२०१४ या वर्षात तब्बल दोन वेळा बेस्ट बसच्या तिकिटात दरवाढ करण्यात आली. दरवाढीमुळे परिवहन विभागाच्या महसुलात वाढ झाली असली, तरी प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.
मुंबई – २०१४ या वर्षात तब्बल दोन वेळा बेस्ट बसच्या तिकिटात दरवाढ करण्यात आली. दरवाढीमुळे परिवहन विभागाच्या महसुलात वाढ झाली असली, तरी प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. बेस्टच्या तिजोरीत आर्थिक भर पडत असली, तरी भविष्यात प्रवासी व आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागणार, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या पूर्वी बेस्ट बसने दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र तिकीट दरवाढीनंतर प्रवाशांनी पाठ फिरवली असून सध्या दररोज ३८ लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करीत आहेत. बेस्टच्या परिवहन विभागाला आर्थिक फायदा होत असला, तरी प्रवाशांना गळती का लागली, हा संशोधनाचा भाग आहे. दरम्यान बेस्ट उपक्रम आर्थिक डबघाईला जाण्यास अधिकारी, नगरसेवक जबाबदार असून भविष्यातील नियोजनाच्या अभावीच बेस्टवर आर्थिक संकट आेढावले, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
त्यातच खासगी वाहने, शेअर रिक्षा-टॅक्सी आणि आता तर मेट्रोमुळे बेस्ट परिवहन विभागाला स्पर्धक निर्माण झाले आहेत. तर भविष्यात मोनो रेल धावू लागल्यास परिवहन विभागावर शंभर टक्के परिणाम होणार यात दुमत नाही. मुंबईत रोज खासगी वाहनांची संख्या वाढत असून भविष्यात परिवहन विभागाची डोकेदुखी वाढेल, याचा विचार प्रशासन व नगरसेवकांनी यापूर्वी करणे गरजेचे होते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्ट परिवहन विभागाची जगभरात आेळख आहे.
मात्र गेल्या १० वर्षात बेस्टचे अस्तित्व धोक्यात आले असून याला प्रशासनाच जबाबदार आहे. बेस्ट परिवहन विभागात एकूण ३५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर विद्युत विभागात सात हजार कर्मचारी आपली सेवा चोख बजावत आहेत. परिवहन विभागाच्या अंतर्गत दररोज ३८ लाख प्रवासी प्रवास करत असून विद्युत विभागातील कर्मचारी १० लाख वीज ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या काही वर्षापासून बेस्ट प्रशासनाकडून आर्थिक आेरड सुरू आहे. आर्थिक नुकसान नेमके का होते, हे न सुटणारे कोडे आहे. परंतु आर्थिक तूट भरून काढण्यासाठी वर्षातून दोन वेळा बस भाडेवाढ प्रवाशांवर लादणे हा पर्याय असूच शकत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.