प्रत्येक भागात नियमित आणि योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- मुंबईकरांना महापालिकेतर्फे पुरवठा केल्या जाणा-या पाण्यापैकी २९ टक्के पाणी हे चोरी व गळतीच्या रूपाने वाया जात असून, अनेक भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात नियमित आणि योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेतली जाणार आहे. पाण्याचे हे व्यवस्थापन हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लोकसंख्या वाढणा-या उपनगरांसाठीच केले जाणार आहे.
मुंबईला दररोज ३३५ कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो. हा पुरवठा पुरेसा नसून, अनेक भागांमध्ये पाण्याच्या नावाने बोंबच आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुरवण्यात येणा-या पाणी वितरणाचे ‘जीआयएस मॅपिंग’ करून ग्राहकांचा सव्र्हे करण्यासाठी जलतज्ज्ञ कंपनीची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे ध्येय असून, पाण्याच्या वितरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कंपनीची निवड झाल्यानंतर महापालिका संयुक्तपणे पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करेल, असे महापालिकेचे आयुक्त राजीव जलोटा यांनी सांगितले.