साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ८८ संमेलनांच्या इतिहासात यंदा िपपरी-चिंचवड येथे होणा-या ८९व्या साहित्य संमेलनात सर्वाधिक ११ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे- साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ८८ संमेलनांच्या इतिहासात यंदा िपपरी-चिंचवड येथे होणा-या ८९व्या साहित्य संमेलनात सर्वाधिक ११ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे यंदाचे साहित्य संमेलन हे तीनऐवजी चार दिवसांचे आहे.
संमेलनात साहित्यविषयक जास्तीत जास्त विचारमंथन व्हावे, ही एक आयोजक म्हणून आमची भूमिका आहे. त्यातूनच संमेलनात जास्तीत जास्त परिसंवादातून वैचारिक विचारमंथन होईल, असा विश्वास ८९व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केला.
या संबंधी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना डॉ. पाटील म्हणाले की, ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण हे ब्रीद घेऊन आम्ही काम करत आहोत. त्या भूमिकेतूनच अखिल भारतीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली. हे संमेलन म्हणजे मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक लोकविलक्षण ज्ञानोत्सव असून त्यात लेखक-समीक्षक, संशोधक-संपादक, प्रकाशक-मुद्रक तसेच लाखो रसिक वाचक त्यात सहभागी होत आहेत.
तसेच साहित्य संमेलनास महाराष्ट्राचे केवळ सांस्कृतिक वाङ्मय नव्हे तर अधिक व्यापक असे सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनातील ११ परिसंवादात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे : माध्यमातील स्त्री प्रतिमा आणि भारतीय संस्कृती, बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य, मराठी समीक्षा : किती थिटी? किती संपन्न?, मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक, मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा, आजचे बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का?, आजची तरुणाई काय वाचते-काय लिहिते, श्रमिक महिलांच्या व्यथा-लेखकांच्या कथा, मराठी वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांचे सामाजिक व सांस्कृतिक स्थान, १९८०नंतरची मराठी कविता स्त्री केंद्रित आहे आणि अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य.
यंदा सर्वाधिक परिसंवाद असल्याचे मान्य करून प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या की, ‘१९८० नंतरची मराठी कविता ही स्त्रीकेंद्री आहे, हा विषय स्त्रीवादी साहित्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. १९८०नंतर आधुनिक स्त्रीची कविता ही संघर्ष आणि सामाजिक समता यावर तयार झाल्याने ती स्त्रीकेंद्री म्हणजे स्त्रीवादी झाली आहे.
ही कविता संकुचित नसून या कालखंडात आधुनिक स्त्रीला आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी कविता हेच सर्वात जवळचे माध्यम वाटले. तसेच या कालखंडातील पुरुषांच्या कवितेतील स्त्रीची प्रतिमा कशी आहे, याबाद्दलही पुरुष वक्ते कुठल्या बाजूने बोलतील याची मोठी उत्सुकता वाटते. परिसंवादाचा हा विषय म्हणूनच मला खूप महत्त्वाचा वाटतो, असे त्यांनी सांगितले. धोंगडे या परिसंवादाच्या अध्यक्षा आहेत.
परिसंवादातील महत्त्वाचा विषय असणा-या ‘मराठी समीक्षा : किती थिटी? किती संपन्न? ’ या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. दिगंबर पाध्ये म्हणाले की, मराठी समीक्षेसंबंधी परखड
विचार मांडले गेले पाहिजेत. त्यामुळे या परिसंवादातील चर्चा ही केवळ मराठी समीक्षेभोवती असायला हवी.
अजूनही मराठीत समीक्षेच्या प्रांतात भरीव असे फारसे घडताना दिसत नाही, कारण एकूण मराठी साहित्यावर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. किमान यापुढे तरी मराठी समीक्षा कात टाकेल आणि त्यावर या व्यासपीठावर चर्चा होईल अशी मला आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.