मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी शपथ घेतली. भ्रष्ट कारभाराला लगाम लावण्यासाठी काही विभागातील अधिका-यांच्या बदल्याही करण्यात आल्या.
मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी शपथ घेतली. भ्रष्ट कारभाराला लगाम लावण्यासाठी काही विभागातील अधिका-यांच्या बदल्याही करण्यात आल्या. मात्र कुठल्याही कामासाठी पैशांची मागणी करणा-या महापालिकेचा कारभार खरोखर भ्रष्टाचारमुक्त होईल, का? शपथ घेऊन महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल, असे वाटते का? भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे का? लाच देणे व घेणे गुन्हा असल्याने मुंबईकरच भ्रष्टाचारास दोषी आहे, असे वाटते का? भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी मुंबईकर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे का?
महापालिका भ्रष्टाचारमुक्त होणे अशक्यच
मुंबई महापालिका भ्रष्टाचारात नंबर वन असल्याचा अहवाल यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केला आहे. महापालिका प्रशासनाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड शपथ घेऊन अथवा अधिका-यांच्या बदल्या करून भ्रष्टाचार साफ करणे शक्य नाही. भ्रष्टाचाराने मुंबई महापालिका पूर्णत: पोखरली असून, याला प्रशासन व मुंबईकर जबाबदार आहेत, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे. लाच देणं व घेणं गुन्हा असून, भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. शिपायापासून बडय़ा अधिकारी वर्गाला भ्रष्टाचाराची कीड लागली असून, भ्रष्टाचा-यांना थेट तुरुंगाचा रस्ता दाखवणे हाच पर्याय आहे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून मांडले. भ्रष्ट कारभार थांबवा, अशी आेरड करण्याआधी मुंबईकरांनी स्वत: भ्रष्टाचार मुक्ततेसाठी पाऊल उचलणे अधिक सफल ठरेल, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर आळा घालण्यासाठी अधिका-यांनीच शिस्तबद्धपद्धतीने काम केल्यास आळा घालणे शक्य होईल, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. महापालिकेतील भ्रष्टाचार मोठय़ा जोराने पसरत असून, आताच लगाम न लावल्यास भविष्यात महापालिकेचे नाव धुळीस मिळण्यास वेळ लागणार नाही आणि याला प्रशासन व मुंबईकर जबाबदार असतील, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला.
मानसिकतेत बदल हवा
भ्रष्टाचारावर आळा बसू शकणार नाही. प्रमाण कमी करण्यासाठी ब-याच उपाययोजना आखाव्या लागतील. नागरिकांना सतर्क राहून कुठल्याही कामासाठी अधिका-यांना लाच देण्याची प्रथा बंद केली पाहिजे. परंतु आपले काम त्वरित व्हावे यासाठी नागरिकही नियम धाब्यावर बसवतात. मात्र लाच देणं व घेणं हा गुन्हा असून, कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करून घेतल्यास भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. चिरीमिरी दिल्याशिवाय काम होणार नाही, ही मानसिकता बदलली पाहिजे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर पोहोचली आहेत की, ती नाहीशी करण्यासाठी नागरिकांची प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. मुळात दलाल संस्कृतीचा बिमोड केला पाहिजे. शपथ अनेकदा घेतली जाते. शपथेचे पालन होत नाही. नुसत्या अधिका-यांच्या बदल्या करून भ्रष्टाचार कमी होणार नाही, यासाठी जागृती महत्त्वाची आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी महापालिकेत आपल्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. ऑनलाइन कार्यप्रणालीमुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झाली आहे.- हरिष बडेकर, मुंबई
पैशाशिवाय पानही हालत नाही
भ्रष्ट अधिका-यांचे राजकीय नेत्यांशी संबंध चांगले असल्यामुळे भ्रष्टाचाराला लगाम लावणा-या अधिका-यांची त्वरित बदली केली जाते. त्यामुळे कोणत्या कामासाठी पैशाची मागणी केली ते जनतेच्या उजेडात येत नाही. प्रत्येक कामासाठी कागदपत्रांची पूर्तता असताना व नसताना संबंधित कामाच्या बाबतीत महापालिकेच्या काही अधिका-यांना टेबलाखालून काही दिल्याशिवाय काम होत नाही, हे कटू सत्य आहे. ज्याच्याकडे कागदपत्रांची पूर्तता आहे, पण पैसा नाही तो संपला. काम पाच मिनिटाचं असतं पण सामान्य नागरिकांना पालिका ऑफिसमध्ये विनाकारण फे-या मारायला लावतात, हे योग्य नसून त्यावर आयुक्तांनी तक्रारी येताच त्या भ्रष्ट अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. – प्रवीण पाटील, परेल, भोईवाडा
कारवाईची आवश्यकता
दरवर्षी सरकारी आणि महापालिका कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात येतो. परंतु त्यातून काहीही साध्य होत नाही. महापालिका आयुक्त कुंटे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्यासाठी आपल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला शपथ दिली होती. मात्र त्याच कालावधीत स्वच्छता विभागातील एका लिपिकाला एसीबीने लाच घेताना पकडल्यामुळे आयुक्त निष्टिद्धr(155)ातच हतबल झाले असतील! ‘लाच देणे व घेणे’ हा गुन्हा असला तरी त्याचे खापर नागरिकांवर फोडून चालणार नाही. गेल्या काही दिवसांत ‘प्रहार’ने सातत्याने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यानिशी बाहेर काढूनदेखील महापालिका आयुक्तांनी त्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे ऐकण्यात आले नाही. भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा करूनही समस्या सुटणार नाही, त्यावर सरकारने कायद्यात अपेक्षित बदल करून कडक शिक्षेची तरतूद केली पाहिजे.- मधुकर कुबल, बोरिवली, पूर्व
भ्रष्टाचारमुक्त होणे अशक्य
महानगरपालिकेचे अधिकारी यमपुरीत गेले तरी तेथेही भ्रष्टाचार करतीलच. आशिया खंडात मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार करण्यात नंबर एकवर आहे. २०१२ साली अनधिकृत बांधकामाची तक्रार केली होती. कारण माझी आई ९० वर्षाची आहे. तिला बाहेर येण्या-जाण्यासाठी अनधिकृत बांधकामाचा फारच त्रास होत असे. मालक, दुकानदार व काही महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या संगनमतानी हे अनधिकृत बांधकाम केले होते. माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही महानगरपालिका न्याय देऊ शकत नाही, असे किती तरी तक्रारदार मुंबईत आहेत. त्यांच्या तक्रारीचे निवारण झालेलं नाही. कारण या अधिका-यांच्या तोंडाला करोडो रुपयांची चट लागलेली आहे. या कलियुगात महानगरपालिका कधीच भ्रष्टाचारमुक्त होणार नाही.- रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव
कठोर धोरणाची गरज
देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की जेथे भ्रष्टाचार नाही. पैसा मिळवणे व भौतिक सुख उपभोगणे हाच जीवनाचा अर्थ समजला जात आहे. यामुळेच आज पालिकेची संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट झालेली पाहायला मिळते. लाच दिल्याशिवाय आज कोणतेही काम होत नाही आणि या विरोधात कोणीही काही करत नाही. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सेवा देणे हे पालिकेचे प्रथम कर्तव्य असताना, गेल्या काही वर्षात महापालिकेचे नाव भ्रष्ट कारभारामुळे धुळीस मिळाले आहे. अधिकारी असो किंवा कर्मचारी तो कितीही मोठा पगारदार असला, तरी लाच घेणे हा त्याचा पेशा झाला आहे. सध्या गाजत असलेले लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी म्हणजे भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. लाचखोर अधिका-यांना पालिका प्रशासन वठणीवर आणण्यासाठी कठोर धोरण राबविणे हीच काळाची गरज ठरेल.- राजा मयेकर, लोअर परळ, मुंबई
शपथेने काय होणार
जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळय़ाचा; परंतु कुचेष्टेचा झालेला विषय भ्रष्टाचार निर्मूलन या विषयाविषयी कितीही डोकेफोड केली तरी काही फरक पडणार नाही, अशी आजची स्थिती आहे. काही सरकारी कर्मचारी चिरीमिरीसाठी सोकावले आहेत. त्यांना कुणाचेही भय वाटेनासे झाले आहे. जोपर्यंत राज्य व्यवस्था व जनमाणसांची भ्रष्टचाराबद्दलची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहणार. भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह किंवा भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेऊन कर्मचा-यांमध्ये अवेरनेस येणार नाही. भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी कायद्याची प्रभावी व चोख अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.- दादासाहेब येंधे, काळाचौकी
भ्रष्टाचारमुक्त निर्णय योग्यच
प्रत्यक्षात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भ्रष्टाचार समूळ नष्ट करून प्रशासन भ्रष्टाचारमुक्त असेल, तरच देश सुधारेल. यासाठी ठोस हालचाली घडवून आणणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शुद्धीकरणाचा श्रीगणेशाही भ्रष्ट अधिका-यांना घरी पाठवूनच करावा. असे झाले तरच महापालिकेतील कारभार ‘भ्रष्टाचारमुक्त’ बनविण्याचे स्वप्न आयुक्त, स्थानिक खासदार, आमदार, जनसामान्यांनी माहिती, अधिकाराचा वापर, वृत्तपत्रे, पोलिस यांनी ठरविले तर खरोखर भ्रष्टाचारमुक्त होईल. परंतु येथे इच्छाशक्तीची गरज असून ‘भ्रष्टाचारमुक्त’ बनविण्यास व त्यात पारदर्शकता येण्यासाठी सगळय़ांनीच प्रयत्न करायला हवे. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी लाच देणे आणि देणं गुन्हा असून, भ्रष्ट अधिकारी व लाच देणा-यांवरही कारवाई झाली पाहिजे, तरच भ्रष्टाचार निर्णय योग्य म्हणावा. – कमलाकर जाधव, बोरिवली, पूर्व
जित्याची खोड मेल्याशिवाय..
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.. व्यसनी घरादाराची राख- रांगोळी झाल्याशिवाय व्यसनमुक्त होत नाही. तद्नुसार भ्रष्टाचाराची कीड शपथा घेऊन मरणार नाही. मनपात आज कोटय़वधी रुपये कर रूपाने जमा होत आहेत. परंतु तरीही या मुंबईची भ्रष्ट अधिका-यांनी दुरवस्था केली आहे. मनपाच्या अधिका-यांमुळे भ्रष्टाचार फोवावत असून, भ्रष्टाचार फोफावण्यास भ्रष्ट अधिकारीच जबाबदार आहेत. लाच घेणे व देणे आमच्या रक्तातच भिनले आहे. त्याशिवाय पुढचे पान हलतच नाही. मात्र भ्रष्टाचारमुक्तीसाठी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई हाच एकमेव पर्याय असून, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, ही म्हण तेव्हाच खरी ठरेल. – रवींद्र सावंत, घाटकोपर
सर्वच जबाबदार
मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी शपथ घेतली. भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी काही विभागांतील अधिका-यांच्या बदल्याही करण्यात आल्या. खरं म्हणजे भ्रष्टाचारमुक्तीसाठी नुसत्या शपथा किंवा बदल्या करून भ्रष्टाचाराची कीड संपणार नाही. तर त्यासाठी पालिकेच्या अधिका-यांची इच्छाशक्ती हवी. मी लाच घेणार नाही, तर माझं काम मी पारदर्शक करेन. कारण त्यासाठी त्यांना त्याचा मोबदला व इतर सोयी मिळत असताना भ्रष्टाचार कराच का! टाळी एका हाताने वाजत नाही, तर जोपर्यंत देणारे आहेत तर घेणा-यांचेही हात पुढे होतात. याला सर्वच जबाबदार आहेत. भ्रष्टाचारमुक्त पालिका करण्यासाठी एखाद्या जर भ्रष्टाचार करताना पकडला तर लगेच त्याची नोकरी गोठवून त्याचा सर्वच बाबी गोठवाव्यात! यासाठी मुंबईकर जनतेने व महापालिका प्रशासनाने हातात हात घालून पालिका भ्रष्टाचारमुक्त करावी व स्वत:ही मुक्त राहावे.- सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
भ्रष्टाचाराला आळा बसेल ?
मुंबई महानगरपालिकेच्या ‘भ्रष्टाचारमुक्त’ सप्ताहातच डेंग्यू प्रकरणामुळे त्यांचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. सत्य हे की कित्येक वर्षे हा भ्रष्टाचाराचा डेंग्यू सातत्याने मनपात उच्छाद मांडून बसलेला आहे. आता तो सर्वकाळ व सर्वव्यापक बनला आहे. ‘कठोर कायदे, सप्ताह, शपथा’ इत्यादी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ‘अक्सीर’ इलाज नाहीच. एकमेव उपाय ठरतो तो उत्स्फूर्त, प्रभावी जनआंदोलन. विश्वास व इच्छाशक्ती अनिवार्य आहे. ‘लाच घेणे-देणे’ हा भयंकर गुन्हा आहे, त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे, अशी प्रत्येकाला प्रकर्षानं जाणीव झाली पाहिजे. तरच भ्रष्टाचारला आळा बसू शकेल, अन्यथा ‘सर्व’ व्यर्थच!- सी. बावस्कर, परळ
भ्रष्टाचाराला आळा म्हणजे स्वप्नरंजन
आपल्या देशात सर्वच यंत्रणांनी भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. शपथ घेऊन भ्रष्टाचारमुक्त होण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे तो भाबडेपणा ठरेल. राजकारणात, प्रशासनात येऊन बक्कळ पैसा कमवून श्रीमंत कसे होता येईल, हीच सर्वाची मनीषा असते. आजच्या घडीला सर्वच शासन प्रशासनातील यंत्रणेने ठरविले तरच प्रामाणिकपणे भ्रष्टाचार निपटून काढायचा तरच हे शक्य होईल. मुंबईकर महापालिका मिळून काही पाऊल टाकीत असेल तर तो स्तुत्य उपक्रम ठरेल आणि त्याला यश यावे, इतकेच.- शंकर पानसरे, काळाचौकी
सक्तमजुरीची शिक्षा हवी
शपथ घेऊन पालिका भ्रष्टाचारमुक्त होईल हा एक मोठा विनोद होईल व लोकांना थेट मूर्ख बनविण्याचा एक प्रयोग होईल. लाचलुचपत खात्यातील एक अधिकरी प्रत्येक महापालिकेने नेमावा व जेनेकरून आपली कामे त्याच्याकडे सोपवावीत व एका विशिष्ट मर्यादेत कामे झालीच पाहिजेत, असा एक कायदेशीर दंडच घालावा. लोकांना कामामुळे भ्रष्टाचारला बळी पडावे लागते. सेवाभावी संघटनांनासुद्धा काम द्यावे व त्यांच्यामार्फतच ठरावीक वेळेत काम झालेच पाहिजे अन्यथा त्या कर्मचा-याला ताबडतोब जबाबदार धरावेच! लाच न देता मुंबईकर व प्रशासकीय अधिकारी हा प्रश्न सोडवू शकतात! आणि लाच घेताना पकडलेल्या जाणा-या कर्मचा-यास तिथल्या तिथेच पंधरा वर्षाची सक्त मजुरी ठोठावी.- प्रभाकर देशपांडे, गोवंडी
कारवाईची गरज
भ्रष्ट अधिका-यांच्या तोंडा पैशांची लालच लागली असून, पैसे कमवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. शपथ घेऊन भ्रष्टाचाराचा प्रश्न सुटणार नसून, भ्रष्ट अधिका-यांवर कारवाईची गरज आहे. भ्रष्टाचाराला लगाम लावणा-या अधिका-यांची त्वरित बदली करणे हा देखील उपाय नाही. पालिका आयुक्तांसह अधिका-यांनी शपथ घेऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासन होणार हे सर्वसामान्यांना स्वन्पच दाखवले आहे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी इच्छाशक्तीची गरज असून, यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी स्वत: इच्छा दाखवली पाहिजे. लाच देणं व घेणं गुन्हा असतानाही पैसे देणे याला सर्वसामान्यही तितकाच जबाबदार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असून, त्याशिवाय हा प्रश्न भविष्यात सुटणार नाही. भ्रष्टाचाराची कीड पालिकेच्या बडय़ा अधिका-यापासून शिपायापर्यंत सर्वानाच लागली आहे. शपथ घेऊन या कीडेचा नायनाट होणे शक्य नसून, कामासाठी पैसे मागणा-या संबंधित अधिका-याला थेट तुरुंगाचा रस्ता दाखवला पाहिजे. भ्रष्टाचाराची तक्रार येताच ती खरी असल्यास संबंधित अधिका-यावर कठोर कारवाई केल्यास भविष्यात दुसरे कोण पैशाची मागणी करणार नाही. – विकास पाटील, विद्याविहार
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
खडी फोडायला पाठवा
मुळात मुंबई महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे विशाल कुरणच! अशा या महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आयुक्तांसह सर्व अधिका-यांनी म्हणे सामुदायिकरीत्या शपथ घेतल्याची बातमी वाचनात आली. ही जर वस्तुस्थिती असेल, तर हा शपथ उपक्रम सोहळा म्हणजे एक थोतांडच म्हणावे लागेल. केवळ सामुदायिक शपथ घेऊन भ्रष्टाचारमुक्त कारभार होणार असेल, तर संबंधित पोलिस यंत्रणाच गुंडाळून ठेवावी लागेल. भ्रष्टाचार ही एकप्रकारे विकृती असल्याने व ती व्यक्तिसापेक्ष असल्याने तिचे निर्मूलन ही बाब अशक्य वाटते. संबंधित कायद्यांतील त्रुटी दूर करून कायदे कडक करणे व अंमलबजावणी करीत भ्रष्टाचा-यांना किमान सात वर्षे खडी फोडायला पाठविले, तरच भ्रष्टाचार करणा-यांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आढळेल.- मधुकर ताटके, गोरेगाव (प.)
भ्रष्टाचार एक अविभाज्य अंगच
महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त होणे म्हणजे एक आश्चर्यकारक बाब आहे, असे प्रत्येकाला वाटेल; कारण आजपर्यंत महाराष्ट्रात अदभूत घटना घडणे म्हणजे, देशाचे ग्रिनीज रेकॉर्ड बुकात नोंद घेण्यासारखे आहे. ज्या पालिकेत भ्रष्टाचार म्हणजे एक दैनंदिन जीवनातील उपभोगी भाग समजला जातो. त्या पालिकेतील कारभार भ्रष्टाचारमुक्त होणे शक्य तरी आहे का! महापालिकेचे कार्यालयीन काम सत्य व स्वजनशील राहील याची आयुक्त-अधिका-यांनी दक्षता घ्यावी, प्रत्येक नागरिकांनी जागृत राहून भ्रष्टाचार करणा-याला महापालिका अधिका-यांच्या निर्देशनात आणून देणे, लाच देणा-यांनीसुद्धा क्षुल्लक कामासाठी अधिकारी किंवा कर्मचा-याला भ्रष्ट करू नये, नागरिकांनी भ्रष्टाचाराविषयी जनजागृती करावी, महापालिकेच्या आयुक्तांनी, अधिका-यांनी, कर्मचा-यांनी आणि नागरिकांनी मन:पूर्वक शपथ घेऊन भ्रष्टाचारमुक्तीची कारवाई कृतीतून उतरवून राज्याचा स्वच्छ कारभार चालवाल तरच भ्रष्टाचा-यांचा कायमचा नायनाट होईल.- राजेंद्र सावंत, टिटवाळा
मानसिकतेची खरी गरज
महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी घेतलेली शपथ यासारखा दुसरा विनोद नाही. छोटय़ा-मोठय़ा कुठल्याही कामासाठी पालिकेतील कर्मचा-यांना ‘चहापाणी’ द्यावे लागते असा संकेतच समाजात रूढ झालेला आहे आणि याला कारणीभूत ठरलाय तो काही अपवाद वगळता पालिकेचा कर्मचारी वर्ग. ज्यात छोटय़ा शिपायापासून ते मोठय़ा अधिका-यांपर्यंत बहुतेक सगळेच आले. लाच देणे हा गुन्हा आहे हे कळत असूनसुद्धा ती जर दिली नाही तर रखडपट्टी निश्चित हे माहीत असल्यामुळे मुंबईकराला पैसे देऊन आपली कामे करून घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही. शपथ घेण्यामागचा हेतू उदात्त असेल आणि त्याप्रमाणे खरोखरंच प्रयत्न होत असतील तर आनंदच आहे. पण नुसत्या शपथेवर न थांबता लाच घेणे बंद झाले पाहिजे. पालिका कार्यालयात सीसीटीव्ही लावून ‘देवाणघेवाणी’ वर देखरेख ठेवावी. वेळोवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घातलेल्या धाडीत सापडलेल्या लाचखोरांना कडक शिक्षा झाल्याचे दिसून येत नाही. काही काळाच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत दाखल केल्याची उदाहरणे आहेत. तसे न होता कायमस्वरूपी निलंबन झाल्यास उर्वरित लाचखोरांना जरब बसू शकते. खरी गरज आहे ती लाच न देण्याची व न घेण्याची मानसिकता तयार होण्याची!- दीपक का. गुंडये, वरळी
उपाययोजनांची गरज
मुंबईसह राज्यातही डेंग्यूचा ताप वाढला असून आतापर्यंत राज्यात डेंग्यूचे साडेतीन हजार पेशंट आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात डेंग्यूने २४ जणांचा बळी घेतला आहे. शहरातील डेंग्यू रोखण्यास पालिका अपयशी ठरल्याने या अपयशाचे खापर नागरिकांवर फोडले जात आहे. डेंग्यूचा ताप हा विषाणूंमुळे होणारा आहे. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीसइजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुस-या निरोगी व्यक्तीस संक्रमणित केले. साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होते. डेंग्यूला अटकाव करण्यासाठी पालिकेने प्रभावी उपाययोजना करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. डासांचा नायनाट करण्यासाठी धूरफवारणी नियमित केली पाहिजे. पालिकेने शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. मुंबई अत्यंत बकाल शहर झाले आहे. अशाने रोगराई पसरणार नाही तर काय होणार? लोकांमध्ये स्वच्छतेची वृत्ती स्वत:हून येणे गरज आहे. अजूनही लोक सर्रास स्त्यावर कचरा टाकतात. उघडय़ावरचे खाद्यपदार्थ विकणा-यांवर बंदी आणावी. उघडी गटारे झाकली पाहिजेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे डेंग्यूच्या काळात प्लेटलेट्स व रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या सर्व उपाययोजना केल्यास डेंग्यूला रोखणे कठीण जाईल.- विवेक तवटे, कळवा
भ्रष्टाचार मुक्ततेसाठी कारवाईची गरज
मुंबई महापालिका भ्रष्टाचारात नंबर वन असल्याचा अहवाल यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केला आहे. महापालिका प्रशासनाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड शपथ घेऊन अथवा अधिका-यांच्या बदल्या करून भ्रष्टाचार साफ करणे शक्य नाही. भ्रष्टाचाराने मुंबई महापालिका पूर्णत: पोखरली असून, याला प्रशासन व मुंबईकर जबाबदार आहेत, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे. लाच देणं व घेणं गुन्हा असून, भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. शिपायापासून बडय़ा अधिकारी वर्गाला भ्रष्टाचाराची कीड लागली असून, भ्रष्टाचा-यांना थेट तुरुंगाचा रस्ता दाखवणे हाच पर्याय आहे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून मांडले. भ्रष्ट कारभार थांबवा, अशी आेरड करण्याआधी मुंबईकरांनी स्वत: भ्रष्टाचार मुक्ततेसाठी पाऊल उचलणे अधिक सफल ठरेल, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर आळा घालण्यासाठी अधिका-यांनीच शिस्तबद्धपद्धतीने काम केल्यास आळा घालणे शक्य होईल, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. महापालिकेतील भ्रष्टाचार मोठय़ा जोराने पसरत असून, आताच लगाम न लावल्यास भविष्यात महापालिकेचे नाव धुळीस मिळण्यास वेळ लागणार नाही आणि याला प्रशासन व मुंबईकर जबाबदार असतील, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला.
प्रभावी उपाय आवश्यक
नागरिकांच्या हितासाठी पालिकेचे असलेले नियम मोडण्यातच नागरीक धन्यता मानत असल्याने त्यांना प्रशासन व नगरसेवकांकडून लुबाडणूक सहन करावी लागते. सध्या जरी भ्रष्टाचार विरोधी शपथ घेण्यात आली असली तरी, पूर्वीही सर्वच सरकारी खात्यातील कर्मचारी गांधी-नेहरूंचे फोटो किंवा ‘सत्यमेव जयते’ या वचनाखाली बसून लाच घेत होते. त्यामुळे शपथेचे गांभीर्य टिकण्यासाठी समाजातील चंगळवादी राहणीमानाचे आकर्षण कमी करणे व माहितीच्या अधिकाराच्या नियमाचा प्रभावीपणे व सुयोग्य वापर करण्याचे नागरिकांना प्रशिक्षण द्यावे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी प्रभावी योजनेची गरज आहे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहिम
भ्रष्टाचार विरोधात स्वातंत्र लढा उभारूया!
स्वातंत्र्य भारतातील ‘भ्रष्टाचार’ हा आपली भक्कम असलेली अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा मोठा राक्षस जन्मला आहे. मात्र त्यापुढे हतबल न होता आपण सर्वानी एकजुटीने त्याचा मुडदा पाडण्याचा निर्धार करायला हवा. मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्याची आयुक्तांसह अधिका-यांनी घेतलेली शपथ ही वरवरची मलमपट्टी असून त्यात तथ्य नाही. वर्षानुवर्षे काळ्या पैशांत मुरलेल्या अधिका-यांच्या एका शपथेने भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे दिवास्वप्नच ठरेल यात शंका नाही. लाच घेतली नाही तर आपली पत कमी होईल असे त्यांना वाटते. मात्र महापालिकेने भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ असा देखावा वगैरे करण्यापेक्षा लवकरात लवकर महापालिकेच्या सर्वच खात्यांमध्ये सिसिटिव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून लाच देणारा व लाच घेणा-याचं पितळ उघडं पडेल. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी लढा असायला हवा. – दिलीप अक्षेकर, माहिम
भ्रष्ट कारभाराला लगाम लावा..
महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसेल असे वाटत नाही. ‘भ्रष्टाचारमुक्त’ शपथ हा देखावा नको. आयुक्ताने कडक शासनाची अंमलबजावणी करणे ही खरी गरज आहे. कुठल्याही कामासाठी पैशाची मागणी करणे आणि देणा-याने लाच देणे व घेणे गुन्हा आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मुंबईकर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतलाच पाहिजे याकरिता महापालिका कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक फिरते पथक ठेवावे. या पथकाची फिरती गस्त असावी, व … अंमलात आणावे प्रत्येक खात्यातील एका-एकास पकडल्याने बरीच बेहिशेबी मालमत्ता उघडकीस येईल. मोदी सरकराने ‘अच्छे दिन’ येतील हाच एक मार्ग आहे असे वाटतेय. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी
भ्रष्टाचार संपणे अशक्य
एका हाताने ‘दिलेले’ दुस-या हाताला समजत नाही ते ‘दान’ तर एका हाताने ‘घेतलेले’ दुस-या हाताला समजत नाही तो ‘भ्रष्टाचार’ महापालिकेतील भ्रष्टाचाराचे निर्मूलन आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्या शपथेने होणार असेल, असे क्षणभर मानले तर ही शपथ यापूर्वीच का घेतली नाही, असा प्रश्न विचारावासा वाटतो. नागरी सुविधा पुरविण्याचे अधिकार केवळ महापालिकेकडे असल्यामुळे आजवर त्यांचा मनमानी कारभार सहन करण्यावाचून या मुंबईकरांना गत्यंतर राहिले नाही. हा भ्रष्टाचार चालूच राहणार. – सूर्यकांत भोसले, मुलुंड
भ्रष्टाचा-यांना घरचा रस्ता दाखवा
कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात नाही असे म्हणूच शकत नाही. म. न. पा. भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी शपथेची गरजच काय? आयुक्तांसह सर्वच शपथ घेतात तर काही अधिका-यांची इतरत्र बदली केली जाते याचा अर्थ काय! कुणाही भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचा-याला वाटले नाही का की मुंबई महापालिका प्रशासन आपल्या कामाचे नियमित वेतन देत असताना अशा गैरमार्गाने संपत्ती जमा करणे चुकीचे आहे. मुंबईकरांना आपली कामे होणे महत्त्वाचे वाटत असल्याने नोकरी धंदा, रोजगार बुडवून लहान सहान कामासाठी किती चकरा टाकणार आणि पालिका कर्मचारी चिरीमिरी घेतल्याशिवाय दाद देत नाहीत. सेवेत लागल्यावर भ्रष्टाचार करणार नाही याची जाणीव नसलेल्यांना घरी बसवलेलेच चांगले. – मुरलीधर धंबा, डोंबिवली
कठोर शिक्षा हवी
महानगरपालिका आयुक्तासह अधिकारी वर्गानी ‘शपथ’ घेतली म्हणजे भ्रष्टाचाराला बिलकूल लगाम वा आळा बसणार नाही. शपथ घेणारे खुनी, भ्रष्टाचारी, अत्याचारी, बलत्कारी, चोर, लफंगे, गुंड, खंडणीखोर अशा तऱ्हेचे गुन्हेगार न्यायालयात, न्यायाधिशासमोर नेहमी गीतेवर हात ठेवूनच शपथ घेऊन खोटे बोलत असतात. तेव्हा ‘शपथ’ घेऊन भ्रष्टाचाराची गुन्हेगारी नष्ट होणार नाही. महापालिकेतील भ्रष्टाचाराला खरोखरच आळा बसवायचा असेल तर ‘लाच’ देणा-याला गुन्हेगार न समजता लाच घेणा-याला, मागणा-यालाच गुन्हेगार समजले पाहिजे, आणि त्याला कठोरात कठोर ‘जन्मठेपेची शिक्षा’ त्वरित देण्यात आली पाहिजे. नागरिसमस्येबाबत सोपे नियम व कायद्याची कमीत-कमी योजना आखली जावी. तरच भ्रष्टाचाराला थोडातरी आळा बसेल, असे मला वाटते. – प. रा. हंबीर, मुंबई
शपथ घेणे पर्याय नाही
पैशांचे राजकारण-सत्ताकारण हे अर्थकारणावर चालते. नुकत्याच पार पडलेल्यौ विधानसभा निवडणुकीत उमेदवारा खर्चाची मर्यादा असतानाही अवाच्या सव्वा खर्च करण्यात आले असून, कोट्यवधी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. माणसाच्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचाराला प्रथम स्थान असून, काही दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही. महापालिकेत कुठल्याही कामासाठी गेल्यास काय द्या नंतरच काम मार्गी लागते हे जगजाहीर आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी शपथ घेण्याची गरज नसून, कृतीची गरज आहे. भ्रष्ट अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केल्यास भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होऊ शकतो. – महादेव गोळवसकर, घाटकोपर
इच्छाशक्तीची गरज
भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी अधिक उपाययोजना आखण्याची गरज आहे. कुठल्याही कामासाठी पैसे देऊन त्वरित करुन घेणे ही मानसिकता बदलण्यासाठी लोकांनी स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिका-यांना लाच देण्याची प्रथा मोडीत काढली पाहिजे. आपले काम त्वरित व्हावे यासाठी लोकही नियमांना केराची टोपली दाखवतात. लाच देणं व घेणं हा गुन्हा असून, कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करुन घेतल्यास भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. काही दिल्याशिवाय आपले काम होणार नाही, हा समज चुकीचा असून, लोकांना हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर पोहचली आहेत की, ती नाहीशी करण्यासाठी नागरिकांची प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे. मुळात दलाल संस्कृतीचा बिमोड केला पाहिजे. शपथ अनेकदा घेतल्या जातात. शपथेचे पालन होत नाही. भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी महापालिकेत आपल्या कार्यप्रणालीत आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. – संतोष पाटील, बोरीवली
भ्रष्टाचारमुक्त होणे अशक्यच
भ्रष्ट अधिका-यांचे व राजकीय नेत्यांशी सबंध चांगले असल्यामुळे भ्रष्टाचाराला लगाम लावणा-या अधिका-यांची बदली केली जाते. चांगल्या अधिका-यांची बदली केल्याने कोणत्या कामासाठी पैशाची मागणी केली ते उजेडात येत नाही. प्रत्येक कामासाठी कागदपत्रांची पूर्तता असताना व नसतांना सबंधित कामाच्या बाबतीत महापालिकेच्या काही अधिका-यांना टेबलाखालून काही दिल्याशिवा काम होत नाही. ज्याच्याकडे कागदपत्राची पूर्तता आहे, पण पैसा नाही तो संपला. काम छोटस असतानाही सामान्यनागरिकांना पालिका कार्यालयात विनाकारण फे-या मारायला लावतात, हे योग्य नसून, त्याकडे आयुक्ताने तक्रारी येताच त्या भ्रष्ट अधिका-याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतु आपल्या अंगी काही घेण्याची सवय लागल्याने भ्रष्टाचारमुक्त महापालिका होणे शक्यच वाटते. – अशोक भोसले, मुलुंड
कारवाईची आवश्यकता
सरकारी आणि महापालिका कार्यालयात दरवर्षी भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र त्यातून काहीही साध्य होत नसून, भ्रष्टाचार अधिकच पसरत आहे. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्यासाठी आपल्या अधिकारी व कर्मचा-यांसह शपथ घेतली. परंतु त्याच कालावधीतच स्वच्छता विभागातील एका कारकुनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले. एसीबीच्या कारवाईमुळे आयुक्तांनी घेतलेली शपथ याचा खरोखर फायदा होईल का, असा प्रश्न कुंटे यांनाच पडला असेल. लाच देणे व घेणे हा गुन्हा असला तरी त्याचे खापर नागरिकांवर फोडून चालणार नाही. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा करूनही भ्रष्टाचाराची समस्या सुटणार नाही. भ्रष्टाचारमुक्तीसाठी कठोर कायद्याची गरज असून, कायद्यात अपेक्षित बदल करून कडक शिक्षेची तरतूद केली पाहिजे. – सुजीत डोईफोडे, गोरेगाव
भ्रष्टाचारमुक्त होणे अशक्य
महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असून, ते कुठेही गेले तरी तेथेही भ्रष्टाचार करणार यात दुमत नाही. आशिया खंडात मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे एक वेगळे नाव होते. परंतु आता भ्रष्टाचार करण्यात नंबर एक अशी आेळख आशियाखंडात झाली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केली तर कारवाई करण्याआधी समोरील व्यक्तीशी हातमिळवणी करुन सेटलमेंटही होते. सामान्य माणसाला ही महानगरपालिका न्याय देऊ शकत नाही. महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कितीही असले, तरी तक्रारदाराची दखल घेणारे अधिकारीच भ्रष्ट असल्याने न्याय मिळणार तरी कोणाकडे, असा प्रश्न मुंबईकरांना शंभर टक्के सतावणारच. अधिका-यांच्या तोंडाला करोडो रुपयांची चट लागली असून, महानगरपालिका प्रशासनाचा कारभार कधीच भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. – विजय कांबळे, विक्रोळी
कठोर धोरणाची गरज
मुंबई महापालिकेच्या कुठल्याही विभागात कामासाठी गेल्यास सर्वत्र भ्रष्टाचार दिसून येतो. पैशाशिवाय कुठलेही होत नाही, हे जगजाहीर असून, अधिकारी व कर्मचा-यांना याबाबत लाज कशी वाटत नाही. पैसा मिळवणे व भौतिक सुख उपभोगणे हाच जीवनाचा अर्थ समजला जात आहे. यामुळेच आज पालिकेची संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट झालेली पाहायला मिळते . लाच दिल्याशिवाय आज कोणतेही काम होत नाही आणि या विरोधात कोणीही काही करत नाही. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सेवा देणे हे पालिकेचे प्रथम कर्तव्य असताना, गेल्या काही वर्षात महापालिकेचे नाव भ्रष्ट कारभारामुळे धुळीस मिळाले आहे. अधिकारी असो किंवा कर्मचारी तो कितीही मोठा पगारदार असला, तरी लाच घेणे हा त्याचा पेशा झाला आहे. लाचखोर अधिका-यांना पालिका प्रशासन वठणीवर आणण्यासाठी कठोर धोरण राबविणे हीच काळाची गरज ठरेल. – गणेश घोरपडे, कांजूर मार्ग
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
लाच देणंच बंद करा
नुकतीच महापालिका आयुक्तांनी भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ घेतली. तसेच अधिकारी, कर्मचारी यांना शपथ घ्यायला सांगितली. फक्त आयुक्तांनी अथवा अधिका-यांनी शपथ घेऊन भ्रष्टाचार मुक्त होतील, कारण त्यांची जन सामान्यातील प्रतिमा स्वच्छ आहे. परंतु बाकीच्या बाबुंचे काय? जिथे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे, या चालीने चालणारे अधिकारी कर्मचार्याना अशा खोट्या शपथा ते बिन दिक्कत घेतील. मुंबईकरांना पालिकेच्या साधा फॉर्म घेण्यासाठी सुद्धा चिरीमिरी द्यावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. आशियामधील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरविणा-या पालिकेच्या तिजोरीत नेहमीच खडखडात असतो. हा केवढा मोठा विरोधाभास आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचा-यांचे वेतन हे भारतातील अन्य पालिकामधील वेतन असून सुद्धा नेहमीच जनतेच्या कामांकरिता चिरीमिरी घेण्याची सवय हेच भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. अनधिकृत रस्त्यावरील फेरीवाले यांना अर्थपूर्ण सहयोग वार्ड अधिका-यांचे असते. जर या फेरीवाले, आणि मुंबईकरांनी लाच अजिबात दिली नाही, तर यांना मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा बसेल. – नरेंद्र कदम, मुंबई
जनतेच्या वज्रमूठीचा प्रत्यय यावा
भ्रष्टाचार हा शिष्टाचार राहू द्यायचा नसेल तर नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भ्रष्टाचा-यांच्या मुसक्या आवळण्याची जबरदस्त क्षमता जनतेत आहे. पण दुर्दैवाने त्या ताकदीचा उपयोग होत नसल्याने भ्रष्टाचारी अधिका-यांची चंगळच झाली आहे. पैसे,वस्तू वा अन्य कोणतीही मागणी करणा-या अशा भ्रष्टाचा-यांना धडा शिकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे त्यांच्याच मोबाईलवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणे. तसेच भ्रष्टाचाराचा ठपका ठेवेलेल्या महाशयांना त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेतील कोणताही लाभ न मिळता खाली हाताने घरी रवानगी करता येईल, असा कायदा सिध्द करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कारण अशांना तुरुंगात पाठवणे म्हणजे पुन्हा जनतेच्याच खिशावर यांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचा भार टाकण्यासारखे आहे. भ्रष्टाचार करून संपूर्ण व्यवस्था खिळखिळी करणारे कोणत्याही दयेस पात्र असूच शकत नाही. या बांडगुळानचा सपशेल बिमोड करण्यासाठी जनतेची भ्रष्टाचार मुक्तीची वज्रमुठ तयार होऊन त्याचा प्रत्यय अशांना दिसणे आवश्यक आहे. मुळात म्हणजे यांचा जीव ज्यासाठी घुटमळत असतो तो म्हणजे पैसा. तोच यांच्याकडून जप्त करून घेतल्यास ’सोन्याहून पिवळे’ होईल. भ्रष्टाचार करून कमालीचे सुस्त झालेले असे कर्मचारी सुतासारखे सरळ होतील. आमचे हात काय ते ओले करा म्हणजे झाले. अशाप्रकारे काम करण्याची शपथ घेतल्याप्रमाणे जो चीड आणणारा कारभार सुरु आहे, तो ठेचला जाणे अत्यावश्यक आहे. भ्रष्टाचार करणा-यास त्याच क्षणी रिकाम्या हाताने जोपर्यंत हाकलून दिले जात नाही, तोपर्यंत त्याच्याच पावलावर पाऊल टाकून अजून काहीतरी निराळे उद्योग करू इच्छीणा-यास जरब बसणार नाही.- जयेश राणे, भांडुप
लोकांनीच वाढवलाय भ्रष्टाचार..
एखाद्या जागेवर झोपू योजना सुरू झाली की, पाणी, गटारे, औषध फवारणी, सुधारीत आराखडा, नियोजित आराखडा, इमारतीची अधिकृत उंची, रस्ते आणि वीजसारख्या महत्त्वपूर्ण बाबींसाठी विकासकाला मुंबई महापालिकेच्या अधिका-यांना ‘भेटावे’ लागते. खरी भ्रष्टाचाराची मैलीगंगा येथेच वाढते. प्रत्येक विकासकाला काम करण्याचा ‘शॉर्टकट’ येथेच माहित पडतो. सर्वसामान्य माणसाला झोपडपट्टीत चौदाफूट उंचीचे अधिकृत घर बांधायचे असले, तरी संबंधीत खात्याच्या अधिका-यांना चार,पाच हजार रुपये ‘चिरिमीरी’ द्यावीच लागते, मग विचार करा, झोपुयो अंतर्गत वरील सर्व खात्यातील अधिकारी विकासकाला किती नागवत असतील? भ्रष्टाचारास लोकच जबाबदार आहेत. – सुरेश कु-हे, घाटकोपर
मोदींचे स्वच्छता अभियान फार्स वाटतो का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्यास सुरुवात केली असून, मोदींपाठोपाठ अनेक उद्योजक व सिनेकलावंत स्वच्छ भारत अभियानासाठी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानामुळे भारत खरोखर स्वच्छतामुक्त होईल का? स्वच्छ अभियानाच्या नावाखाली लहान मुलांच्या हाती झाडून देऊन सफाई अभियान राबवणे योग्य वाटते का? स्वच्छ अभियान हे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी वाटते का? हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यापेक्षा जनजागृतीची अधिक गरज आहे का? स्वच्छ भारत यासाठी लोकांनीही पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही त्यांचीही जबाबदारी आहे का? फोटो काढून स्वच्छता अभियान खरोखर सफल होईल, असे वाटते का? स्वच्छतेसाठी नियोजनाची गरज आहे का?
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.
त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत