख्या प्रथांमुळे उत्तर भारतात माणुसकीचा कसा गळा घोटला जात आहे, हे देशाने या आधीही अनुभवले.
[/EPSB]