चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी ७५ टक्के लोक अल्प शिक्षित असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध झाले आहे.
उस्मानाबाद- चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी ७५ टक्के लोक अल्प शिक्षित असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध झाले आहे. या तिन्ही महापालिकांच्या २०१ जागांसाठी १ हजार २८४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, यातील १०९ निरक्षर, तर ६९७ अल्पशिक्षित असल्याची सत्य समोर आले आहे.
लातूर, चंद्रपूर आणि परभणी या तिन्ही महापालिकांसाठी १९ तारखेला मतदान होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निम्म्यापेक्षा अधिक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमी असल्याचं समोर आले आहे.
शिवाय, यातील अनेकांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर यातील कोट्यधीशांची संख्याही वाखाणण्या जोगी आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म या संस्थेने तिन्ही महापालिकेतील १ हजार २४४ उमेदवारांच्या शपथपत्राचे विेषण केले आहे. त्यानुसार, तिन्ही महापालिकेत मिळून एकूण १२५ उमेदवार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. तर ६४ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, १ हजार २८४ उमेदवारांपैकी एकूण ८०६ उमेदवार अल्पशिक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने ४४, काँग्रेसने ३१, राष्ट्रवादी काँग्रेसने १९, शिवसेनेने १५ कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण ५० लाखांच्या संपत्तीचा मालक आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये ६४ उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.
यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक ७ मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे २४, भाजपचे १८, शिवसेनेचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत.
याशिवाय आणखीन एका निकषाचे उमेदवारांची संख्या या तिन्ही महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आहे. तो म्हणजे साक्षरता. या तिन्ही महापालिका निवडणुकीसाठी १०९ निरक्षरांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तर ६९७ उमेदवारांचे शिक्षणही कमी असल्याचे समोर आले आहे. यातील ११४ जणांनी पाचवी, ११९ जणांनी आठवी, २२६ जणांनी दहावी आणि २३८ जणांनी बारावीपयर्ंतच शिक्षण पूर्ण केले आहे.
एकीकडे सरकारी सेवेत काम करण्यासाठी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित असते. तर दुसरीकडे लोकशाहीच्या मंदिरात निर्णय घेणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याला लोकशाहीचे सबलीकरण म्हणायचे की, विजयी होण्याच्या निकषाने उडवलेली लोकशाहीची थट्टा म्हणायचे असा प्रश्न विचारला जात आहे.