दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी वसिम मलिक याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यास बुधवारी मंजूरी देण्यात आली.
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी वसिम अक्रम मलिक याच्यावर देशद्रोह आणि त्यासाठी कट रचल्याप्रकरणी अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यास बुधवारी मंजूरी देण्यात आली. बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणा-या राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने ही मागणी केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर ७ सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात १५ जण ठार झाले होते तर ७९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी प्रमुख आरोपी वसिम अक्रम मलिक याच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, शस्त्र बाळगणे आणि बॉम्बस्फोटसाठी कट रचल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम १२१, १२१ ए, १२२ आणि १२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यास जिल्हा न्यायाधीश आय. एस. मेहता यांनी मंजूरी दिली.
बॉम्बस्फोट प्रकरणात खून आणि दहशतवादविरोधी कायद्यानुसार मलिकवर खटला चालू असून मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अमिर अब्बास देवला एनआयएने अटक केली असून तो या प्रकरणात साक्षीदार बनला आहे. बॉम्बस्फोटापूर्वी मलिकने दिल्ली उच्च न्यायालय परिसरात रेकी केली होती, अशी माहिती अब्बास देवने एनआयएला दिली होती. त्याआधारे एनआयएने ही मागणी केली होती.
मात्र मलिकने त्याच्यावर केलेले आरोप मान्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे याप्रकरणातील पुरावे आणि ध्वनीफित ऐकण्यासाठी एक एप्रिलला सुनावणी होणार आहे.