राज्यातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस बिकट झाली असतानाच, ऐतिहासिक महाड शहरातील कचरा समस्येनेही तोंड वर काढले होते.
महाड – राज्यातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस बिकट झाली असतानाच, ऐतिहासिक महाड शहरातील कचरा समस्येनेही तोंड वर काढले होते. गेली अनेक वर्षे या समस्येवर केवळ चर्चाच होत होती. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही समस्या प्रचाराचा मुद्दा बनत होती. मात्र लाडवली गावातील तक्रारकर्त्यांने आपली हरकत मागे घेतल्याने जागेचा प्रश्न निकाली निघाला असून, या जागेतच घनकचरा डम्पिंग करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहणार आहे.
महाड नगरपालिकेची लाडवली या गावात स्वत:च्या मालकीची जागा आहे. ही दोन हेक्टर जागा डम्पिंग ग्राउंडसाठीच राखीव आहे. या जागेवर डम्पिंग ग्राउंड करण्यासाठी २००३ मध्ये परवानगी मिळाली होती. मात्र या कामादरम्यान, या जागेशेजारील जागेचे मालक अविकुमार धुळे यांनी घनकचरा निर्मूलन प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. यासाठी ते न्यायालयातही गेले होते.
परिणामी हा प्रकल्प परवानगी असूनही रखडला होता. आता अविकुमार धुळे यांनी आपली केस मागे घेतल्याने महाडच्या डम्पिंग ग्राउंडचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी गोळा होणा-या सहा टन कच-यापैकी एक टन कचरा भरावासाठी वापरला जाणार आहे. तर उर्वरित कच-यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाणार आहे.
मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांतून निघणा-या कच-याची विल्हेवाट लावण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या बाबतची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिका-यावर टाकली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत, श्रीवर्धन आणि महाड या नगरपालिकांच्या घनकच-याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
माझ्या जागेशेजारी डम्पिंग ग्राउंड करायला माझी हरकत होती. पण महाडकरांची कच-याची समस्या, शहर विकास आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन मी ही केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. – अविकुमार धुळे, याचिकाकर्ता
प्लास्टिक डम्पिंग होणार नाही. ओला आणि सुका कचारा कलेक्शनच्या ठिकाणीच वेगळा केला जाईल. जमा कच-यावर रोजच्या रोज प्रक्रिया केली जाईल. स्टोअरेज व्यवस्थित ठेवले जाईल. अशा काही सूचनांची अंमलबजावणी केली तरी या प्रकल्पाचा त्रास शेजारील वस्तीला होणार नाही आणि प्रकल्पही चांगला चालेल. – राजेंद्र पाटील, उपप्रदेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ