वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जात असले तरी वाचनाची आवड सर्वामध्ये निर्माण करून ग्रंथालयाची देखभाल आणि विकास करण्याकडे महापालिकेचा मात्र कानाडोळा होत आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/05/library.jpg)
मुंबई – ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जात असले तरी वाचनाची आवड सर्वामध्ये निर्माण करून ग्रंथालयाची देखभाल आणि विकास करण्याकडे महापालिकेचा मात्र कानाडोळा होत आहे. मुंबई महापालिकेने आपल्या गं्रथालयांसाठी तरतूद केलेल्या ३० लाख रुपयांपैकी २५ लाखांचा निधीही एशियाटिक लायब्ररीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी केवळ ५ लाख रुपयांचा निधी ठेवून अस्तिवात असलेल्या या ग्रंथालयांनाही मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपा करत आहेत. त्यामुळे आता ग्रंथालय वाचणार कशी, असा सवाल केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये ग्रंथालय तथा वाचनालय यांच्यासाठी ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. महापालिकेच्या वतीने सध्या मुंबईत २९ ग्रंथालये चालवली जात असून या सर्वाना महापालिकेच्या वतीने अनुदान स्वरूपात पैसे दिले जातात. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यासह विविध ग्रंथालयांना महापालिकेच्या वतीने दर वर्षाकरता प्रत्येकी २७ हजार रुपयांचा खर्च केला जातो. परंतु हा खर्च फारच कमी असल्यामुळे तो वाढवून द्यावा, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रंथालयांकडून मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र, आता तर प्रशासनाने तसेच सत्ताधारी पक्षाने कहर केला असून त्यांनी यासाठी तरतूद केलेल्या ३० लाखांच्या निधीतील २५ लाखांचा निधी एशियाटिक लायब्ररीला देण्याचा निर्णय घेतला. महापौरांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निधी एशियाटिक लायब्ररीला देण्याचे निश्चित झाले असून त्याप्रमाणे अर्थसंकल्पातही सुधारित तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडताना या एशियाटिक लायब्ररीसाठी भरघोस तरतूद केली आहे.
तरीही या लायब्ररीला ही रक्कम देण्यात आली आहे.मुंबईतील २९ ग्रंथालयांना सध्या देण्यात येणा-या २७ हजार रुपयांप्रमाणे ७ लाख ८३ हजार रुपयांची गरज असते. परंतु २५ लाख रुपये एशियाटिकला देण्यात आल्यामुळे महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी केवळ ५ लाखांचा निधी उरला असून यामध्ये या ग्रंथालयांची देखभाल कशी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.