शालेय विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी रुपये जादा दराने खरेदी केलेल्या गणवेशाच्या कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.
मुंबई- मुंबई महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका शालेय विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी रुपये जादा दराने खरेदी केलेल्या गणवेशाच्या कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.
या खरेदी प्रकरणात ‘सियाराम कंपनी’चा कपडा बाद ठरवून राद्रीया कंपनीला काम देण्यात आले. यासाठी ९ कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत. त्यामुळे या कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी गणवेश खरेदी करण्यात येत आहे. तब्बल ८५ कोटींच्या या कंत्राट कमी बोली लावणा-या सियाराम कंपनीला न देता राद्रीया या कंपनीला दिले. राद्रीया कंपनीसाठी गणवेशाचा कपडयाची लॅब टेस्ट करण्यात आली.
यात सियारामचा कपडा बाद ठरवला आणि ९ कोटी रुपयांची जास्त बोली लावणा-या राद्रीया कंपनीला देण्यात आले. पण हे कंत्राट देताना कमी बोली लावणा-या सियारामच्या कंत्राट किंमतीत ते न देता त्यांनीच लावलेल्या बोलीत देण्यात आले. त्यानंतरही स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्य मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव हे गैरहजर होते. त्यामुळे या कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे त्यांनी केली होती.
याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. या निवेदनावरच आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असा शेरा मारला आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली असेल याची माहिती नसून यापूर्वी २७ शालेय वस्तू खरेदीला विलंब झाल्याने त्यांची चौकशी समिती नेमली आहे. त्यापाठोपाठ गणवेशासाठी ही स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही गणवेश खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.